उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन

फेब्रुवारी ते मार्च या काळात दिवसाच्या तापमानात वाढ होते. या दरम्यान कांदा चांगला तयार होतो. त्याच्या माना पडतात. काढणीनंतर सुकवणी चांगल्या प्रकारे होते. कांदे वजनाने जास्त भरल्याने उत्पादन चांगले मिळते.
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन

रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केली जाते. एक हेक्टर लागवडीसाठी साधारणतः ८-१० किलो बियांची रोपवाटिका पुरेशी होते. रोपे ८-९ आठवड्यांची झाल्यानंतर त्यांची १५ × १० सेंमी अंतरावर पुनर्लागवड करतात. फेब्रुवारी ते मार्च या काळात दिवसाच्या तापमानात वाढ होते. या दरम्यान कांदा चांगला तयार होतो. त्याच्या माना पडतात. काढणीनंतर सुकवणी चांगल्या प्रकारे होते. कांदे वजनाने जास्त भरल्याने उत्पादन चांगले मिळते. मात्र या हंगामात डेंगळे व जोडकांदे यांचे प्रमाण वाढते. कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणाने कांदा पिकात योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे. नत्र विभागून दोन ते तीन हप्त्यांत दिले असता त्याचा चांगला फायदा होतो. कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मँगेनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. त्यानुसार खत व्यवस्थापन करणे फायद्याचे ठरते. खत व्यवस्थापन (प्रति एकर) रोपे रुजण्याची अवस्था (लागवडीच्या वेळी)

  • २४:२४:०० हे खत ७६ किलो, म्युरेट ऑफ पोटॅश ४० किलो, गंधक २० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो व सूक्ष्म अन्नद्रव्ये १ किलो ही सर्व खते एकत्र करून जमिनीतून द्यावीत.
  •  २४:२४:०० या खतात नायट्रेट व अमोनिकल या दोन्ही स्वरूपांतील नत्र असून, २ टक्के गंधकसुद्धा आहे. यामुळे पिकाची जलद, निरोगी व शाखीय वाढ जोमदार होते. पातीचा हिरवेगारपणा दीर्घकाळ टिकून राहतो. हे खत आम्लयुक्त असल्यामुळे जमिनीचा सामू व पोतसुद्धा सुधारतो.
  • खताचा लागवडीच्या वेळी वापर केल्यामुळे डेंगळे व जोडकांद्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते.
  • सुरुवातीच्या वाढीची अवस्था (लागवडीनंतर ३० दिवसांनी)

  • १०:२६:२६ हे खत ६० किलो मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो एकत्र करून जमिनीतून द्यावेत. या खतदाण्यावर आवरण असल्याने स्फुरदाची उपलब्धता सुधारते.
  • मुळांचा विकास मोठ्या प्रमाणावर होऊन अन्नद्रव्यांचे कार्यक्षम पोषण होते. पात हिरवीगार राहते. कांद्याचा आकार एकसारखा गोलाकार मिळतो. एकूण उत्पादनात १२ ते १५ टक्के वाढ होते.
  • जोमदार वाढीची अवस्था (लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी) अ) लागवडीनंतर ४५ दिवसांनी : सल्फेट ऑफ पोटॅश (फिल्डग्रेड) २० किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. (म्युरेट ऑफ पोटॅश) पिकाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेतील पालाशची गरज सल्फेट ऑफ पोटॅश भागवते. ब) लागवडीनंतर ६० दिवसांनी : ००:५२:३४ हे खत ४ ग्रॅम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे कंद पोषणाच्या काळात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही. या काळात जैव रासायनिक क्रिया घडत असतात. या फवारणीमुळे कंदाचा आकार वाढतो. कंद घट्ट होतात. कंद वाढीची अवस्था (लागवडीनंतर ७५ ते १०५ दिवसांनी) या अवस्थेत ००:००:५० हे खत ५ ग्रॅम अधिक बोरॉन २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ००:००:५० या खतामुळे कांदे पक्व होण्यास मदत होते. बोरॉनमुळे पानात तयार झालेली शर्करा कंदामध्ये उतरते. कंदातील शर्करेचे प्रमाण (टीएसएस) वाढते. कांद्याची गुणवत्ता सुधारते. तसेच साठवण कालावधीदेखील वाढतो. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन १) कांदा पिकाची मुळे उथळ असतात. त्यामुळे कांदा पिकात योग्य वेळी, विभागून खते देणे आवश्यक असते. अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत वापरल्यास कांद्याची साठवण क्षमता वाढते. २) रब्बी कांद्यासाठी नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) प्रतिहेक्टर द्यावे. त्या पैकी अर्धे नत्र (५० किलो - युरिया १०९ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावा. उर्वरित नत्र (५० किलो - युरिया १०९ किलो) पुनर्लागवडीनंतर १ आणि दीड महिन्याने समान हप्त्याने द्यावा. ३) पुनर्लागवडीनंतर वाढीच्या सुरुवातीला तसेच कांदा पूर्ण वाढत असताना (म्हणजेच दोन महिन्यांपर्यंत) नत्राची आवश्‍यकता अधिक असते. मात्र पूर्ण वाढल्यानंतर नत्राची आवश्‍यकता नसते. पूर्ण वाढल्यानंतर नत्र दिल्यास किंवा उशिरा दिल्यास डेंगळे व जोडकांदा येणे व साठवणीत कांदा सडणे अशा समस्या उद्‍भवतात. ४) पिकांच्या मुळांच्या वाढीकरिता स्फुरदाची आवश्यकता असते. ५) जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर असले, तरी पिकांना उपलब्ध होणाऱ्या पालाशची मात्रा कमी आहे. पालाश कांद्याचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी, कांद्याला आकर्षक रंग येण्यासाठी आवश्यक असतो. ६) माती परीक्षण करून, त्या अहवालाप्रमाणे तज्ज्ञांच्या साह्याने खताची मात्रा ठरवावी. कांदा पिकास शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त व लागवडीच्या ६० दिवसांनंतर नत्र दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते, मान जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण जास्त निघते. साठवण क्षमता कमी होते.

    कांदा पिकात गंधकाचे महत्त्व

  • गंधकामुळे सूक्ष्म स्तरावर वाढलेला जमिनीचा सामू कमी होतो. त्यामुळे अन्य अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली होते.
  • कांद्याचा तिखटपणा, वजन वाढते. साठवणीत कांदा जास्त काळ टिकतो.
  • बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
  • प्रमाण - रब्बी हंगामात कांदा पुनर्लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर गंधक हेक्टरी ४५ किलो या प्रमाणात द्यावे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज 

  • कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मँगेनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे रोपांची वाढ खुंटते. पातीचा रंग करडा, निळसर पडतो.
  • जस्ताची उणीव भासल्यास पाने जाड होऊन खालील बाजूला वाकतात. अशी लक्षणे दिसताच शिफारशीत खतमात्रेबरोबर झिंक सल्फेट १ ग्रॅम, मॅंगेनीज सल्फेट १ ग्रॅम, फेरस सल्फेट २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • कांदा पुनर्लागवडीपासून १५, ३० आणि ४५ दिवसांनी १९:१९:१९ या विद्राव्य मिश्रखताची ५ ते १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • पुनर्लागवडीपासून ६०, ७५ आणि ९० दिवसांनी १३:००:४५ (पोटॅशिअम नायट्रेट) ५ ते १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास कांद्याची फुगवण होते. उत्पादनात वाढ मिळते.
  • - रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१ (लेखक कृषी, अभियांत्रिकी आणि विज्ञान विश्‍वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे आचार्य पदवी घेत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com