गाव कुठे वसलं आहे, लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी, पाण्याचे स्रोत किती आणि कोणते, त्यांची क्षमता किती, पिकांसाठी लागणारे पाणी किती, गावाची भौगोलिक रचना यांचा अभ्यास करावा. त्यानुसार जल, मृदसंधारण योजना आखली आणि प्रत्यक्षात आणली तर यश नक्की मिळते.
जलसंधारण करताना काम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गावाला लागणारे पाणी त्याच परिसरात अडविणे, जिरविणे आणि पावसाळ्यानंतरच्या काळात वापरासाठी साठवून ठेवणे, या कामांमधून गावाला लागणाऱ्या पाण्याच्या गरजेची पूर्तता सहज होऊ शकते. यामध्ये लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची बाब म्हणजे केवळ पिण्यासाठी पुरेल इतकेच काम न करता, घरगुती वापर, जनावरांसाठी, इतर उपक्रमांसाठी आणि मुख्यत: दुसरं पीक घेण्यासाठी पुरेल एवढे पाणी उपलब्ध करता येईल याप्रकारे जल, मृदसंधारणाचे काम करणे आवश्यक आहे. गाव कुठे वसलं आहे, लोकसंख्या किती, पाण्याची मागणी किती, पाण्याचे स्रोत किती आणि कोणते, त्यांची क्षमता किती, पिकांसाठी लागणारे पाणी किती, गावाची भौगोलिक रचना याचा अभ्यास करावा. त्यानुसार जल, मृद संधारण योजना आखली आणि प्रत्यक्षात आणली तर यश नक्की मिळते.
स्थलानुरूप उपाययोजना जलसंधारण उपायांमध्ये आपण स्थलानुरूप उपाय कोणते आणि ते कशासाठी आणि कुठे करावेत हे आपण या आणि पुढच्या लेखांमध्ये बघणार आहोत. हे उपाय पृष्ठभागावरील पाणी कसे वापरावे, स्रोतांचे पुनर्भरण कसे करावे, भूजल वाढवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, पाण्याचे साठे कुठे आणि काय उपायांनी करता येतात, गाळमुक्त बंधारे कुठे आणि कसे बांधावेत, उपाय योजताना ते शाश्वत असावेत यासाठी काय काय करावे इत्यादी मुद्द्यांवर आपण माहिती घेणार आहोत. कोणत्याही ठिकाणी जलसंधारण उपाय करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यामध्ये सर्वप्रथम पाण्याचे ऑडिट करून उपलब्धता आणि मागणी यातील नक्की अंतर किती याचं गणित मांडले पाहिजे. त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना पहिल्यांदा अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांवर काम करून त्यांची क्षमता वाढविणे हा सर्वात कमी खर्चाचा आणि कमी वेळात होणारा उपाय आहे. यामुळे असलेले स्रोत जास्त कालावधीसाठी वापरात राहतात. त्यानंतर नादुरुस्त किंवा पडझड झालेल्या स्रोतांची दुरुस्ती किंवा बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे योग्य आहे. हे सर्व करूनही जर पाण्याची कमतरता राहत असेल तर नवीन स्रोतांची निर्मिती करणे या उपायाकडे वळता येऊ शकते.
झऱ्यांचे व्यवस्थापन माणूस अगदी अश्मयुगापासून वापरत असलेला स्रोत, जो वस्तीजवळ असतो, काही वर्षभर पाणी देतात, तर काही सहा महिने. हा पाण्याचा स्रोत आहे “झरे”. भूगर्भातील पाणी साठवून ठेवायची जागा संपली की पाणी जिथे मार्ग मिळेल तिथे बाहेर पृष्ठभागावर येऊन उताराने वाहायला लागते, त्याला आपण “झरा” असं म्हणतो. झरे वापरून आपण पाणी कसं वाचवू, वाढवू आणि वापरू शकतो हे आपण बघूयात.
झऱ्यासमोर कुंड बांधणे पाण्याच्या योग्य वापरासाठी झऱ्याच्या समोर एक कुंड बांधावे. कॉंक्रीटचा वापर करून सुयोग्य ठिकाणी कुंडाची निर्मिती केली जाते. डोंगर ही पाणी साठवण्याची टाकी आहे असं म्हटले तर झरा म्हणजे या टाकीचा नळ असतो. हा नळ पूर्ण क्षमतेने कायम वाहत असतो. जेव्हा आपण त्याच्यासमोर एक कुंड बांधून अडथळा तयार करतो, तेव्हा झऱ्याचा वाहण्याचा वेग कमी होतो. त्याचा परिणाम म्हणजे त्या झऱ्याचा पाणी पुरवण्याचा कालावधी वाढतो. फक्त हे करताना झऱ्याची क्षमता, साठवणूक करण्यासाठी उपलब्ध योग्य जागा आणि प्रवाहाचा वेग यावर कुंडाचा आकार ठरवला जातो. यात जर चूक झाली तर झरा दिशा बदलून वाहायला लागू शकतो आणि त्यामुळे केलेला खर्च वाया जाऊ शकतो. त्यामुळे हा उपाय करण्यापूर्वी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
झऱ्यावरील पाणीपुरवठ्याचे उदाहरण
- डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०
(लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.