जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची निवड करावी. दोन ठिबक नळ्यांमधील योग्य अंतर व ड्रीपरचा प्रवाह निश्चित करावा. मध्यम खोल जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यांतील अंतर कमीत कमी १.५० मीटर आणि जास्त खोलीच्या काळ्या जमिनीत १.८० मीटर अंतर असावे.
सध्या हवा, तसेच जमिनीतील तापमान वाढते. हवेतील तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत गेल्यास ऊस पिकाचेही तापमान वाढते. वेगवान व शुष्क हवेमुळे जमिनीतील; तसेच उसातील ओलाव्यात झपाट्याने घट होते. बाष्पीभवनाचा वेग वाढतो. मार्च ते मे हा ऊस उत्पादनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात पाण्याचे काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
राज्यातील हवामानाचा विचार करता, फेब्रुवारी ते जून आणि जर पावसाळा लांबला तर ऊस पिकास पाण्याचा मोठ्या प्रमाणावर ताण बसतो. यामुळे पीकवाढीवर आणि ऊस उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होतो. या चार महिन्यांत संपूर्ण वर्षातील बाष्पीभवनातील ४० ते ४५ टक्के म्हणजे जवळपास निम्मे बाष्पीभवन होते, तर जुलै ते ऑक्टोबर महिन्यात ३० ते ३५ टक्के आणि उरलेले ३० ते ३५ टक्के हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात होते. उन्हाळ्यात दिवसाचा कालावधी जास्त असतो. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील फरक कमी होतो. रात्रीचे तापमानही वाढलेले असते. मुळांभोवती तापमान वाढून त्यांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी, मुळांद्वारे पाणी व अन्नद्रव्यांच्या शोषणात घट होते. उसाच्या पानांवरील पर्णरंध्राद्वारे होणारे बाष्पीभवन म्हणजेच उत्सर्जन कमालीचे वाढते. वाढत्या तापमानाच्या परिस्थितीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसतो. पिकाची समाधानकारक वाढ होत नाही. मुख्यत्वेकरून आडसाली व पूर्वहंगामी उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो, कारण हा ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत असतो. पाण्याच्या ताणामुळे होणारे दुष्परिणाम
पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात. मुळांची कार्यक्षमता घटते. त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण होऊन प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते. अन्नरसाचे विविध भागांना होणारे वहन कमी होऊन पानांतील हरितद्रव्यांचे प्रमाण घटते. तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून उसात धशीचे प्रमाण वाढते. पूर्वहंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. वजन घटते. सुरू हंगामात लागवड केलेल्या; तसेच खोडवा पिकात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसाच्या संख्येत घट झाल्याने उत्पादन कमी येते. शक्यतो १६ मी.मी. व्यासाची इनलाइन ड्रीप वापरणे फायदेशीर ठरते. मध्यम खोल जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर कमीत कमी १.५० मीटर (५ फूट) असावे. जास्त खोलीच्या काळ्या जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर १.८० मीटर (६ फूट) असावे. ड्रिपरमधील अंतर व प्रवाह : दोन ड्रिपरमधील अंतर ४० सें.मी. तर ड्रिपरचा प्रवाह दर ताशी १.६ किंवा २ लिटर असावा. पृष्ठभागाखालील ठिबक सिंचनासाठी दाबनियंत्रित इनलाइन ड्रीप वापरणे फायदेशीर आहे. दोन ड्रीपरमधील अंतर ४० सें. मी. तर ड्रीपरचा प्रवाह दर ताशी १.६ किंवा २ लिटर असावा. एका शिफ्टमध्ये जास्त क्षेत्र ओलिताखालील आणण्यासाठी ताशी १ लिटर प्रवाह देणारे ड्रीपर असणारी इनलाइन वापरणे फायदेशीर आहे. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कमी अंतराने म्हणजेच दरदिवशी किंवा एक दिवसाआड कमी प्रवाहाने परंतु जास्त कालावधीसाठी पाणी दिल्यास जमिनीमध्ये पिकांच्या मुळांशी पाण्याचे अपेक्षित व योग्य प्रकारे उभे आडवे प्रसरण होते. मुळांची वाढ चांगली खोलवर होते. त्यामुळे उसाची जोमदार वाढ होऊन भरीव उत्पादन मिळते. जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची निवड करावी. दोन ठिबक नळ्यांमधील योग्य अंतर व ड्रीपरचा प्रवाह निश्चित करावा. कमी कालावधीमध्ये सिंचन पूर्ण करण्यासाठी जास्त प्रवाह असणारे ड्रीपर वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो परंतु हे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे. प्रवाही सिंचन पद्धतीत उपाययोजना
