मसाला पिके, भाजीपाला उत्पन्नाचे नवे साधन

रत्नागिरी जिल्ह्यात नारळ, सुपारी बागांमध्ये आंतरपीक म्हणून मसाला पिकांची लागवड वाढली आहे. याचबरोबरीने महिला बचत गटांच्या माध्यमातून गावोगावी भातशेतीनंतर भाजीपाला लागवड हे उत्पन्नाचे नवे साधन तयार झाले आहे.
black pepper cultivation
black pepper cultivation

रत्नागिरी जिल्ह्यात नारळ, सुपारी बागांमध्ये आंतरपीक म्हणून मसाला पिकांची लागवड वाढली आहे. याचबरोबरीने महिला बचत गटांच्या माध्यमातून गावोगावी भातशेतीनंतर भाजीपाला लागवड हे उत्पन्नाचे नवे साधन तयार झाले आहे.

कोकण म्हटलं, की आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकमसह भातशेतीचे चित्र समोर येते. मात्र गेल्या दहा वर्षांत हे चित्र बदलताना दिसत आहे. गुहागर, चिपळूण, दापोली आणि रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नारळ, सुपारीच्या बागेत मसाला पिकांच्या लागवडीला चालना दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भातासह फळपिकांच्या लागवडीखाली सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यामध्ये पेरणीचे क्षेत्र सुमारे ९३ हजार हेक्टर आणि फळपिकांखालील क्षेत्र सुमारे १ लाख ५२ हजार हेक्टर आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात फळझाडांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. तसेच, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतही फळबाग लागवडीला गती मिळाली. आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवडीच्या बरोबरीने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नारळ, सुपारीमध्ये जायफळ, काळी मिरी, लवंग, दालचिनी, लागवडीला प्राधान्य दिले. जिल्ह्यात सुमारे १०० हेक्टरवर मसाले पिकांची लागवड झाली आहे. प्रामुख्याने गुहागर, चिपळूण, दापोली तालुक्यांमध्ये मसाला पिकांची लागवड वाढत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि रत्नागिरीतील नारळ संशोधन केंद्राने शेतकरी गट आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मसाले पिकांचे महत्त्व, लागवड तंत्र आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याची सखोल माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांनी नारळ, सुपारीच्या बागांमध्ये विविध मसाला पिकांच्या लागवडीला प्राधान्य दिले. यामध्ये सर्वाधिक लागवड काळी मिरीची आहे. त्याचबरोबर जायफळ, लवंग, दालचिनी लागवड क्षेत्र टप्प्याटप्प्याने वाढत आहे. मिरी पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे. मसाला पिकांना मुंबईची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

बचत गटातून भाजीपाला लागवडीला चालना  कोकणात भातशेती झाल्यानंतर वायंगणी शेतीपद्धत रुजली आहे. भातशेतीनंतर उपलब्ध पाण्यावर शेतकरी पंचक्रोशीतील बाजारपेठेचा अंदाज घेत पालेभाज्या, फळभाज्यांच्या लागवडीकडे वळले. भाजीपाला लागवड ही दिवाळीनंतर सुरू होते. सर्वसाधारणपणे जानेवारीपासून पुढे भाजीपाला लागवडीतून उत्पन्न सुरू होते. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, पावस परिसरातील गावे भाजीपाल्यासाठी ओळखली जाऊ लागली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्यावर्षी कार्यरत असणाऱ्या दहा हजार महिला बचत गटांनी भाजीपाला लागव़ड, प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, शेळीपालनातून  सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. याचबरोबरीने पर्यटकांच्या ओघामुळे कलिंगडाखालील क्षेत्रही वाढत आहे. चिपळूण, रत्नागिरी तालुक्यात शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून हळद लागवडीला चालना मिळाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com