जनावरांच्या शरीरावरील जखमांतून धर्नुवात आजाराचे जिवाणू प्रवेश करतात. ऑक्सिजनच्या अनुपस्थित हे बिजाणू रुजल्याने मोठ्या संख्येत क्लोस्ट्रीडियम टिटानी जिवाणू तयार होतात. ते चेतासंस्थेस अतिशय घातक असे विष तयार करतात. मज्जातंतूंद्वारे हे विष मेंदूत प्रवेश करते. क्लोस्ट्रीडियम टिटानी जिवाणू बाधीत जनावरांमध्ये कमीत कमी २ ते ३ दिवस व जास्तीत जास्त ४ आठवड्यात धर्नुवाताची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.
पाय, पोट व शेपूट या अवयवांना कुठल्याही कारणाने झालेल्या जखमा (नांगर, टोकदार दगड किंवा हत्यारे लागणे, प्राणी चावणे इ.) मातीच्या सानिध्यात येतात. नवजात वासरे, करडांच्या नाळेला संसर्ग होऊन जखम होते. विविध आजारांकरिता केलेल्या शस्त्रक्रिया (शेपूट, कान व शिंग कापणे आणि तसेच नर जनावरांचे निर्बीजीकरण) यामुळे होण्याच्या जखमांना संसर्ग होऊन मातीसोबत संपर्क येतो. कुठल्याही प्रकारच्या जखमा (जनावरांची मारामारी, जनावर खाली पडणे व घट्ट दावे किंवा दोरखंड बांधणे) मातीच्या सानिध्यात येतात. जनावरांच्या शरीरावरील जखमांचे वेळीच योग्य उपचार न केल्याने त्या जखमेतून रक्त मिश्रित पू बाहेर येण्यास सुरुवात होते. त्यामुळे जखमांतील पेशी कमकुवत किंवा अकार्यक्षम होतात. या जखमी पेशी क्लोस्ट्रीडियम टिटानी जिवाणूंच्या बिजाणूंशी संपर्क आल्याने लगेच या बिजाणूंचा शरीरात शिरकाव होतो. प्रथम जखमी पेशींमध्ये हे बिजाणू रुजतात आणि जिवाणूंची संख्या वाढून विष (TeNT) तयार होण्यास सुरुवात होते. हे विष शारीरिक हालचाल व इतर कार्य नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूद्वारे मेंदू आणि तेथून शरीरात पोहोचते. मज्जा तंतू व मांस पेशी यांचे जोड अकार्यक्षम होऊन स्नायूंचे कार्य अनियंत्रित होते आणि बाधीत जनावराला अर्धांगवायूचा झटके येण्यास सुरुवात होते. तोंड व श्वसन संस्थेसंबधीत स्नायू ताठर व बद्ध होण्याने अखेरीस जनावराचा तडफडून-तडपडून मृत्यू होत असतो. सुरुवातीला जनावराचे शारीरिक तापमान सामान्य असते. चारा खाण्याकडे अंशतः दुर्लक्ष करतात. अर्धांगवायूचे झटके येण्याच्या अखेरीस शारीरिक तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस पर्यंत वाढते. तीव्र शारीरिक हालचाल होते, शरीर ताठ होऊन,झटके येतात. जनावरे उजेड, आवाज किंवा स्पर्शाला अति वेगाने प्रतिसाद देतात. प्रथम तोंडाच्या स्नायूंना अर्धांगवायूचा झटका येतो. दातखीळ बसते. त्यामुळे जनावर तोंड उघडू शकत नाहीत. त्यानंतर मान, पाठ व पायाच्या भागातील स्नायू ताठर होतात. शरीर लाकडासारखे कडक होते. शरीरातील श्वसन व रक्ताभिसरण संस्थांच्या स्नायूंची हालचाल अनियंत्रित झाल्याने या दोन्ही संस्थांचे कार्य बिघडून जनावराला श्वास घेताना त्रास होतो. रक्तदाब कमी जास्त होऊन श्वसन संस्थांच्या अवयवांना अर्धांगवायूचा झटका येऊन साधारणपणे एक आठवड्याच्या आत जनावराचा मृत्यू होत असतो. जनावरांना जखमा असतील किंवा जखमा झाल्याचा पूर्व इतिहास असल्यास धर्नुवात रोगाचे लक्षणांवरून लवकर निदान करता येते. योग्य उपचाराकरिता धर्नुवाताचे प्रयोगशाळेत अचूक निदान करता येते. यामध्ये, रक्तद्रवामध्ये TeNT विषाची ओळख आणि त्याची पातळी यांची तपासणी करावी लागते. जखमेच्या नमुन्यामधून जिवाणू प्रयोगशाळेत वेगळे करून क्लोस्ट्रीडियम टिटानीची ओळख पटविता येते. रक्तद्रवामधील TeNT विष प्रायोगिक प्राण्यात (उंदीर) टोचून अर्धांगवायूच्या लक्षणांचा अभ्यास करून धर्नुवाताचे निदान करता येते. जनावरांना धर्नुवात झाल्यास मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु योग्य निदान केले गेल्यास, पशुवैद्यकीय सल्ल्याने जनावरांच्या शरीरावरील जखमा प्रतिजैविकाच्या द्रावणाने स्वच्छ कराव्यात. पशू तज्ज्ञांकडून प्रतिजैविके टोचून घ्यावीत. जनावरांच्या स्नायूंना आराम मिळणारी औषधे व वेदनाशामक औषधे दिल्यास आजारातून बरे होण्यास मदत होते. जनावरांना लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. टिटॅनस टॉस्कॉईड लस जनावरांना पशुवैद्यकामार्फत एकदाच दिल्याने धर्नुवातविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नवजात वासरांना व करडांना स्वच्छ जागेत ठेवावे. नाळेला जंतू संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी. - डॉ. संदीप ढेंगे, ९९६०८६७५३६ (पशुशरिरक्रिया शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)