प्रवाही सिंचन पद्धतीत उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी लांब सरी, एका आड एक सरी किंवा जोडओळ पट्टा पद्धतीचा वापर करावा. प्रवाही सिंचनाचे पाट व दांड स्वच्छ ठेवावेत. लांब सरी पद्धतीमध्ये दोन पाळ्यांतील अंतर कमी ठेवावे. जास्त खोलीच्या भारी, मध्यम आणि हलक्या जमिनीत प्रत्येक सरीतून उपलब्ध पाण्याचा प्रवाह अनुक्रमे १ ते १.५ , २ ते २.५ आणि २.५ ते ३ लि. प्रतिसेकंद याप्रमाणे विभागून द्यावा. उसाची खालची वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत. पाचट आच्छादनाने दोन पाण्याच्या पाळीतील अंतर वाढविता येते. ३ ते ५ पाण्याच्या पाळीत बचत होते. शेताच्या बाहेरील बाजूस साधारणपणे एक मीटर पट्ट्याचे पाचट काढू नये. पीक नेहमी तणविरहित ठेवावे. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करावा. पाण्याची उपलब्धतता पाहून रासायनिक खतांचा वापर करावा. पाण्याची कमतरता असल्याने पोटॅश खताची २५ टक्के मात्रा अधिक द्यावी. दर २१ दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश+दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी. पाण्याचा ताण असताना रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याऐवजी मल्टिन्युट्रीयंट (मॅक्रो आणि मायक्रो) द्रवरूप खतांच्या एक टक्के याप्रमाणात एक महिन्याच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. पट्टा किंवा जास्त अंतरावरील लागण पद्धतीत मधल्या पट्ट्यात हलकी अांतरमशागत (कुळवणी) करावी. काणी व गवती वाढ रोगग्रस्त बेटे मुळासहित काढून नष्ट करावीत. खोडव्याचे योग्य व्यवस्थापन ठेवावे. यामध्ये पाचट आच्छादन करावे. पाचट प्रक्रिया (युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाचट कुजविणाऱ्या जीवाणू संवर्धकाचा वापर), बुडख्यांची जमिनीलगत छाटणी, नांग्या भरणे आणि मल्टीन्युट्रीयंट द्रवरूप खतांची फवारणी करावी. प्रवाही सिंचन पद्धतींऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा. अन्नद्रव्ये आणि पाणी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. उसामध्ये ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन आणि रासायनिक खतांचा वापर करणे हे तांत्रिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते. पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी व खतांचे योग्य नियंत्रण करता येते. मुळांशी अन्न, पाणी व हवा यांचे संतुलित प्रमाण पीक वाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये ठेवता येते. उसाची उगवण लवकर म्हणजे २५ ते ३० दिवसांत, एकसारखी व जास्त प्रमाणात (७५ टक्क्यांपेक्षा जास्त) होते. प्रचलित सरीवरंबा पद्धतीने पाणी देण्याशी तुलना करता ४५ ते ५० टक्के पाण्यात बचत होते. पाण्याच कार्यक्षम वापर होऊन पाणीवापर कार्यक्षमता दुप्पट ते अडीचपटीने वाढते. पाण्यामध्ये विरघळणारी अथवा द्रवरूप खते ठिबक सिंचनातून दिल्याने खत वापर कार्यक्षमता वाढते. प्रचलित सरी वरंबा पद्धतीशी तुलना करता खतांमध्ये ३० टक्के बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. पीकवाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये गरजेनुसार आवश्यक तेवढेच पाणी दिले जात असल्याने वीजेवरील खर्चामध्ये ३५ ते ४५ टक्के बचत होते. ऊस लागवड खर्चामध्ये २० टक्यांपर्यंत बचत होते. पीक जोमदारपणे वाढल्याने रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. पीक सरंक्षण खर्चात ३० टक्यांपर्यंत बचत होते. ऊस उत्पादनात ३० टक्क्यांची वाढ होते. साखर उताऱ्यात ०.५ युनिटने वाढ होते. जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता कायमस्वरूपी टिकवून ठेवली जाते. - अरुण देशमुख, ९५४५४५६९०२ ( सह सरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे)