शेळ्या- मेंढ्यांमधील आंत्रविषार

मोठ्या शेळ्या-मेंढ्या तीव्रतेनुसार काही दिवसांपर्यंत आजारी राहतात. ज्यामध्ये ताप येणे, तोंडातून फेस येणे, अडखळत चालणे, तोल जाणे, गोल फिरणे, चक्कर येणे तसेच श्वसनास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसतात.
goat farming
goat farming

मोठ्या शेळ्या-मेंढ्या तीव्रतेनुसार काही दिवसांपर्यंत आजारी राहतात. ज्यामध्ये ताप येणे, तोंडातून फेस येणे, अडखळत चालणे, तोल जाणे, गोल फिरणे, चक्कर येणे तसेच श्वसनास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसतात. 

शेळ्या-मेंढ्यांना होणारा आंत्रविषार हा पावसाळ्यात अधिक प्रमाणात आढळणारा आजार आहे. पावसाळ्यात उगविलेले कोवळे लुसलुशीत गवत भरपूर प्रमाणात खाल्ल्यामुळे शेळ्या- मेंढ्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव  दिसून येतो. आंत्रविषार हा जिवाणूंमुळे होणारा अति तीव्र ते तीव्र स्वरूपाचा आजार असून बहुतेक वेळेस आजारी शेळ्या,मेंढ्यांना उपचार करण्यास वेळ सुद्धा मिळत नाही.  हा आजार क्लोस्ट्रीडीयम परफ्रिंजन्स नावाच्या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूंची वाढ ऑक्सिजन विरहीत वातावरणात होते. हे जिवाणू थोड्या अधिक प्रमाणात जमिनीत व जवळपास प्रत्येक जनावरांच्या आतड्यात वास्तव्य करून राहतात. परंतु अनुकूल वातावरण म्हणजे ऑक्सिजन विरहित वातावरण नसल्यामुळे आजार होण्याइतपत जिवाणूंची वाढ होत नाही. परंतु जेव्हा कधी शेळ्या,मेंढ्यांना उत्तम खाद्य पदार्थ जसे ज्वारी, मका, गहू, चारा, लुसलुशीत गवत अचानक मिळते, तेव्हा त्या अधिक प्रमाणात खातात. त्यामुळे पोट गच्च होतो, अपचन होते, आतड्यांची गती मंदावते. खाल्लेले अन्न पोट व आतड्यांमध्ये दीर्घ कालावधीसाठी साठते. यामुळे ऑक्सिजन विरहित वातावरण निर्माण होऊन क्लोस्ट्रीडीयम परफ्रिंजन्स जिवाणूंची अधिक प्रमाणात वाढ होते. हे जिवाणू खूप मोठ्या प्रमाणात विष तयार करतात. हे विष आतड्यांद्वारे संपूर्ण शरीरात शोषले जाते. या विषामुळे मेंदू, आतडे, मूत्रपिंड व इतर आंतरिक अवयवांना इजा होते. त्यामुळे आजारी पडून मृत्यू होतो. हा आजार मुख्यतः तीन ते वीस आठवडे वयाच्या शेळ्या,मेंढ्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. लहान कोकरांना/करडांना आजाराचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दूध प्यायल्यामुळे होते.

