शेडनेटच्या विविध पिकांतील जिद्दी मास्टर !

ॲग्रोवनमधील यशकथा, लेख वाचूनच शेतीला मोठे बळ मिळाले, नवे प्रयोग घडले असे पुंजाराम भूतेकर (हिवर्डी, जि. जालना) सांगतात.
पुंजाराम भुतेकर यांची शेडनेटमधील शेती
पुंजाराम भुतेकर यांची शेडनेटमधील शेती

न कळण्याच्या वयात आईचे छत्र हरविले. पण वडिलांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रचंड इच्छाशक्ती, धैर्य अशा विविध गुणांचा वापर करून पुंजाराम भूतेकर (हिवर्डी, जि. जालना) आज यशस्वी व प्रयोगशील शेतकरी म्हणून पुढे आले आहेत. शेडनेट शेतीत विविध पिके घेत त्यातील मास्टर झाले आहे. दुष्काळ, गारपीट यांचा सामना करूनही शेतीत कर्जमुक्त झाले आहेत.

न कळण्याच्या वयातच म्हणजे तीन वर्षे वय असतानाच पुंजाराम अंकुशराव भूतेकर (हिवर्डी, ता. जि. जालना) यांना आपली आई गमवावी लागली. माउलीचे छत्र हरवल्याने दु:खाचा डोंगर उभा राहिला. आर्थिक परिस्थिती हलाखीची. शेती कोरडवाहू आणि तीही चार एकर. गरिबीला तोंड देत दहावीपर्यंत पुंजाराम यांनी शिक्षण पूर्ण केले. सतत संघर्षच दहावीनंतर वडिलांना आधार देत शेती व मजुरी करण्यास पुंजाराम यांनी सुरवात केली. सन २००३ मध्ये दुग्धव्यवसाय सुरू केला. पैशांची अडचण असल्याने ‘मोबाईल रिचार्ज’ प्रमाणे ग्राहकांकडून महिन्याच्या अाधी दुधाचे पैसे जमा करून घेऊन त्यांना दूध दिले जायचे. या व्यवसायातून शेतीला आर्थिक बळ मिळाले. पुढे काही कारणामुळे व्यवसाय थांबवावा लागला. तज्ज्ञांचे घेतले मार्गदर्शन कोरडवाहू शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसे. सन १९९९ मध्ये जालना- खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) मार्गदर्शनाखाली कापूस पिकात प्रयोगांना सुरवात केली. घरचा व शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत होता. अशावेळी केव्हीकेच्या माध्यमातून संरक्षित शेती (शेडनेट) बद्दल माहिती मिळाली. ॲग्रोवनचेही वाचन नियमित सुरू होते. अखेर १० गुंंठ्यात शेडनेट उभारून उत्पन्नाची नवी वाट शोधण्याचे नक्की केले. कोणीही कर्ज देईना दहा गुंठ्यांसाठी सुमारे पावणेतीन लाख रुपये उभे करण्याची गरज होती. जमीन अत्यंत कमी. कोणीही कर्जासाठी उभे करेना. मग पुंजाराम परिसरातील लोकमंगल या प्रगतिशील व सधन शेतकऱ्यांच्या गटात सामील झाले. त्या माध्यमातून कर्ज मिळाले. साधारण २००८-०९ ची ही गोष्ट. अत्यंत अभ्यासूवृत्ती, तज्ज्ञांचे सतत मार्गदर्शन घेणे व अखंड कष्ट यांच्या जोरावर पुंजाराम यांनी शेतीत भरीव कामगिरी करण्यास सुरवात केली. उत्पादन चांगले मिळाले. पैसेही हाती चांगले आले. दुष्काळ, गारपिटीच्या संकटाने उदध्वस्त सर्व काही स्थिर होत आहे असे वाटत होते. सन २०१२ च्या दुष्काळात कारले पिकाचाही प्रयोग केला.पाणीटंचाईमुळे पाणी कमी पडू लागल्याने टॅंकरने पाणी विकत घेऊन उत्पादन सुरू ठेवले. परंतु, गारपिटीच्या संकटाने घाला घातला. संपूर्ण शेडनेट उदध्वस्त झाले. जिद्द सोडतील तर ते पुंजाराम कसले? कोणत्याही परिस्थितीत शेडनेट शेती सोडायची नाही अशीच जिद्द ठेवली होती. हिंमतीने संकटांशी सामना केला. आता ४० गुंठे शेडनेट करायचे असा पण केला. केव्हीके, मित्र परिवार, अडते, व्यापारी यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांचा मोठा आधार