मी जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी जातींच्या संगोपनावर भर दिला आहे. जातिवंत शेळ्यांची पैदाशीसाठी माझ्याकडे तिन्ही जातीचे नर आहेत. गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या मार्फत शेळ्यांचे नैसर्गिक पद्धतीने रेतन करून निर्माण झालेल्या करडांचे चांगल्या पद्धतीने संगोपन करतो.
नर करडू आणल्यानंतर एक वर्षानंतर त्याचा रेतनासाठी वापर केला जातो. गोठ्यामध्ये नरांसाठी वेगळी व्यवस्था आहे. शेळी माजावर आल्यानंतर संबंधित जातीच्या नराद्वारे नैसर्गिक रेतन केले जाते. एकदा व्यायल्यानंतर एक दोन महिन्यात शेळी माजावर येते. पण तो माज सोडून दुसऱ्या माजावेळी रेतन केले जाते. हा एक व्यवस्थापन कौशल्याचा भाग आहे. व्यायल्यानंतर लगेच रेतन केल्यास करडांना दूध कमी मिळते. याचबरोबर शेळीची शारीरिक क्षमताही कमी होते. याचा परिणाम दुधावरही होते. हे टाळण्यासाठी एक माज सोडून दिला जातो. यामुळे काही महिन्यांचा वेळ शेळी आणि करडांना मिळतो. यामुळे शेळीचे दूध करडांना पुरते. पुरेसे दूध मिळून करडू सशक्त बनते. अशी पद्धती तिन्ही जातीच्या शेळ्यांसाठी वापरली जाते. अनुभव आणि वाचन यामधून शेळ्यांच्या व्यवस्थापनावर भर दिला आहे. सुरवातीला ज्यावेळी गोठा सुरु केला त्यावेळी कृत्रिम रेतनावर भर असायचा. एक रेतमात्रा ३०० ते ४०० रुपयांना मिळायची. पण त्यातून गर्भधारणा शंभर टक्के होईल याची खात्री नसायची. यामुळे मी नैसर्गिक रेतनालाच महत्त्व दिले. याचा फायदा शेळ्यांची संख्या वाढविण्यावर झाला. तसेच अशक्त करडांच्या जन्माचे प्रमाण कमी झाले. अनुभवातूनच जातिवंत शेळ्यांची पैदास करण्याचे काम सुरु आहे. शेळीचा माज ओळखण्यासाठी सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून रहावे लागते. यामुळेच गोठ्यात सातत्याने जातिवंत शेळ्यांची पैदास होते. करडू जन्मल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कप्यामध्ये ठेवले जाते. करडू पंधरा दिवसांचे होईपर्यंत एका कप्यात ठेवले जाते. यानंतर याच कालावधीत प्रत्येक टप्यात त्यांचे वर्गीकरण केले जाते. यानुसार खाद्य व चाऱ्याचे नियोजन केले जाते. जसे वय वाढेल तसा आहारात बदल केला जातो. यामुळे प्रत्येकाच्या वाढीवर लक्ष देणे शक्य होते. )शिंदेवाडी (खुपिरे), ता. करवीर, जि. कोल्हापूर)