लक्षणे 

  • हा आजार सर्व वयोगटातील शेळ्या-मेंढ्यांना होतो. परंतु लहान करडे व कोकरांमध्ये मृत्यूदर अधिक प्रमाणात दिसून येतो. 
  • हा आजार  कमी कालावधीचा आहे. प्रादुर्भाव झाल्यापासून दोन ते बारा तासात मृत्यू होतो. शेळ्या,मेंढ्यांना  निस्तेज दिसतात. एका जागेवर बसून राहतात, दूध पीत नाही, पातळ हिरव्या रंगाची संडास करतात, तोंडास फेस येतो, फिट येते.
  • बाधित पिल्ले हवेत उडी मारून जमिनीवर पडतात, मान वाकडी होते. त्यांचा मृत्यू होतो. 
  • मोठ्या शेळ्या-मेंढ्या तीव्रतेनुसार काही दिवसांपर्यंत आजारी राहतात. ज्यामध्ये ताप येणे, तोंडातून फेस येणे, अडखळत चालणे, तोल जाणे, गोल फिरणे, चक्कर येणे तसेच श्वसनास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसतात. 
  • शेवटच्या टप्प्यात पोटफुगी, जुलाब ही लक्षणे आढळून येतात. पोट फुगल्यामुळे जनावर उठबस करतात. सारखे पाय झाडतात. 
  •  शवविच्छेदन केल्यास आजारी जनावरांची आतडी रक्ताळलेली किंवा लालसर दिसते, हृदयाच्या पिशवीमध्ये पाणी जमा झालेले दिसते, त्याचप्रमाणे मूत्रपिंडे मोठे होऊन लाल बिलबिलीत किंवा नरम झाल्याचे आढळून येते. बाधित जनावरांच्या मूत्राची तपासणी केले असता त्यातील शर्करेचे प्रमाण वाढल्याचे आढळून येते.
  • प्रतिबंध आणि उपचार 

  • अल्प मुदतीचा आजार असल्यामुळे प्रभावी उपचार करणे शक्य होत नाही. यासाठी अधिक खर्च सुद्धा होतो. 
  • पशुवैद्यकाच्या साह्याने विशिष्ट प्रतिजैविके दिल्यास पोटातील विष शोषण्याचे प्रमाण कमी होते. जिवाणूंची वाढ थांबते, कळपातील मरतुक कमी होऊ शकते.
  • एखादे लिव्हर टॉनिक व शिरेवाटे ग्लुकोज दिल्यास फायदा होऊ शकतो.
  • प्रथमोपचार म्हणून लहान पिलांना हगवण सुरू झाल्यानंतर मीठ पाण्याचे किंवा इलेक्ट्रोलाईटचे द्रावण पाजावे.
  • आजारास प्रतिबंध करणे अत्यंत सोपे, कमी खर्चाचे व प्रभावी  माध्यम आहे. मुख्यतः लसीकरण व आहारातील व्यवस्थापन करून या आजाराचा प्रादुर्भाव टाळता येतो. 
  • आजारावर अत्यंत प्रभावी अशी लस बाजारामध्ये उपलब्ध आहे. तीन ते चार महिने वयोगटातील कोकरांना लस टोचावी. त्यानंतर पुन्हा तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती तयार होऊन आजारापासून बचाव होईल. त्यानंतर दर सहा महिन्यांनी लसीकरण करावे.
  •  कोवळे लुसलुशीत हिरवे गवत व धान्य (ज्वारी, मका, गहू) यासारखे पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यास देऊ नये. त्याचप्रमाणे कोकरांना/ करडांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजू नये. खाद्यामध्ये योग्य प्रमाणात खनिज मिश्रणे द्यावीत. जेणेकरून लहान पिल्ले माती खाणार नाही. 
  • गोठ्याची स्वच्छता ठेवावी. आहारात अचानक बदल करू नये, जेणेकरून अधिक प्रमाणात खाणार नाही. 
  • आजारी शेळ्या,मेंढ्यांना ताबडतोब वेगळे करून औषधोपचार करावा. 
  • गोठ्यावर नवीन शेळ्या आणल्यास त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवावे. लसीकरण करूनच जुन्या कळपामध्ये सोडवाव्यात.
  • पावसाळ्याच्या सुरुवातीला जंतनाशक द्यावे. जेणेकरून पचनशक्ती चांगली राहील. अपचनासारखे आजार होणार नाही.
  •  - डॉ. भुपेश कामडी, ७५८८२२६०१८.  - डॉ. विठ्ठल धायगुडे, ९०८२२९२३४१. (क्रांतिसिंह नाना पाटील  पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि.सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com