गटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटप

गटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटप
गटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटप

शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती करावी. गटांमार्फत राज्यात यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या तयार व्हाव्यात यावर राज्यशासनाचा भर आहे. यासाठी पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या वतीने राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. पुणे येथील सिमॅसिस लर्निंग एलएलपी यांच्याद्वारे या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे.

शेतकरी गट स्थापन झाल्यानंतर त्याचे दैनंदिन कामकाज, नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी गटातील शेतकऱ्यांमधून एकाची गटसमन्वयक म्हणून नेमणूक करावी. समन्वयकाने सर्वानुमते प्रत्येक सभासदाने गटासाठी करावयाच्या कामाची जबाबदारी विचारपूर्वक ठरवावी. त्याची अंमलबजावणी योग्य रित्या होण्यासाठी गटातील सभासदांसोबत समन्वय ठेवावा. जेवढा मोठा गट असेल तेवढी ताकद वाढते, त्यामुळे गटातील सर्व सभासदांनी हळूहळू नवीन सभासद गटात सामील करावेत. गट स्थिर झाल्यानंतर जिल्हाधिकारी किंवा आत्मा कार्यालय यांच्याकडे गटाची नोंदणी करावी. सर्व शासकीय, बॅंकेद्वारे राबविल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा गटशेतीसाठी घ्यावा.          

दैनंदिन खर्चाची तरतूद गट स्थापन झाल्यानंतर गटांचे दैनंदिन कामकाज व आराखडा राबविण्यासाठी खर्चाची तरतूद करणे आवश्यक असते. सुरवातीच्या काळात हा खर्च सभासदांकडून शुल्क गोळा करून भागवावा लागतो. सभासद शुल्क ठरविताना गटातील कामाची व्याप्ती, प्रशासकीय कामकाज तसेच देखभाल खर्च याविषयी अंदाज घेऊन त्याप्रमाणे प्रत्येक सभासदाला किती शुल्क आकारायचे हे बैठकीत सर्वानुमते ठरवावे. त्याप्रमाणे सभासद शुल्क आकारून गटाचा खर्च भागवावा. काही वर्षांनी गटशेतीतून नफा मिळण्यास सुरवात झाल्यानंतर नफ्यातील काही अंश गटाच्या देखभाल खर्चासाठी व कृती आराखडा राबविण्यासाठी राखून ठेवावा. राहिलेला नफा सभासदांमध्ये वाटावा. यामुळे गटखर्च चालविण्यासाठी कायमस्वरूपी स्रोत तयार होतो. गटशेतीचे निर्णय नियोजन गट स्थापना झाल्यानंतर गटाच्या संदर्भात अनेक निर्णय नियोजन करून घ्यावे लागतात. हे निर्णय गटाच्या रचनेविषयी, ध्येयधोरणाविषयी, कामाकाजाविषयी, अंमलबजावणीविषयी तसेच भविष्यातील नियोजनाविषयी असू शकतात. हे निर्णय घेण्यासाठी शेतकरी गटांची सभा बोलाविणे अपरिहार्य आहे. अशाप्रकारची सभा बोलावून या सभेमध्ये वरील विषय अजेंडा (विषय सूची) बनवून गट समन्वयकाने सर्व सभासदांना बैठकीपूर्वी वितरित करावे. त्यामुळे सर्व सभासद अभ्यास करून चर्चेमध्ये भाग घेतील. अशाप्रकारच्या बैठकी शक्यतो दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घ्याव्या, यामुळे काही दैनंदिन विषय साप्ताहिक विषय याविषयी सखोल चर्चा होऊन निर्णय व अंमलबजावणी याचे स्वरूप बैठकीमधून स्पष्ट होते. गट समन्वयकाने अशाप्रकारच्या शेतकरी गटाच्या सभा नियमितपणे व्हाव्यात याची जबाबदारी स्वीकारावी. काही आपात्कालीन मुद्दे उपस्थित झाल्यास ते सोडविण्यासाठी आपात्कालीन बैठकीचे नियोजन कधीही केले जाऊ शकते. शेतकरी गटसभा बोलावण्यापूर्वी सर्व सभासदांकडून समन्वयकाने विषय मागवून विषय सूची बनवावी, त्यामुळे सभासदांच्या मनात असलेले काही प्रश्न विषय सूचीमध्ये येऊन त्यावर तोडगा निघू शकतो. गटशेती करत असताना गटसभेचे विषय महत्त्व असल्यामुळे गटसभा नियमित घेऊन त्याचे इतिवृत्त लिहिणे व सर्व सभासदांना वितरित करणे तसेच त्याची नोंद ठेवणे ही गटसमन्वयकाची जबाबदारी आहे. गटाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी कार्यकारी मंडळ स्थापन करू शकतात त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष इ.चा समावेश करावा व सचिव म्हणून गटसमन्वयकाने काम पाहावे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com