कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे वाचविले ७५ लाख

कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे वाचविले ७५ लाख
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे वाचविले ७५ लाख

कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील खरेदीदारांना थेट बांधावर येण्यास प्रवृत्त केले. यामुळे बागायतदारांचा द्राक्ष वाहतूक, अडत, हमाली, तोलाईद्वारे होणारा खर्च वाचला. दरवर्षी थेट विक्रीद्वारे बागायतदारांची सुमारे ७५ लाखांची बचत होते, बांधावरच अपेक्षित दर मिळत आहे.

कडवंची शिवारातून जाणाऱ्या जालना-सिंदखेडराजा महामार्गावर तीन किलोमीटर दुतर्फा वर्दळ... ठिकठिकाणी लहान-मोठी वाहने थांबलेली. प्रवासी, वाहनचालक विविध स्टॉलवर एकवटलेले. प्रवासी द्राक्षांची चव चाखत दराची विचारपूस करीत सहज दोन चार किलो खरेदी करताहेत. हे चित्र आहे कडवंची गावातील शेतकऱ्यांकडून थेट द्राक्षविक्रीचे... द्राक्ष हंगामात येथील शेतकरी दररोज शेकडो टन द्राक्षे थेट विक्री करीत चांगला नफा मिळवीत आहे. मृद आणि जलसंधारणातून पाणीदार झालेल्या कडवंची (जि. जालना) गावातील शेतकऱ्यांनी स्वतः द्राक्षशेतीमध्ये वेगळी ओळख तयार केली. शेततळ्याच्या संरक्षित पाण्यावर सुमारे ४८० हेक्‍टरवर  द्राक्षबागा उभारत खरेदीदारांना थेट बांधावर येण्यास प्रवृत्त केले. यामुळे बाजार समितीमध्ये द्राक्षविक्रीसाठी वाहतूक, अडत, हमाली, तोलाईद्वारे होणारा खर्च वाचविण्यात यश आले. दरवर्षी थेट विक्रीद्वारे शेतकऱ्यांची सुमारे ७५ लाखांची बचत होत असून, बांधावरच अपेक्षित दर मिळत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनासाठी कडवंची ‘हब’ झाले आहे.  बाजार समित्यांमध्ये अडत दहा टक्‍क्‍यांपर्यंत आकारण्यात येते. तर, हमाली आणि तोलाईचे दरदेखील वेगवेगळे आहेत. यामुळे वार्षिक ४० ते ४५ कोटींची उलाढाल असलेल्या द्राक्षावरील अडत आणि इतर खर्च सुमारे ७५ लाखांपर्यंत जातो. मात्र, हाच खर्च थेट बांधावरील विक्रीद्वारे वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले.

फळे, भाजीपाला नियमनमुक्तीमुळे यश राज्य शासनाने जुलै २०१६ मध्ये बाजार समित्यांमधून फळे, भाजीपाला नियमनमुक्त केले. या निर्णयामुळे बाजार समित्यांच्या आवाराबाहेर होणाऱ्या फळे, भाजीपाला खरेदी-विक्रीवर कोणतेही कर लावता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे थेट बांधावरील खरेदी-विक्रीला चालना मिळाली. यामुळे कडवंचीमधील शेतकऱ्यांनी द्राक्षविक्रीसाठी खरेदीदारांनाच थेट बांधावर येण्यास प्रवृत्त केले. यामुळे बाजार समितीमधील विविध कररूपी द्यावे लागणारे पैसे वाचले.

नफा वाढला... माझी स्वतःची सव्वा एकरावर द्राक्षबाग आहे. मी खरेदीदारांसह महामार्गावर द्राक्षविक्री करते. खरेदीदार २५ ते ३० रुपये प्रतिकिलोला दर देतात. तर, महामार्गावरील थेट विक्रीमध्ये प्रतिकिलोला ४० ते ५० रुपये दर मिळतो. द्राक्ष हंगामात मी दररोज सुमारे दोन हजार रुपयांची द्राक्षविक्री करते. - लक्ष्मी सरोदे, द्राक्ष उत्पादक आणि थेट विक्रेत्या

खरेदीदार थेट बांधावर... कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने २०१२ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार कडवंची गावातील द्राक्षांची उलाढाल ही ४८ कोटी एवढी होती. आता ही उलाढाल ५५ कोटींपर्यंत वाढली आहे. खरेदीदार थेट बांधावर खरेदीसाठी येत असल्याने बाजार समितीमध्ये द्राक्ष नेण्याचा वाहतूक खर्च, अडत, हमाली, तोलाईसारखे खर्च वाचले आहेत. - चंद्रकांत क्षीरसागर सरपंच आणि द्राक्ष उत्पादक, कडवंची

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com