बायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे टाकी, मासे, सूक्ष्म जीव आणि टाकीमध्ये माशांसाठी सूक्ष्म वातावरण.एका टाकीमध्ये शक्यतो एकाच प्रजातीचे मासे ठेवावे.जे मासे जास्त फ्लाक खातात त्यांचे संगोपन केल्याने खाद्याचा खर्च कमी होतो.
पारंपरिक तळयात किंवा शेततळ्यात मत्स्यपालन करताना खाद्य वाया जाते. माशाची वाढ उशिरा होते. बायोफ्लाकमध्ये उपयुक्त सूक्ष्म जीव (हेटरोट्रपीक बॅक्टेरिया) उरलेले खाद्य व माशांची विष्ठा याचे उच्च दर्जाचे नैसर्गिक खाद्यात रूपांतरित करतात. हे खाद्य मासे खातात. त्यामुळे खाद्याचा खर्च कमी लागतो. बायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे टाकी, मासे, सूक्ष्म जीव आणि टाकीमध्ये माशांसाठी सूक्ष्म वातावरण.
लोखंडी जाळी आणि त्यावर उच्च टर्पोलिन प्लॅस्टिकचा वापर करून टाकी तयार केली जाते.आपण सिमेंटची टाकी तयार करू शकतो. परंतु त्यामध्ये तापमान अधिक राहते. निर्मितीचा खर्च जास्त असतो. ही टाकी गोलाकार असते. सरासरी आकार ४ मीटर × ४ मीटर ×१ मीटर असतो. यामध्ये १०,००० लिटर पाणी साठवता येते. टाकीच्या खालच्या बाजूला पाणी काढण्यासाठी आऊटलेट पाईप असतो. तसेच प्रत्येक टाकीमध्ये एरीएटर पाईप व एरीएटर स्टोन असतात. ज्यामुळे सतत पाणी फिरत राहते आणि ताजी हवा पाण्यात मिळत राहते. डायफाम पंप हा एरीएटर पाईपला जोडलेला असतो. एरीएटर स्टोनचा पाईप टॅंकमध्ये खूप वर किंवा खूप खाली ठेवू नये. ज्यामुळे पाणी, हवा, टोटल सॉलीड्स, फ्लाक योग्य रितीने मिळत राहतात. संपूर्ण बायोफ्लाक सेटअप हिरव्या शेडनेटने झाकल्याने तापमान नियंत्रित राहते, जे माशांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. बायोफ्लाक पद्धतीत सतत टॅंकमध्ये हवा सोडावी लागते. आपत्कालीन विजेसाठी इन्व्हरर्टर किंवा जनरेटर आवश्यक आहे. मासे सोडण्यापुर्वी टाकी पूर्णपणे तयार करावी. त्याकरिता २ ते ४ आठवडे लागतात. अगोदर सॅनीटाईजरने स्वच्छ करावे. त्यानंतर धुवून, पाणी भरून त्यात माती, गाईचे शेण किंवा केळीचे पान त्यात काही दिवस राहू द्यावे. याचबरोबर मळी, चुना, प्रोबायोटीक मिसळावे. ज्यामुळे गुणकारी सूक्ष्मजीव वाढून फ्लाक तयार करतात. दुसऱ्या चालू टाकीमधून देखील कल्चर आणून नवीन टाकीत वापरता येते. हे सगळे उपाय केल्यानंतर २ ते ३ आठवड्यात टाकी तयार होते. पाणी भरून मासे सोडावेत. टाकीमधील पाणी आणि वातावरण पाण्याचा वापर
