भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत बंधारा

बांधकाम पूर्ण झालेला भूमिगत बंधारा.
बांधकाम पूर्ण झालेला भूमिगत बंधारा.

भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने आणि दोन्ही बाजूंनी मातीचा थर असल्याने यावर पाण्याचा दाब फारसा येत नाही. आकार कमी असल्याने जागा कमी लागते. हा बंधारा योग्य ठिकाणी आणि योग्यप्रकारे बांधला तर विहिरीचा पाणी देण्याचा कालावधी साधारण तीन महिन्यांपर्यंत वाढतो.

आपल्याकडे अजूनही बहुसंख्य ठिकाणी जलसंधारण उपाय करताना पृष्ठभागावरच्या पाण्यापेक्षा भूजलाचा वापर करण्याचा विचार आणि कृती बरेचदा केली जाते. हे उपाय चाकोरीबद्ध असतात. जरी त्यांचा उपयोग होत नाही, असे दिसले तरी हे उपाय होत राहतात. जिथे कमी पाऊस पडतो, पठारी प्रदेश आहे, सपाटी आहे, तिथे हे आखलेले ठराविक उपाय करणे आपण एकवेळ समजू शकतो; पण जिथे पाऊस उत्तम पडतो, डोंगराळ किंवा चढउतार असलेला भाग आहे, अशा ठिकाणीही हे ठराविक आखलेले आणि अपयशी ठरलेले उपाय करण्याची परंपरा का आहे, हे मात्र कळणे अवघड झाले आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूला असलेल्या प्रदेशात असलेल्या जलस्राेतांमध्ये सध्या साधारण सारखीच परिस्थिती आढळून येते. भूजल मिळवण्याचा सध्याचा प्रचलित मार्ग म्हणजे विहीर आणि कूपनलिका. आपल्याला हे दोन्ही स्राेत राज्यात प्रत्येक गावात दिसतील. अनेक ठिकाणी या स्राेतांची संख्याही चिंता करण्याइतकी मोठी असते, पण बहुतेकवेळा त्यापैकी सगळे स्राेत उन्हाळ्यात कोरडे झालेले दिसून येतात. परिणामी, अनेक स्राेत असूनही उन्हाळ्यात पाणीटंचाई हा प्रश्न सगळीकडे अनुभवायला मिळतो. कोणत्याही गावात पाणीटंचाई तीव्र झाली, एक तात्पुरता उपाय दरवर्षी केला जातो, तो म्हणजे सरकारी टॅंकरने पाणीपुरवठा आणि दुसरा सर्वाधिक प्रचलित उपाय म्हणजे नवीन स्राेतांची निर्मिती. या नवीन स्राेतांमध्ये नवीन विहिरी, कूपनलिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. हे उपाय करताना तिथल्या जागेचा अभ्यास करून जागा निवडण्यापेक्षा लोकांची मागणी आणि जागा देण्याची जमीनमालकाची तयारी, निर्णय घेणाऱ्या व्यक्तींची इच्छा, इत्यादी गोष्टींवर जास्त भर दिला जातो. आजही अनेक गावांमध्ये विहीर आणि कूपनलिका हे सरकारी टार्गेट पूर्ण करणे, लोकांची मागणी पूर्ण करणे, स्थानिक नेत्याची इच्छा पूर्ण करणे, इत्यादी उद्देशाने केल्या जातात.

विहीर, कूपनलिका कोरडी पडण्याची कारणे

  • आपल्याकडे एक महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित केली जाते किंवा अनेकदा बहुसंख्य लोकांच्या जाणीवेतही नसते. जमिनीतील पाणीपातळी खाली गेल्यामुळे विहीर कोरडी होते आणि भूगर्भात खोलवर असलेल्या पाणीसाठ्यातील पाणी संपल्यामुळे कूपनलिका कोरडी होते. या दोन्ही गोष्टींवर उपाय वेगवेगळे करणे आवश्यक आणि अपेक्षित आहे.
  • विहीर आणि कूपनलिका करताना योग्य जागा शोधून योग्य उपाय केला पाहिजे, याची जाण लोकांना आहे, असे काही दिसत नाही. मागणीप्रमाणे आणि टार्गेट पूर्ण करणे, हा हेतू असल्याने गावांमध्ये दरवर्षी नवीन विहिरी आणि कूपनलिका केल्या जातात, हे चित्र आजही सर्व राज्यभर आहे.
  • प्रश्न असा आहे की जर आधी केलेल्या विहिरी आणि बोरवेलकूपनलिका होळीच्या सुमाराला कोरड्या होत असतील आणि बहुतेक ठिकाणी त्या होतात, तर आपण नवीन विहिरी आणि कूपनलिका नक्की काय विचाराने खणत आहोत? जमिनीतील पाण्याची पातळी ही खाली जातच राहणार आहे.
  • उताराच्या जमिनीवर भूजलपातळी वेगाने खाली जात राहते. त्यामुळे अशा प्रदेशात असणाऱ्या विहिरी या भूजलपातळी विहिरीच्या खाली गेल्यामुळे कोरड्या पडतात. पावसाळ्यात पाणी भरपूर म्हणून पाणी पृष्ठभागावरून वाहते, मग जसजशी पाणीपातळी खाली जायला सुरवात होते, तसतसा पाण्याचा प्रवाह जमिनीखालून मातीच्या थरांमधून वाहायला लागतो, जो आपल्या नजरेला दिसत नाही आणि म्हणून लक्षात येत नाही. हे पाणी सतत उताराने खाली जात राहते. जेव्हा ही पातळी त्या भागातील विहिरींच्या झऱ्यांच्या पातळीपेक्षा खाली जाते, तेव्हा विहिरीला पाणीपुरवठा करणारे झरे बंद होतात आणि विहिरीत फक्त साठा शिल्लक राहतो. तो संपला की विहीर पूर्ण कोरडी होते. क़्वचित अगदी लहान, एखादा झरा पाणी देत राहतो आणि लोक विहिरीत उतरून हे पाणी जसे जमा होईल तसे भरतात आणि उन्हाळा संपायची वाट बघत राहतात.
  • या सर्व कारणांमुळे गावात जरी १० ते १२ विहिरी असल्या तरी त्या साधारण मार्चमध्ये कोरड्या व्हायला लागतात आणि शेवटी टॅंकर आणून त्या विहिरीत रिकामा करून ते पाणी वापरण्याची वेळ गावकऱ्यांवर येते. त्यामुळे एखाद्या गावात पाण्याचा प्रमुख स्राेत असलेल्या विहिरी जर उन्हाळ्याच्या सुरवातीला कोरड्या होत असतील तर त्या ठिकाणी दुसऱ्या नवीन विहिरी खोदणे हा उपाय नक्कीच नाही, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याची गरज आहे.
  • अशा करा उपाययोजना

