कोरडवाहू शेतीमध्ये पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. जमिनीच्या मगदुरानुसार पीक लागवड आणि पध्दतीचे नियाजन करावे. लवकर येणाऱ्या पिकांच्या जातींना प्राधान्य देवून सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन ठेवावे.
पावसाची सुरुवात वेळेवर होते. त्यानंतर काही वेळा पावसाचा खंड पडतो.परत पुन्हा पावसाची सुरुवात होते. यामुळे पीक वाढीच्या कालावधीवर परिणाम होतो.जिरायती पिकाची पेरणी १०० मि. मी. पाऊस झाल्यावर लगेच करावी. भारी जमिनीमध्ये सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, कापूस लागवड करावी. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये सूर्यफूल, मटकी, कारळा, तीळ, ज्वारी लागवड करावी.
योग्य पाऊस होताच (७५ ते १०० मि.मी.) पेरणी करावी. पेरणी बरोबर रासायनिक खतांची मात्रा द्यावी. पाऊस उशिरा सुरु झाल्यास आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा. पेरणीपूर्व मशागत, बीजप्रक्रिया, आंतरमशागत एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि एकात्मिक पीक संरक्षणाचा अवलंब करावा. मूलस्थानी जलसंधारणाकरीता रुंद वरंबा सरी पध्दतीवर पेरणी करावी. पूर्वमशागत करीत असताना शिफारशीनुसार शेणखताचा वापर करावा. मृद व जलसंधारणाकरीता बांधबंदिस्ती, ओघळ, नाले इतर उपचाराची दुरुस्ती करावी. जास्त पाऊस झाल्यास शेतात साचलेले पाणी लवकर शेताबाहेर काढावे. पाऊस झाल्यानंतर तीन दिवसांनी वखर पाळी देऊन पेरणी करावी. जेणेकरुन तणाचा बंदोबस्त करणे शक्य होते. जमीन व पाऊसमानानुसार पीक पध्दती निवडावी. मध्यम ते भारी जमिनीत सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, मूग, उडीद यांचा समावेश करावा. मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन ही पिके निवडावीत. हलक्या जमिनीमध्ये बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी, भगर या पिकांची लागवड करावी. आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. त्यामध्ये सोयाबीन + तूर (४:२), कापूस + सोयाबीन/ मूग/उडीद (१:१), बाजरी + तूर (४:२) किंवा (३:३), एरंडी + भुईमूग (२:४), तूर + तीळ (२:४), खरीप ज्वारी + तूर (३:१) किंवा (२:१), कापूस + तूर (६:१), या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. पाऊस खंडाच्या काळात कोळपणी करावी. त्यामुळे उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन होण्यास मदत होते. तण नियंत्रणासोबत जमीन भुसभुशीत होऊन भेगा बुजल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. रोपाची विरळणी करुन जमिनीतील अन्न, पाणी याची बचत करावी. झाडांची योग्य संख्या राखली जाते. दोन ओळी आणि दोन झाडांत योग्य आंतर ठेवावे. पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी पिकास सरी आड पध्दतीने पाणी द्यावे. तुषार सिंचनाचा अवलंब करावा. लवकर येणाऱ्या जातीचा अवलंब करावा. बियाण्याचे प्रमाण प्रती हेक्टरी योग्य ठेवावे. बीज प्रक्रियेचा अवलंब करावा. शेणखत, रासायनिक खते, जिवाणू संवर्धन, बिजप्रक्रिया यांचा अधिक उत्पादनासाठी अवलंब करावा. ५० ते ७५ टक्के रासायनिक खताबरोबर २५ ते ५० टक्के शेणखताचा वापर करावा. त्यामुळे जमिनीचे जैविक, भौतीक व रासायनिक गुणधर्म सुधारतात. जमिनीची मशागत व पेरणी उताराला आडवी करावी. पावसाचे पाणी जमिनीत जास्त मुरुन पिकांना फायदा होईल. पेरणीसाठी प्रमाणित बियाणांचा वापर करावा.सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांचे बियाणे ३ वर्षांपर्यत वापरता येते. - डॉ. वासुदेव नारखेडे, ९८२२९९२८६४ (अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)