शेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडांवर अवलंबून असते. त्यासाठी शेळी गाभण असणे आवश्यक आहे. दोन वर्षाला तीन वेळेस शेळी व्यायली पाहिजे. शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व गाभण शेळीच्या आरोग्य व व्यवस्थापनेला सुद्धा आहे. गाभण शेळ्यांचा आहार
चांगल्या वजनाची सशक्त करडू जन्मण्यासाठी गाभण काळामध्ये योग्य व्यवस्थापन करावे. गाभण शेळ्यांना वाळलेला ओला चारा, खुराक व खनिज मिश्रण यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. गाभण शेळ्यांना सहज पचणारा चारा योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावे. गाभण काळातील शेवटचे किमान १ महिना विण्याच्या अगोदर समतोल आहाराचा पुरवठा करावा. गोठ्यातच फिरण्याची सोय असणे गरजेचे आहे. गाभणकाळात शेवटच्या ३ ते ४ आठवड्यामध्ये गर्भाशयातील पिल्लांचा उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीचा चाऱ्याबरोबरच दररोज २५० ते ३५० ग्राम खुराक द्यावा. स्वच्छ पाणी द्यावे. थंड पाणी किंवा पावसाचे पाणी देऊ नये त्यामुळे शेळी सर्दी सारखे आजार होऊ शकते. शक्यतो पावसाळ्यात गाभण शेळ्यांना सुका चारा द्यावा जसे की भरडलेला मका, गहू सोयाबीन यांचे मिश्रण करून द्यावे. एक वेळ गाभण गेलेली शेळी पुढील २१ दिवसात परत माजावर येत नाही. तीन महिन्यानंतर शेळीचे पोट वाढू लागते. तसेच शेळीचे वजन वाढलेले दिसून येते. शेळी गाभण झाल्यावर तिची त्वचा तजेलदार होते. शेळी गाभण आहे की नाही हे ओळखण्यासाठी नवीन पद्धतीमध्ये एक्सरे, सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी या तपासण्या खूपच विश्वसनीय मानल्या जातात. शेवटच्या गाभण काळात शेळीचा कास दुधाने भरलेला दिसून येतो. गाभण शेळ्यांना इतरांपासून वेगळ्या जागी ठेवावे. सध्याचा हवामानात शेळ्यांचे पावसापासून तसेच आद्रतायुक्त हवेपासून बचाव करण्यासाठी गाभण शेळ्यांचा गोठ्यात उबदार वातावरण राहावे म्हणून साधारण २ ते ४ उंची पर्यंत १०० ते २०० पॉवरचे बल्ब लावावेत. रात्रीच्यावेळी गोठ्यात वाळलेले गवत, उसाचे पाचट अंथरावे जेणेकरून जमिनीतील गारवा व ओलसरपणा याचा गाभण शेळ्यांना त्रास होणार नही. गाभण असणाऱ्या शेळ्या बसण्याची जागा मलमूत्रामुळे ओली होते. अशा ओलसर ठिकाणी आठवड्यातून एक दोन वेळा चुन्याची भुकटी टाकावी. त्यामुळे गोठ्यात असलेले जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव गाभण शेळ्यांवर कमी होतो. गाभण शेळ्यांना होणारे आजार आणि उपचार गर्भपात, अंग बाहेर येणे, पोटफुगी, आंत्रविषार, बुळकांडी, अपचन, अशा प्रकारचे आजार उद्भवतात. पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेळ्यांना श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. गोठ्यातील जमीन ओली असेल तर खुरांमध्ये ओलसरपणा राहून शेळ्यांचा खुरामध्ये जखमा होतात. पावसाळ्यात हिरवा ओला चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे गाभण शेळ्यांमध्ये अंग बाहेर येणे हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो असे असल्यास पशुवैद्यकाकडून योग्य उपचार करून घ्यावेत. - डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६ (पशुप्रजननशास्त्र विभाग,पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)