भात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. यंत्राच्या वापरामुळे बियाणे, लागवड आणि मजुरी खर्चात बचत होते. कोरडी लागवड; तसेच चिखलणी केलेल्या जमिनीत लागवड करण्यासाठी विविध यंत्रे उपलब्ध आहेत.
कोरड्या जमिनीत भात बियाणे पेरणी सीड-कम-फर्टीलायझर ड्रिल
यंत्राचा उपयोग भात, गहू, ज्वारी, बाजरी पेरणीसाठी होतो. बियाणे आणि खतांसाठी वेगवेगळे डबे असतात. बियाणांचा प्रतिहेक्टरी दर बदलण्यासाठी फ्लूटेड रोलर मोजणी यंत्र असते. खतासाठी ग्रॅव्हिटी टाइप फीड रोलर असतात. त्याला चेन-स्प्रॉकेटने फिरवणारे जमिनीवर चालणारे एक चाक असते. बी आणि खत मातीत सोडण्यासाठी फाळ असतात. बी आणि खताच्या पेट्यांना जोडलेल्या लिव्हरने रोलर्स हलवून, पेट्यांखाली असणाऱ्या खोबणीची लांबी वाढते किंवा कमी होते, जे पेरण्यासाठी बियाणे आणि खताचे प्रमाण बदलतात. यंत्र ९ ते १३ फाळांसहित येते. ३५ एचपी ट्रॅक्टरद्वारे चालविले जाते. यामध्ये इन्कलाइन्ड प्लेट यंत्रणा असते. ज्यामध्ये एका सरीमधील बियाणांमध्ये आणि दोन सरी मधील अंतर सारखे राखले जाते. प्लेट्स बदलून मका, सोयाबीन, भुईमूग आणि कापूस इत्यादी धान्य पेरण्यासाठी याचा उपयोग होतो. भाताच्या थेट पेरणीसाठी हे यंत्र वापरले जाते. या यंत्रामुळे लागवड करताना बियाण्यांचे नुकसान कमी होते. सध्याच्या सीड-कम-फर्टिलायझर ड्रिलमध्ये थोडे बदल करून त्याचा उपयोग कोरड्या भात पेरणीमध्ये करता येतो. ओल्या जमिनीमध्ये भात बियाणे पेरणी ड्रम सीडर
यंत्राचा वापर अंकुरित भात बियाणांची पेरणी चिखलणी केलेल्या शेतामध्ये करण्यासाठी करतात. यंत्राने ४ ते ८ ओळींमध्ये भाताची पेरणी करता येते. ड्रम सीडरमध्ये २ ते ४ ड्रम असतात. प्रत्येक ड्रमच्या पारिमितीवर दोन प्लेनमध्ये अंकुरण आलेले भाताचे बियाणे सोडण्यासाठी १० मी.मी. व्यासाची छिद्रे असतात. प्रत्येक ड्रम अर्धा भरला जातो. त्यांची झाकणे बंद केली जातात. एका दिवसामध्ये एक हेक्टर क्षेत्राची पेरणी होते. या यंत्राने पेरणी केल्यामुळे उत्पादनात वाढ मिळते. पीक कापणी १० ते १५ दिवस लवकर होते. चिखलणी केल्यानंतर, पेरणीअगोदर ज्यादा पाण्याचा निचरा करावा; परंतु जमीन ओली राहील, याची काळजी घ्यावी. पेरणीअगोदर भात बियाणे २४ तासांसाठी पाण्यामध्ये भिजत घालावे. हे भिजलेले बियाणे सावलीमध्ये आणि आर्द्रता असलेल्या ठिकाणी गोणपाटामध्ये ठेवावे. त्यावर वारंवार पाणी शिंपडावे. दुसऱ्या दिवशी अंकुर आलेले बियाणे ड्रम सीडरमध्ये पेरणीसाठी वापरावे. पेरणी केल्यानंतर २ ते ३ दिवस शेताला पाणी देऊ नये. जेणेकरून त्याची मुळे जमिनीमध्ये व्यवस्थित रुजतील. त्यानंतर जसजशी पिकाची वाढ होईल तसतशी पाण्याची मात्रा वाढवावी. - चेतन सावंत, ७५५२५२१२३० (सी. आर. मेहता हे भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे संचालक आहेत. चेतन सावंत या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ आहेत.)