साधारणपणे गाई,म्हशींचा गाभण काळ अनुक्रमे २८० ते ३१० दिवस असतो. गाय,म्हैस गर्भधारणा केल्याची नोंद पशुपालकांनी ठेवावी. यामुळे रेतनानंतर लगेचच विण्याची तारीख ठरविता येते. गाभणकाळातील व्यवस्थापनाचे वेळापत्रक ठरविता येते.
गाई-म्हशी गाभण असताना, विण्याच्या दरम्यान व व्यायल्यानंतर काळजी घेणे गरजेचे आहे. गाभणकाळ हा तीन अवस्थांमध्ये विभागला जातो. सुरुवातीची अवस्था ही ३ महिने, मध्यअवस्था ४ महिने आणि अंतिम अवस्था २ ते ३ महिने अशी असते. गाभणपणाच्या अंतिम अवस्थेत असलेले जनावरे चालताना घसरून पडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. गोठ्यात असलेले शेण लगेच बाहेर काढावे. गोठ्याच्या पृष्ठभाग नेहमी स्वच्छ आणि घसरडा राहणार नाही याची काळजी घ्यावी. अंतिम अवस्थेत असलेली गाय, म्हशी नर व इतर जनावरांपासून वेगळी बांधावीत.
गाभणपणाच्या शेवटच्या आठवड्यात गाय,म्हैस विण्याची लक्षणे जसे कास व योनीच्या बाहेरील भागास आलेली सूज, शेपटीच्या केसांना चिकटलेली पातळ पांढरुक स्राव, उठाबश्या करणे आणि बैचेन दिसणे असे आढळल्यास गाय,म्हशीला इतर जनावरांपासून कोरड्या जागेत बांधावे. विण्याची क्रिया साधारणपणे एक ते दीड तासात पूर्ण होते. विण्याच्या ठिकाणी कोरड्या जागेवर वाळलेले गवत पसरावे. त्यात शेण किंवा संसर्ग होईल अशा वस्तू नसाव्यात. विण्याच्यावेळी गाय,म्हैस अडल्यास प्रशिक्षित व्यक्तीची मदत घ्यावी. विण्यादरम्यान प्रथमतः: वासरांचे समोरचे दोन्ही पाय व त्यानंतर नाकाचा भाग अशी ठेवण असायला पाहिजे जर अशी ठेवण नसल्यास आणि जनावर अडल्यास वासरास बाहेर ओढू नये. विण्याची क्रिया सुरू होऊन चार तासापर्यंत वासरू बाहेर न निघाल्यास पशुवैद्यकांना बोलवावे. गाय,म्हैस व्यायल्यानंतर जननद्रियांचा बाहेरील भाग, मागील पायांचा आतील व बाहेरील भाग आणि शेपटी कडुनिंबाची पाने उकळलेले कोमट पाणी किंवा पोटॅशिअम परमॅंग्नेट मिसळलेल्या पाण्याने स्वच्छ करावे. गाय, म्हैस व्यायल्यानंतर कोमट पाणी किंवा गुळाचे सरबत कोमट पाण्यात तयार करून पाजावे. व्यायल्यानंतर कासेतील अर्धवट चीक दूध काढून वासरास पाजावे. कास पूर्णपणे रिकामी करू नये. यामुळे दुग्धज्वर होण्याच्या धोका कमी करता येतो. गाय,म्हैस व्यायल्यानंतर साधारणपणे ४ ते ६ तासात वार जननद्रिंयातून बाहेर पडत असतो. जर ६ तासापर्यंत वार बाहेर न आल्यास पशूतज्ज्ञांच्या सल्याने आयुर्वेदिक औषधे पाजावीत. वाराच्या लोंबकळलेल्या भागास काही जड वस्तू किंवा बळजबरीने हाताने आढेताण करु नये. १२ तासापर्यंत वार बाहेर न पडल्यास पशुवैद्यकांकडून उपचार करून घ्यावेत. बाहेर पडलेला वार खोल मातीत पुरावा. जनावरे ते खाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. जास्त दूध देणाऱ्या गाई-म्हशींना विशेषतः संकरित गायींना व्यायल्यानंतर दुग्धज्वर, कासदाह आजार होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून या आजारांची प्राथमिक लक्षणे व आजार प्रतिबंधासंबंधीत माहिती घ्यावी. म्हणूनच विल्यानंतर पहिले १ ते २ दिवस गाय, म्हशींची कास अर्धवट खाली करावी. कासदाहाची चाचणी करावी. विल्यानंतर गाई-म्हशींना सुरुवातीचे २ ते ३ दिवस पाचक असलेले खाद्य मिश्रण कोमट पाण्याने भिजवून खायला द्यावे. सोबतच हिरवा चारा द्यावा. तीन दिवसानंतर खुराक मिश्रण देण्यास सुरुवात करावी. दोन आठवड्यांपर्यंत खुराकाचा मात्रा हळूहळू वाढवावी. - डॉ. संदीप ढेंगे,९९६०८६७५३६ (पशुशरीरक्रियाशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)