अश्वगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. अश्वगंधाच्या फांद्यावर तांबूस लव असते. झाडांची उंची ३० ते १५० सेंमी असते. वनस्पतीची मुळे सरळ, मांसल, पांढरट तपकिरी मजबूत चिवट व पीळदार असून वरील बाजूस जाड व खाली निमुळती होत जातात. पाने गुळगुळीत, साधी दातीरी, ५ ते १० सेंमी लांब व त्यावर पांढरी लव असते. फुले लहान, हिरवट पिवळी १ सेंमी लांब देठरहीत आणि पाच फुले एकत्रित आढळतात. पुंकेसर फुलांच्या गुच्छात असतात. फळे गोलाकार, मऊ पिकल्यावर तांबड्या रंगाची होतात व फळावर पातळ आवरण असते. बिया रंगाला पिवळ्या आणि किडणीच्या आकाराच्या असतात.
लागवडीसाठी चांगला निचरा होणारी, भुसभुशीत, हलक्या व रेताड तांबड्या जमिनीची निवड करावी. मुरमाड व भारी जमिनीत लागवड करू नये. सामू ७.५ ते ८.५ असलेल्या जमिनीत चांगली वाढ होते. कोरडे, थंड हवामान आणि कमी पाऊस या वातावरणात पिकाची चांगली वाढ होते. दमट वातावरणात चांगली वाढ होत नाही. असगंध २०, जवाहर असगंध १३४ व राजविजय असगंध १०० जुलै महिन्यात बियाण्याची पेरणी करावी. लागवडीसाठी हेक्टरी ५ किलो बियाणे पुरेसे आहे. पेरणीपूर्वी बियाणे २४ तास थंड पाण्यात बियाणे भिजत ठेवावे. नंतर सुकवावे. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास मॅंकोझेब ३ ग्रॅमची प्रक्रिया करावी. गादी वाफ्यावर रोपे तयार करावीत. साधारणपणे ४५ दिवसांत रोपे तयार होतात. अश्वगंधाची अभिवृद्धी बियांपासून होते. बिया थेट शेतात पेरतात किंवा गादीवाफे तयार करून पेरल्या जातात. रोपे तयार झाल्यावर त्यांची शेतात लागवड केली जाते. गादी वाफ्यावर बी वापरून रोपे तयार करावीत. बिया ६ ते ७ दिवसांनी रुजतात. रोपे ६ आठवड्यांची झाल्यावर ६० बाय ३० सेंमी अंतरावर लावावीत. रोप लागवड ऑगस्ट महिन्यात करावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. लागवडीनंतर एक महिन्याने हेक्टरी २५ किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावे. दोन महिन्यानंतर २५ किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. आंतर मशागत पाभरीने पेरणी केल्यास उगवणीनंतर प्रती चौ. मी. जागेत ७ ते १२ रोपे ठेवावीत. विरळणी वेळी रोग विरहीत, चांगली जोमदार रोपे ठेवावीत. तण नियंत्रणासाठी २ ते ३ खुरपण्या करून झाडांना मातीची भर द्यावी.
अश्वगंधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आठ अल्कालॉइडस आढळून येतात. ज्यांपैकी इथेनीन, विथाफेरीन आणि सोमनीफेरीन ही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वनस्पतीची मुळे, पाने, हिरवी फळे, बिया औषधासाठी महत्त्वाच्या आहेत. ही वनस्पती शरीराला पुष्टी देणारी, वात, क्षय, दमा, खोकला, कृमी यांचा नाश करणारी आहे. मुळाची भुकटी शक्तिवर्धक असते. मुळांचा उपयोग शारीरिक कमजोरी कमी करण्यासाठी, संधिवात, धातुविकार, विर्यवृध्दी, चर्मरोग व अपचनासाठी केला जातो. फळाची भुकटी लहानापासून वयोवृद्धांपर्यंत उत्तम प्रकारचे टॉनिक आहे. उचकी, त्वचारोग, उच्च रक्तदाब, मूळव्याधीवर गुणकारी आहे. तसेच शांत झोप येण्यासाठी उपयोगी आहे. कंबरेच्या त्रासासाठी मुळांचा उपयोग केला जातो. पानांचा उपयोग रक्तस्रावावर केला जातो. मूत्र विकारावर फळे उपयोगी आहेत. - एस. एस. शिंदे, ९४०४२०१९९५ (कृषी वनस्पतिशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)