मिळाला. बॅंकेतही पत वाढली होती. त्यावर कर्ज मिळाले. शेडनेटमध्ये एका एकरात ढोबळी मिरची घेण्यास सुरवात केली. पुण्यात मार्केटिंगसाठी पुढाकार गटाबरोबर काम करीत असताना पुण्याची बाजारपेठ शोधण्यासाठी पुंजाराम यांनी पुढाकार व कष्ट घेतले. रात्रंदिवस एक करीत गटाची मिरचीदेखील पुणे बाजारपेठेत विकलीदेखील. एकरात सुमारे ४४ टन ढोबळीचे उत्पादन घेण्यात पुंजाराम यांनी यश मिळवले. शेडनेट शेतीत स्थिरता व हुकमीपणा मिळवला. शेडनेटमध्ये टोमॅटो यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जालना केव्हीकेने अर्का रक्षक या टोमॅटो वाणाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत केले. बंगळूर येथील आयआयएचआर या फलोत्पादनातील संशोधन संस्थेतर्फे विकसित ही जात आहे. त्याची रोपेही केव्हीकेने पुंजाराम यांना दिली. नेहमीप्रमाणे मेहनत घेत एका एकरांत सुमारे २० ते २२ टन उत्पादन घेण्यास पुंजाराम यशस्वी झाले. क्रेटला २००, ४०० ते अगदी काही काळ तर एकहजार, १७०० रुपये असाही दर मिळाला. सुमारे साडेपाच लाखांचे उत्पन्न हाती आले. संकटांवर मात करीत कर्जातून पूर्णपणे मुक्त दहा गुंठ्यांसाठी सुरवातीला कोणीही कर्ज देत नव्हते. मग गटांसोबत राहून कर्ज मिळवण्यासाठी केलेले संघर्ष, मग मालाला पुण्याची बाजारपेठ मिळवण्याचा संघर्ष, दर, दुष्काळ, बाहेरून पाणी आणून पिके जगवणे, पुन्हा गारपीट. सर्व शेडनेट उदध्वस्त, मग पुन्हा हिरिरीने उभे राहणे, नवी पिके घेत राहणे, जोडीला पूरक व्यवसाय जोडीत जाणे... अशा संकटाच्या सर्व मालिका झेलत सुमारे ११ ते साडे ११ लाख रुपयांचे कर्ज फेडण्याची कामगिरी पुंजाराम यांनी केली. आज ते पूर्णपणे कर्जमुक्त झाले आहेत. टोमॅटो व्यतिरिक्त काकडी, खुल्या शेतात कोबी, कारले, ढोबळी मिरची यांचेही उत्पादन घेणे सुरूच आहे. शेळीपालनाचा आधार शेतीला जोड म्हणून बंदिस्त शेळीपालन केले असून पंधरा शेळ्या सतत असतात. लेंडीखताचा वापर विविध पिकात होत असून खतांवरील खर्चात बचत झाली आहे. मुलांच्या माध्यमातून शिक्षणाची इच्छा आपल्या दोन मुलांना जालना येथे शिक्षणासाठी ठेवले आहे. आपल्या अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची इच्छा त्यांच्या रूपाने पूर्ण करण्याचा मानस असल्याचे पुंजाराम यांनी अभिमानाने सांगितले. घरचे व तज्ज्ञांचे सहकार्य कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे, श्री. सोनुने, डाॅ. मार्कंडेय, डॉ. कौसडीकर अादी तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. वडिलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कोरडवाहू शेती सांभाळत पुंजाराम यांना मोठे केले. वडील अंकुशराव, पत्नी सौ. मीरा यांची शेतीत मोठी मदत होते. लोकमंगल क्‍लबचे सदस्य व मित्र परिवार यांचे सहकार्य मिळते. दररोज २२ रुपये खर्च पुंजाराम पूर्वी दररोज किमान १० किलोमीटर अंतर कापून ॲग्रोवन घरी घेऊन येत. त्यासाठी वीस रूपयांचे पेट्रोल व अंकाची किंमत दोन रुपये असे २२ रुपये खर्च होत. आर्थिक परिस्थितीही त्यावेळी तेवढी नव्हती. परिसरातील लोकांनाही हे आश्चर्य वाटायचे. पण पुंजाराम यांनी हा दैनंदिन खर्च कधीही कमी केला नाही.

संपर्क : पुंजाराम भूतेकर - ९४०४५४५०६१  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com