बायोफ्लाकमध्ये वारंवार पाणी बदलायचे नसते. अधून-मधून ५ ते १० टक्के पाणी काढता येते. टाकीतून जास्त प्रमाणात पाणी काढले किंवा नवीन पाणी भरले तर फ्लाक पाण्यासोबत निघू शकतो किंवा पाण्यातील सूक्ष्म वातावरण बिघडते. पाण्यात औषधीचा वापर करू नये, यामुळे हानिकारक जीवजंतू सोबत उपयुक्त जिवाणू सुध्दा मरतात. टाकीमधील सूक्ष्म वातावरण बदलते. टाकीमध्ये टीडीएस नेहमी १८०० पेक्षा कमी ठेवावे (टीडीएस ३५०-१८००). याकरता त्यात मीठ मिसळावे. याचा दुसरा फायदा म्हणजे मीठ सॅनीटायझरचे पण काम करते. तसेच फ्लाक निर्मितीमध्ये याची गरज असते. आपत्कालीन स्थितीसाठी नेहमी एक रिकामी टाकी तयार ठेवावी. या पद्धतीमध्ये संपूर्ण माशांचे चक्र १०,००० लिटर पाण्यामध्ये होते. टाकीमधील पाण्याचा सामू ६.८ -७.४ किंवा ७.५ - ८ या दरम्यान ठेवावा. सामू कमी झाला असेल तर टाकीमध्ये मळी, प्रोबायोटीक किंवा भाजलेला चुना टाकावा. मळी टाकल्यामुळे कार्बन, नायट्रोजन गुणोत्तर १२ः१ /१५ः१ येते. हे गुणोत्तर उपयुक्त सूक्ष्म जीवांची वाढ जलद करते. ज्यामुळे टाकीमधील नाईट्राईट वापरले जाते. सामूबरोबर होऊन फ्लाक लवकर वाढतो. चुना सामू स्थिर करण्यात मदत करतो. नाईट्रेट/नाईट्राईट चे प्रमाण ० - ०.२५ टक्के या प्रमाणापेक्षा वाढू देवू नये, अन्यथा मासे मरतात किंवा वाढ खुंटते. सामू कमी होतो, तेव्हा फ्लाक नष्ट होतो. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन(डीओ) कमी होतो. पाण्यातला डीओ २ टक्के गेल्यावर मासे हवेतून श्वास घेण्याचा प्रयत्न करतात आणि थोड्या वेळाने मरू लागतात. रोहू किंवा कटला ः १००० नग प्रोबायोटीक: २५० मिलि/१००० लिटर पाणी, प्रति ७ दिवसासाठी काळागूळ (मळी नसल्यास) १ किलो/ ५ लिटर पाणी भाजलेला चुना: १०० ग्रॅम / १००० लीटर पाणी मासे खाद्य खात राहतात, तेव्हा काही खाद्य राहून जाते. राहिलेले खाद्य आणि माशांची विष्ठा या दोघांवर सूक्ष्म जीव मळी किंवा काळा गूळ यांचा वापर करून फ्लाक बनवतात. जे माशांचे नैसर्गिक खाद्य आहे. टाकीमधील सस्पेंडेड सॉलीड्स(एस.एस) ५०० -१००० प्रती लिटर या दरम्यान आहे की नाही याची तपासणी करावी. एस एस ची योग्य मात्रा २०० -५०० मिलि ग्रॅम/ लिटर असावी. बाजारात मागणी असलेल्या माशांचे टाकीमध्ये संगोपन करावे. एका टाकीमध्ये शक्यतो एकाच प्रजातीचे मासे ठेवावे. जे मासे जास्त फ्लाक खातात त्यांचे संगोपन केल्याने खाद्याचा खर्च कमी होतो. उदा. तिलापीया व पगासियस मासे
खूप जास्त मासे एका टाकीमध्ये ठेवू नयेत. त्यामुळे खाद्य व ऑक्सिजन कमी होतो. सूक्ष्म वातावरण बदलते, वाढ होत नाही. माशाच्या प्रजातीनुसार टाकीमध्ये खाद्य आणि वातावरण नियंत्रित करावे. माशांना वारंवार हाताळू नये, त्यामुळे रोग वाढतात. १५ ते २० दिवसात त्यांचे वजन करावे. बायोफ्लाक पद्धतीमध्ये शेततळ्यापेक्षा मासे चांगल्या प्रकारे वाढतात. - डॉ. ए.के.वानकर,९८६०५८८१४९ (सहायक प्राध्यापक, पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)