शेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३ मीटर ठेवावे. लागवडीसाठी शिफारशीत जातींची निवड करावी.लागवडीनंतर आंतर मशागत, प्रमाणित खतांचा वापर, झाडाची योग्य छाटणीकडे लक्ष द्यावे.
शेवग्याची लागवड हलक्या ते भारी जमिनीत येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे अशा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो. कोकणातील शेवगा तर केवळ पावसावरच येतो. मराठवाडा आणि विदर्भातील भारी काळ्या जमिनीतही शेवग्याची लागवड होते, परंतु अशा जमिनीत झाडे उंच वाढतात. पानांची वाढ जास्त, ताण चांगला बसत नाही. त्यामुळे फुलांचे आणि शेंगांचे प्रमाण कमी होते. लागवड
व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड करताना ६० सें.मी. लांब, रुंद आणि खोल खड्डे घ्यावेत. खड्ड्यांमध्ये चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, १५:१५:१५ हे खत २५० ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा प्लस ५० ग्रॅम या मिश्रणाने खड्डा भरावा. लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३ मीटर ठेवावे. शेवग्याची अभिवृद्धी फाटे कलम व बियांपासून रोपे तयार करून केली जाते. परंतु बियाणापासून लागवड केल्यास मातृवृक्षाप्रमाणे गुणधर्म असलेली झाडे मिळू शकत नाहीत. तसेच बिया लागवडीपासून केलेल्या झाडापासून शेंगा फाटे कलमापेक्षा ३ ते ४ महिने उशिरा मिळतात. फाटे कलमापासून लागवडीसाठी ५ ते ६ सें.मी. जाडीच्या सुमारे १ ते १.२५ मीटर लांबीच्या फांद्या वापरतात. कमी पावसाच्या प्रदेशात जून - जुलैमध्ये पहिल्या पावसानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो. हवेतील आद्रता वाढते. अशी हवा फाटे कलम फुटण्यास किंवा रोपे रुजण्यास अनुकूल असते. फाटे कलम किंवा रोपे लावल्यावर त्याच्या जवळील माती पायाने चांगली दाबून पाणी द्यावे. लागवडीनंतर ६ ते ८ महिने गरज पडेल तेव्हा पाणी देवून झाडे जगवावी किंवा झाडाच्या प्रत्येक खड्ड्यात २ ते ३ लिटर पाणी बसेल अशा क्षमतेचे मडके जमिनीत गळ्यापर्यंत गाडावे. त्यामध्ये सहा दिवसाच्या अंतराने पाणी भरावे. मडक्याच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापडाची लहान चिंधी बसवलेली असावी. लागवडीला ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. झाडे मोठी झाल्यावर पाण्याची गरज भासत नाही. आंतरपीक म्हणूनही शेवगा पीक घेता येते. कलमी आंबा, चिकू, जांभूळ, फणस व गावठी आंबा यांच्या झाडांमधील मोकळ्या जागेत पहिले ५ ते ६ वर्ष आंतरपीक म्हणून शेवगा घेता येतो. लागवडीनंतर आंतर मशागत, प्रमाणित खतांचा वापर, झाडाची योग्य छाटणीकडे लक्ष द्यावे लागते. लागवडीत फारशी आंतरमशागत करावी लागत नाही. तरीसुद्धा झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावीत. तसेच दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाते. प्रतिवर्षी प्रत्येक झाडास पावसाच्या सुरुवातीस १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) व ७५ ग्रॅम पालाश (१२० ग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश) द्यावे. शेवग्याची झाडे झपाट्याने वाढत असल्याने झाडांना आकार देणे आवश्यक आहे. योग्य आकार दिला नाही तर झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणी अवघड जाते. यासाठी लागवडीनंतर दोन ते अडीच महिने किंवा मुख्य खोड ३ ते ४ फूट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी. यावेळी खोड जमिनीपासून १ मीटर अंतरावर छाटावे आणि चार दिशाला चार फांद्या वाढू द्याव्यात. झाडांची उंची कमी होवून शेंगा काढणे सोपे जाईल. त्यानंतर ३ ते ४ महिन्यांनी चारीही फांद्या मुख्य खोडापासून एक मीटर अंतरावर छाटाव्यात. त्यामुळे झाडाचा मुख्य आराखडा तयार होईल. झाडांची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाते, उत्पादन वाढते. झाड जुने होईल तसतसे दर दोन वर्षांनी एप्रिल - मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी, म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल. लागवडीपासून सुमारे सहा ते सात महिन्यानंतर प्रत्येक हंगामात एक चांगल्या झाडापासून सुमारे २५ ते ५० किलो शेंगा मिळतात. पूर्ण वाढीच्या आणि ज्यांचा पीळ पूर्ण उलगडला आहे, अशा शेंगा लांबीनुसार जुळवून घ्याव्यात. प्लॅस्टिक कागद गोणपाटावर गुंडाळल्यास शेंगांचा तजेला जास्त काळ टिकून राहतो. चांगली शेंग म्हणजे शेंगांची लांबी ५० ते ६० सें.मी. असावी. त्यात भरपूर गर असावा. कडवट चव असणाऱ्या शेंगास दर मिळत नाही. शेंगा काढल्यानंतर त्याचा ताजेपणा २ ते ३ दिवस टिकून राहावा. बऱ्याच वेळा शेंगा लवकर पोचट होतात. दोन्ही हंगामात भरपूर शेंगा देणारे असे एखादे झाड निवडावे. अशा झाडाचे फाटे वापरून लागवड केली असता चांगले उत्पादन देणारी जात मिळू शकते. कोइमतूर येथील तामिळनाडू कृषि विश्वविद्यालयामध्ये कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या लवकर शेंगा येणारे व भरपूर प्रथिने असणाऱ्या जाती आहेत. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने कोकण रुचिरा जात प्रसारित केली आहे. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच असून १६ ते २२ फांद्या असतात. बागलकोट (कर्नाटक) येथील विद्यापिठाने चांगली उत्पादन देणारी 'भाग्या' ही जात विकसित केली आहे. - डॉ. सखेचंद अनारसे, ७५८८६०४१३० (अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि.नगर)