सुधारित तंत्राने करा करडई लागवड

करडई हे रब्बी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकामध्ये उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित लागवड तंत्राचा वापर करणे फायदेशीर ठरते.
करडई लागवडीचे सुधारित तंत्र
करडई लागवडीचे सुधारित तंत्र

करडई हे रब्बी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकामध्ये उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित लागवड तंत्राचा वापर करणे फायदेशीर ठरते. करडईची लागवड नारंगी रंग व तेलासाठी केली जाते. करडईच्या तेलात असलेले लिनोलिक आम्ल रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करते. कमी उत्पादकतेची कारणे  प्रामुख्याने कोरडवाहू भागात लागवड,एकाच जमिनीत वारंवार एकच पीक घेणे, सुधारित वाणांचा कमी वापर, शिफारशीत खतमात्रेचा वापर न करणे, यांत्रिकीकरणाचा अभाव व पीक संरक्षणाकडे दुर्लक्ष. हवामान  कोरडे हवामान करडई पिकास अनुकूल असते. अतिउष्ण किंवा अतिथंड हवामान अयोग्य आहे. शेतात पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही. जमीन : मध्यम ते भारी उत्तम निचरा होणारी निवडावी. क्षारयुक्त जमिनीतही हे पीक घेता येते. पूर्वमशागत : खरीप पिकाच्या काढणीनंतर २-३ पाळ्या द्याव्यात. बियाणे : प्रति हेक्टरी १०-१२ किलो. वाणांची निवड : करडई लागवडीसाठी खालील सुधारित वाणांची निवड करावी.

अ.क्र. वाण कालावधी (दिवस) वैशिष्ट्ये
1 अन्नेगिरी-१ १२५-१३० काटेरी, मर रोगास व मावा किडीस सहनशील
2 परभणी-१२ १३०-१३५ काटेरी, मोठा व टपोरा दाणा तेलाचे प्रमाण २९ टक्के, मर रोगास व मावा किडीस सहनशील
3 परभणी-४० ११८-१२८ बिनकाटेरी, मर रोगास व मावा किडीस सहनशील, पानावरील ठिपके रोगास सहनशील
4 परभणी-८६(पूर्णा) १३५-१३८ तेलाचे प्रमाण ३० टक्के, मर रोगास व मावा किडीस सहनशील
5 भीमा १३०-१३५ कोरडवाहू क्षेत्रास योग्य
6 शारदा १२५-१३० मराठवाडा विभागाकरिता प्रसारित
7 नारी-६ १३०-१३५ बिनकाटेरी, पाकळ्या गोळा करण्यास योग्य

पेरणी : कोरडवाहू करडईची सप्टेंबरअखेर ते १५ ऑक्टोबर पर्यंत पेरणी करता येते. बागायती करडईची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. वेळेवर पेरणी केल्यास कीड व रोग यांचा प्रादुर्भाव कमी होतो. दोन ओळीतील अंतर ४५ सेमी आणि दोन रोपातील अंतर २० सेमी ठेवावे पेरणीपुर्वी ३ ग्रॅ. थायरम प्रतिकिलो बियाणास चोळावे. खत व्यवस्थापन कोरडवाहूसाठी प्रती हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद द्यावे. बागायातीसाठी प्रती हेक्टरी ६० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद द्यावे. खताच्या मात्रापैकी निम्मे नत्र व पूर्णस्फुरद पेरणीवेळी द्यावे उर्वरीत निम्मे नत्र३० ते ३५ दिवसांनी पहिली पाण्याची पाळी देताना द्यावे. विरळणी : उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करणे आवश्यक आहे अन्यथा झाडे लहान राहून उत्पादन घटते. विरळणी करताना चांगली जोमदार रोपे ठेवावीत व दोन रोपात २० से. मी. अंतर ठेवावे. आंतरमशागत : पेरणीनंतर ३० दिवसांनी एक खुरपणी व एक कोळपणी करावी. तणनाशकांचा वापर करायचा असल्यास करडई पेरणीनंतर, परंतु पीक उगवणीपूर्वी पेंडीमिथॅलीन ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.  पाणी व्यवस्थापन : हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे वाढीस कमी पाणी लागते. सुरवातीच्या काळात म्हणजेच ३० दिवसांनी व नंतर ६० दिवसांनी फुलोरा अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादनात ५० टक्क्यापर्यंत वाढ होते. - डॉ. हनुमान गरुड, ७५८८६७७५८३ (विषय विशेषज्ञ- कृषि विद्या, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com