द्राक्ष सल्ला : आर्द्रतापूर्ण वातावरणाचा लाभ घेणे आवश्यक

आर्द्रतापूर्ण वातावरणाचा लाभ घेणे आवश्यक
आर्द्रतापूर्ण वातावरणाचा लाभ घेणे आवश्यक

द्राक्षबागेतील तापमान सध्या कमी होत आहे. नाशिक, पुणे येथील द्राक्षउत्पादक भागामध्ये येत्या आठवड्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची दाट शक्यता आहे. या सोबत सोलापूर, सांगली जिल्ह्यातही तापमान ३५ अंशापुढे जाणार नाही. बागेतील आर्द्रता सुमारे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. ढगाळ वातावरण किंवा पाऊस यामुळे बागेमध्ये वाढीकरिता व रोगांच्या प्रादुर्भावाकरिता पोषक वातावरण राहू शकेल. सध्या बागेमध्ये वाढीच्या विविध स्थिती असून, त्यामध्ये करावयाचे व्यवस्थापन पाहू. १) खुंट व्यवस्थापन ः जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या खुंटाची बऱ्याच बागेत वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. या वर्षी उद्भवलेला पाण्याचा तुटवडा व जास्त तापामन यामुळे खुंटकाडीची वाढ जास्त झाली नाही. वाढत असलेली काडी लवकरच परिपक्व झाली. ज्या ठिकाणी काडी परिपक्व झाली अशा ठिकाणी कलम करण्याकरीता आवश्यक असलेली जाडी मिळणे शक्य नाही. याच सोबत खुंट रोपाच्या फुटी जर वाढल्या नसतील तर त्याचाच परिणाम म्हणजे जमिनीत मुळाचा विस्तार होण्याकरिता बागेत पोषक असे वातावरण तयार झाले आहे. तेव्हा खुंटरोपांची यावेळी वाढ चांगली होण्याची अपेक्षा आहे. रिकट घेतला नसला तरी नविन फुटी निघून पुढे वाढ होईल. परंतू वाढ ज्या ठिकाणी थांबली आहे. अशा ठिकाणी निघालेली नवीन फूटसुद्धा तितकीच बारीक असेल. साधन काडीचे कलम करण्यासाठी कलम करतेवेळी खुंटकाडीची जाडी जवळपास ७-८ मि.लि. असावी. याकरिताच ज्या बागेत खुंटरोपांची वाढ अपेक्षेप्राणे झाली नसल्यास यावेळी रि-कट घेणे महत्त्वाचे समजावे. रिकट घेतेवेळी जमिनीपासून वर दोन तीन डोळे राखून पूर्ण रोप कापून घ्यावे. बागेत हा रिकट एक पाऊस पडल्यानंतर घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. कारण कलम करण्यासाठी काडीची योग्य जाडी ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात सहज मिळेल. एकदा पाऊस पडल्यानंतर मुळांच्या भोवती वातावरणात पाणी पोचल्यानंतर उपलब्ध अन्नद्रव्याचा पुरेपूर वापर होतो. मुळांची वाढ सहज होते. यामुळे फुटी लवकर निघण्यास मदत होते. त्यानंतर रोपांचा मुळे व फुटवे गुणोत्तर (रुट व शूट रेशो) संतुलित राहून आवश्यक वाढ मिळू शकते. खत व्यवस्थापन ः रिकट घेतल्यानंतर बागेत नवीन फुटी निघण्याकरीता व फुटींची चांगली वाढ होण्यासाठी नत्र आणि स्फुरदयुक्त खतांचा वापर महत्त्वाचा असेल. बागेमध्ये एकरी २५ किलो युरिया आणि २५ ते ३० किलो डिएपी जमिनीतून द्यावे. यामुळे खुंटरोपांच्या मुळींची व फुटींची वाढ या दोन्ही गोष्टी साध्य करून घेता येतील. २) जुनी बाग ः याबागेत ज्या ठिकाणी पाण्याअभावी सबकेन नंतरचा शेंडा थांबवा होता, अशा ठिकाणी आता नवीन वाढ होण्यास चांगली मदत मिळेल. म्हणजेच आवश्यक असलेली बगलफुटीची वाढ यावेळी सहज होईल. परंतू, ही वाढ होत असताना आपल्याया प्रत्येक काडीवर किती पाने आवश्यक आहेत, याचा गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. चांगल्या प्रतीचा घड तयार होण्यासाठी काडीची जाडी साधारणपणे ८ ते १० मि.मी. व त्या काडीवर १६ ते १७ पाने आवश्यक असतात. ही पाने अन्नद्रव्याचा साठा तयार करण्याच्या दृष्टीने पुरेशी असतात. या पेक्षा जास्त पानांची संख्या झाल्यास कॅनोपीमध्ये गर्दी होईल. येत्या आठवड्यातील वातावरणामध्ये बगलफुटीची वाढही जोमात राहू शकते. अशा स्थितीमध्ये बागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल. या करिता मोकळी कॅनोपी करून घेणे ही महत्त्वाची उपाययोजना असेल. त्या सोबत भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी. वेलीवर ०-०-५० (सल्फेट ऑफ पोटॅश) हे खत ३ ते ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. यामुळे काडीची परिपक्वता लवकर येण्यास मदत होईल. अशा काडींवर भुरीचा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२० - २६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com