पावसाची उघडीप आणि तापमानात वाढीदरम्यान नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत तसेच पूर्ण वाढलेल्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाची सोंडणे पुरावीत. नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची वाढत्या उन्हामुळे पाने करपू नये म्हणून पहिली दोन वर्षे रोपांना वरून सावली करावी. पावसाची उघडझाप आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आंब्याला पालवी फुटण्यासाठी पोषक वातावरण असल्याने नवीन पालवीवर तुडतुडे आणि मिज माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यापासून संरक्षण करण्यासाठी, डेल्टामेथ्रीन (२.८% प्रवाही) ०.९ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा बागेतील गवत, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाई करावी. नंतर कीटकनाशकाची फवारणी करावी. पावसाची उघडझाप आणि तापमानात वाढीची शक्यता आहे. काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसतो. कीड पालवीतील रस शोषून घेत असल्यामुळे नवीन पालवी सुकून जाते. नियंत्रण ः फवारणी प्रति लिटर पाणी मोनोक्रोटोफॉस (३६ टक्के प्रवाही) १.५ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. (टीप: कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.) काजू बागेतील गवत, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाई करावी आणि नंतर कीटकनाशकाची फवारणी घ्यावी. तापमानात वाढीची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेली सुपारी झाडे तसेच पूर्ण वाढलेल्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. नवीन लागवड केलेल्या सुपारीच्या रोपांची वाढत्या उन्हामुळे पाने करपू नये म्हणून पहिली दोन वर्षे वरून सावली करावी. फुलोरा अवस्था (गरव्या जाती), दाणे भरणे अवस्था (निमगरव्या जाती) आणि परिपक्वता अवस्था (हळव्या जाती) पुढील पाचही दिवस सर्वसाधारणपणे पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. गरवे भात खाचरात पाण्याची पातळी ५ ते १० सें.मी.पर्यंत आणि निम गरवे भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. नियंत्रित करावी. तसेच हळवे भात परिपक्व अवस्थेत असल्यास कापणीपूर्वी ८ ते १० दिवस खाचरातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. पूर्ण पक्व झालेल्या हळवे भाताची रोपे हिरवी असतानाच सकाळच्या वेळेस वैभव विळ्याने जमिनीलगत कापणी करावी. कापणी केलेले भात पीक लगेच मळणी करावी. धान्य कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे. तयार भाताची कापणी उशिरा केल्यास लोंबीच्या टोकाचे चांगले दाणे शेतात पडतात. भात कांडपाच्या वेळी कणीचे प्रमाण वाढते. पिकाची कापणी जमिनीलगत करावी. कापणीनंतर शेताची नांगरट करून धस्कटे काढून नष्ट करावीत. यामुळे पुढील हंगामात खोड कीड आणि निळे भुंगेरे याचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. गरवे भात पीक फुलोरा अवस्थेत असताना नत्र खताची तिसरी मात्रा २८ किलो युरिया प्रती एकरी देण्यात यावी. पावसाची उघडीप आणि तापमानात वाढ संभवते. अशा वेळी माळजमिनीवर असलेल्या हळव्या जातीच्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे तयार झालेल्या हळव्या भात पिकाची त्वरित कापणी करावी. तसेच भात कापणी नंतर जमिनीची खोल नांगरणी करावी. किडीचे सुप्तावस्थेतील कोष नष्ट होण्यास मदत होईल. सध्या सकाळच्या वेळेस जास्त आर्द्रता दिसून येत आहे. दुधाळ अवस्थेत असलेल्या निमगरव्या आणि गरव्या भात पिकावर लोंबीवरील ढेकण्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दुधाळ अवस्थेतील पिकांवर प्रौढ ढेकण्या व त्याची लहान पिल्ले दाण्याला छिद्र पाडून आतील रस शोषून घेतात. परिणामी दाणे पोचट राहतात आणि लोंब्या अर्धवट भरतात. अशा दाण्यावर एक सूक्ष्म छिद्र दिसून येते. छिद्राभोवती काळपट, तपकिरी ठिपका तयार होतो. किडीच्या नियंत्रणासाठी बांधावरील गवत कापून बांध स्वच्छ ठेवावेत. ढेकण्या नियंत्रण ः फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.लि किंवा डेल्टामेथ्रीन (२.८% प्रवाही) ०.९ मि.लि. (टीप: कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत,मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.) रब्बी हंगामासाठी वांगी, मिरची, टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकाची रोपे तयार करण्याकरिता जमीन वाफसा स्थितीत असताना मशागत करावी. वाफे तयार करण्याअगोदर जमिनीत चांगले कुजलेले शेणखत ५०० किलो प्रति गुंठा मिसळावे. ३ मी. लांब x १ मी. रुंद x १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावे. पेरणीच्या वेळेस गादीवाफ्यावर प्रती चौरस मीटर ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मिसळून १० सें.मी. अंतरावर ओळीने भाजीपाला बियाणांची पेरणी करावी. पेरणी करण्याअगोदर बियाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करतेवेळी किंचित पाणी लावून जैविक बुरशीनाशकाचे पातळ आवरण बियाण्याभोवती होईल असे पहावे.
दुभती जनावरे फुलोऱ्यावर असलेल्या हिरवा चाऱ्याची मुरघास पद्धतीने साठवण करावी. यासाठी प्रत्येकी १०० किलो बारीक तुकडे केलेल्या गवतावर ५ ते ६ लिटर पाण्यामध्ये तयार केलेले द्रावण (२ किलो गूळ अधिक अर्धा किलो युरिया अधिक १ किलो मीठ) शिंपडावे. प्रक्रिया केलेल्या गवताचे थर रचून बाजारात सहज उपलब्ध असलेल्या प्लास्टिक सायलो पूर्ण भराव्यात. पाऊस आणि उष्णतेपासून संरक्षणासाठी सायलो शेडमध्ये ठेवावेत. अशा पद्धतीने २-३ महिन्यामध्ये मुरघास जनावरांना खाण्यासाठी तयार होतो.
- डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (ग्रामीण कृषी मौसम सेवा,डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,जि.रत्नागिरी)