  • आपल्या भागातील विहीर जर कोरडी होऊ नये, अशी इच्छा असेल तर आपल्याला त्यासाठी आपल्या भागातील पाणीपातळी खाली जाण्याचा वेग कमी करण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे. म्हणजे, आपल्या परिसरात आपण भूजल पातळी जास्त काळ टिकवण्यासाठी प्रयत्न करणे हा योग्य मार्ग झाला.
  • भूजलपातळी टिकवण्यासाठी जे काही रूढ उपाय आहेत, त्यात पाझर तलाव आणि बंधारे हे उपाय येतात, पण हे दोन्ही उपाय उताराच्या जमिनीत फारसे प्रभावी ठरत नाहीत, हा आत्तापर्यंतचा सार्वत्रिक अनुभव आहे. मग अशा परिस्थितीत वेगळे उपाय करावे लागतात.
  • भूजलपातळी जास्त काळ टिकवण्यासाठी उत्तर शोधताना असे लक्षात आले की, सध्याचे रूढ उपाय पुरेसे नाहीत आणि नवीन, वेगळे उपाय करायची गरज आहे. यातील प्रभावी उपाय म्हणजे भूमिगत बंधारा. यामुळे त्या भागातील विहिरीचे पाणी मिळण्याचा कालावधी सुमारे तीन महिन्यांनी वाढला.
  • भूमिगत बंधाऱ्याचा फायदा

  • विहिरीच्या प्रवाहाच्या खालच्या भागात योग्य जागा निवडून जमिनीत एक चर खणला जातो. तिथे खालच्या कातळापर्यंत जाऊन मग तिथून जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत किंवा सहा इंच खोलपर्यंत एक काँक्रीट भिंत किंवा बंधारा बांधला जातो. हे काम जमिनीच्या खाली असल्याने याचे नाव भूमिगत बंधारा (सबसरफेस बंड) असे ठेवण्यात आले आहे.
  • हे काम जमिनीखाली असल्याने आणि दोन्ही बाजूंनी मातीचा थर असल्याने यावर पाण्याचा दाब फारसा येत नाही. हा कमी सामान वापरून बांधता येतो.
  • आकार कमी असल्याने जागा कमी लागते. त्यामुळे कुठेही जागामालकाला जागा देताना फारसे समजवावे लागत नाही.
  • बंधारा जमिनीखाली असल्याने कोणाचीही शेतजमीन पाण्याखाली जायची भीती नाही.
  • भूमिगत बंधाऱ्यामुळे साठणारे पाणी हे जमिनीखाली साठून रहाते. त्यामुळे त्याचे बाष्पीभवन होण्याचा वेग कमी असतो.
  • बंधारा जिथे बांधला जातो, तिथे आजूबाजूच्या जमिनीखाली पाणी साठत असल्याने जमीन ज्यांची असते, त्यांना त्या जमिनीतील ओलाव्यावर दुसरे पीक सहज घेता येते. त्यातून आर्थिक लाभही मिळवता येतो.
  • बंधारा योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे बांधला, तर विहिरीचा पाणी देण्याचा कालावधी साधारण तीन महिन्यांपर्यंत वाढतो, असा आमचा अनुभव आहे.
  • हा उपाय खूप कमी खर्चात, कमी जागेत, कमी जागा पाण्याखाली जाऊ देऊन करता येतो. या उपायामुळे त्या त्या भागातील बंधाऱ्याच्या प्रवाहाच्या वरच्या भागातील विहिरींची पाणी साठवण्याची क्षमता वाढते आणि पाणी मिळण्याचा कालावधी वाढतो.
  • बंधारा बांधण्याच्या आधी योग्य आणि त्या कामातल्या अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन नियोजन करावे. नुसते वाचून किंवा कुठेतरी पाहून आणि त्यावरून अर्धवट माहिती घेऊन काम केल्यामुळे अनेक ठिकाणी याचा फायदा न होता, नुकसानही होऊ शकते, हेही लक्षात ठेवावे.
  • - डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६० ( लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com