दुग्धोत्पादन हे गाई,म्हशींच्या प्रजननावर अवलंबून असते. हे लक्षात घेऊन पशुआहारासोबत खनिज मिश्रण व जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावीत. प्रजनन विषयक अडचणींवर तातडीने उपचार करावेत.
कालवड किंवा रेडी योग्य वयात माजावर न येणे
सर्वसाधारणपणे बऱ्याच पशुपालकांना ही समस्या येते. सुयोग्य आहार व उत्तम व्यवस्थापन असल्यास संकरित कालवडी वयाच्या १२ ते १४ महिन्यात गर्भधारणा योग्य माज दाखवतात. रेड्या १८ ते २२ महिन्यात माजावर येऊन गर्भधारणा होऊ शकते. गाय/म्हैस व्यायल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत वासराला त्याच्या वजनाच्या १/१० एवढा चिक पाजावा. योग्य प्रमाणात शरीराच्या वजन वाढीसाठी उच्च प्रथिनयुक्त संतुलित पशुआहार द्यावा. पशुआहारासोबत खनिज मिश्रण व जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावीत. जेणेकरून शरीराच्या वाढीसोबत गर्भाशयाची वाढ होऊन शरीरामध्ये योग्य प्रमाणात संप्रेरके निर्माण होतात. कालवड/रेडी योग्य वयात गर्भधारणा योग्य माज दाखवते. लहान वासरामध्ये जंताचा प्रादुर्भाव होऊन त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असतो त्यासाठी दर महिन्याला वासराचे जंतनिर्मूलन करावे. गोचीड,पिसवा या सारख्या परोपजीवीपासून वासरे मुक्त ठेवावीत. गाय/म्हैस व्यायल्यानंतर योग्य वेळेत माजावर न येणे
सर्वसामान्यपणे गाय/म्हैस व्यायल्यानंतर ६० दिवसानंतर माजावर येणे अपेक्षित आहे परंतु व्यवस्थापनातील दोष, कष्टप्रसूती, वार अडकणे, गर्भाशयदाह, चयापचयासंबंधी किंवा इतर आजार इत्यादी कारणामुळे गाई/म्हशी माजावर येण्यास विलंब होतो. त्यामुळे भाकड काळात वाढ होते. दुग्धव्यवसाय तोट्यात जातो. हे लक्षात घेऊन गंभीर आजारामध्ये तज्ज्ञ पशुवैद्यकाकडूनच उपचार करून घ्यावेत. जास्त दुग्धोत्पादन असणाऱ्या गाई/म्हशीमध्ये दुधाचा ताण निर्माण होतो. अशावेळी दुधाच्या प्रमाणात उच्च प्रथिने व उर्जायुक्त संतुलित पशुआहार व सोबत क्षार मिश्रण, जीवनसत्त्वे तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावीत. गाय/म्हैस व्यायल्यानंतर ६० दिवसापेक्षा जास्त काळ जर नैसर्गिकरीत्या माजावर न आल्यास पशुवैद्यकाकडून सल्ला घेऊन कृत्रिमरीत्या माजावर आणण्यासाठी उपचार करून घ्यावेत. गाई/म्हशी वारंवार माजावर येणे
दर्जेदार व्यवस्थापनाचा अभाव असणाऱ्या गोठ्यामध्ये ही समस्या आढळते. प्रजननविषयक आजार उदा.गर्भाशय दाह, स्त्रीबीज संबंधी आजार, संप्रेरकाचा अभाव. या समस्येवर उपाय म्हणजे जर गाई/म्हशींमध्ये ३ वेळा कृत्रिम रेतन केल्यानंतरही गर्भधारणा होत नसेल तर पशुवैद्यकाकडून सल्ला घेऊन आहार व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करून, रोगनिदान व औषधोपचार करून घ्यावेत. गाय/म्हैस व्यायल्यानंतर वार पूर्णपणे व्यवस्थित न पडल्यास गर्भाशयदाह ही समस्या निर्माण होते. त्यावेळी योग्य त्या औषधीचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावा. दुधाच्या प्रमाणात समतोल आहार न दिल्यास, कोणत्याही प्रकारचा ताण निर्माण झाल्यास ही समस्या निर्माण होते. सामान्य स्थितीमध्ये गाय/म्हैस व्यायल्यानंतर ४ ते ८ तासामध्ये वार पडून जाणे अपेक्षित आहे, परंतु काही कारणामुळे जसे की गर्भपात, दिवस पूर्ण न होणे, जुळी वासरे जन्म घेणे, मृत वासरू बाहेर येणे, शरीरामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस किंवा इतर पोषक तत्त्वांचा अभाव असणे, अशक्तपणा इत्यादी. वार अडकल्यानंतर तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून उपचार करून घेणे आवश्यक असते कारण अप्रशिक्षित अथवा अर्धशिक्षित व्यक्तीकडून अपूर्ण किंवा चुकीचे उपचार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. या समस्येचे प्रमाण कमी करण्यासाठी गाभण काळातील शेवटचे तीन महिने उच्च प्रथिने व उर्जायुक्त समतोल आहारासोबत खनिज मिश्रण, जीवनसत्त्वे इ. योग्य प्रमाणात द्यावेत. प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून बारकाईने लक्ष द्यावे. कोणत्या प्रकारचा स्राव बाहेर येत आहे का? किती वेळापासून गाय/म्हैस कळा देत आहे. वासराचा कोणता भाग जसे खूर, तोंड बाहेर आला आहे का, याची खात्री करावी. अर्धशिक्षित किंवा अप्रशिक्षित लोकांची मदत घेऊ नये. त्यामुळे समस्येतील गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे वासराची स्थिती सामान्य असताना पुढचे पाय अगोदर बाहेर येतात. त्यानंतर तोंडाचा भाग दृष्टिक्षेपात येतो. त्यावेळी दोन्ही पाय बाहेर ओढून वासरू बाहेर काढणे गरजेचे असते. बऱ्याचदा कष्टप्रसुतीची कारणे ही वासराची विकृत स्थिती किंवा जनन मार्गातील अडथळे असतात. अशावेळी तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून प्रसूती करून घ्यावी. - डॉ. अनिल पाटील ७५८८०६२५५६ (पशुप्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)