संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराच्या संकल्पनेने शेतमालाची थेट विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय मिळाला. औरंगाबाद शहरात दोन वर्षांपासून सातत्याने भरणाऱ्या या शेतकरी आठवडे बाजारांनी शेतकऱ्यांची थेट ग्राहकांशी सांगड घालून दिली. त्यामुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांचादेखील फायदेशीर ठरले आहे.
सध्या दुष्काळाच्या झळा शेतकरी आठवडी बाजारात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांवर मर्यादा घालताहेत. परंतु याही परिस्थितीमध्ये काही शेतकरी गट या बाजारात सातत्य टिकवून आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील मध्यस्थांची साखळी तोडण्यात यश मिळू लागले आहे. औरंगाबाद शहरात सध्या तीन ठिकाणी भरणाऱ्या शेतकरी आठवडी बाजाराच्या यशामुळे शेतकरी गट आणि पणन मंडळातर्फे या बाजारामध्ये आणखी शेतकरी जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आठवडे बाजाराला सुरवात औरंगाबाद शहरात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची थेट विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पणन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या समन्वयातून चांगले प्रयत्न झाले. पहिला शेतकरी आठवडे बाजार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रिकाम्या जागेत सुरू झाला. त्याची यशश्विता पाहून महानगरपालिकेनेही सहकार्य केले. त्यामुळे शहरात तीन ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार सुरू झाले. सुमारे बावीस शेतकरी गट या आठवडे बाजारांमध्ये सहभागी झाले आहेत.
बाजार ठरतोय फायद्याचा
सहभागी शेतकरी गट
बाजाराचे दिवस आणि वेळा
शेतमाल विक्रीची वाढली उलाढाल औरंगाबाद शहरात सुरू असलेल्या शेतकरी आठवडे बाजारातून जानेवारी २०१९ अखेरपर्यंत ५३६. ६५ टन भाजीपाल्याची विक्री झाली. शिवाय परभणी येथे दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या आठवडे बाजारातून पहिल्याच महिन्यात १ टन भाजीपाल्याची विक्री झाली. प्रामुख्याने यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, शेंगवर्गीय भाज्यांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील शेतकरी आठवडे बाजारातून जानेवारी अखेरपर्यंत थेट शेतकऱ्यांनी ग्राहकांना १६४.२९ टन फळांची विक्री केली. शिवाय परभणी येथील शेतकरी आठवडे बाजारातून ०.६ टन फळांची विक्री झाली. फळांमध्ये केसर आंबा, द्राक्ष, पपई, मोसंबी, पेरू, जांभूळ, सीताफळाचा समावेश आहे.
भाजीपाल्यास चांगली मागणी वांगे, भेंडी, गवार, वाल, चवळी, दोडके, गाजर, टोमॅटो, मोसंबी, मेथी, कोथिंबीर आदींची विक्री करतो. ताजा भाजीपाला देण्यावरच आमचा भर असतो. बहूतांशी शेतमाल सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करतो. - प्रेमसिंग चव्हाण, जय सेवालाल जय किसान अमर शेतकरी गट, बनवाडी तांडा, ता. जि. औरंगाबाद.
मोसंबीला मिळाला योग्य दर आमच्या शेतात उत्पादित मोसंबीला १२ हजार रुपये टनाने मागणी झाली होती. तीच मोसंबी आम्ही शेतकरी बाजारात आमच्या गटाच्या माध्यमातून विक्री केली. आम्हाला ३६ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. आमचही समाधान झालं अन् ग्राहकांनाही वाजवी दरात मोसंबी मिळाली. जवळपास दोन वर्षांपासून आम्ही बाजारात थेट विक्री करतो. - शेख इरफान शेख अकबर गौरीकृपा शेतकरी गट, ढासला, ता. बदनापूर जि. जालना.
थेट ग्राहकांशी संवाद
दीड वर्षापासून गटाच्या माध्यमातून आले, लसूण, सोबतच घरगुती चिक्कीची थेट विक्री करतो. आमच्याकडून एकदा माल घेतलेला ग्राहक पुन्हा आमच्याकडूनच शेतमाल खरेदी करतो. हा आमचा अनुभव आहे. थेट विक्रीमुळे शेतमालाला किफायतशीर दर मिळू लागला आहे. वर्षभर विविध भाजीपाला, फळांच्या विक्रीचे आमच्या गटाने नियोजन केले आहे. - रामहरी जाधव, जय बालाजी शेतकरी गट, घोडेगाव, ता. खुल्ताबाद जि. औरंगाबाद.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.