आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापन

कोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही आंबा बागांमध्ये तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा बागांमध्ये प्रादुर्भाव ओळखून त्वरीत उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे.
mango hopper
mango hopper

कोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही आंबा बागांमध्ये तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा बागांमध्ये प्रादुर्भाव ओळखून त्वरीत उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे.

सद्यःस्थितीत कोकण विभागात आंबा पिकाचा विचार करता नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून आंब्याला तुरळक प्रमाणात मोहोर येण्यास सुरवात झाली आहे. मात्र मोठया प्रमाणात मोहोर डिसेंबर - जानेवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. सद्य परिस्थितीत लांबलेल्या पावसामुळे बऱ्याच बागांमध्ये पालवी उशिरा आढळून येत आहे. अशा परिस्थितीत या पालवलेल्या बागांमध्ये मोहोरसुद्धा उशिरा   म्हणजे साधारणपणे डिसेंबर-जानेवारीमध्ये येण्याची शक्‍यता आहे. मात्र ज्या बागांमध्ये पॅक्‍लोब्युट्राझोलचा वापर केला आहे अशा बागांमध्ये थंडीचे वातावरण चांगले राहिल्यास मोहोर लवकर येऊ शकतो. सद्यपरिस्थितीत काही आंबा बागांमध्ये विविध किडी व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. वेळीच प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून उपाययोजना केल्यास होणारे नुकसान टाळणे शक्य होईल. 

आंबा बागेतील किडी   तुडतुडे 

  • पिल्ले व प्रौढ आंब्याच्या मोहोरावरील, कोवळ्या पालवीमधून तसेच कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात. परिणामी मोहोर व लहान फळांची गळ होते. 
  • पिल्ले तसेच तुडतुडे शरीरावाटे मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर काळ्या रंगाच्या (कॅपनोडीयम) बुरशीची वाढ होते व झाड काळे पडते यालाच खार पडणे असे म्हणतात. 
  • फुलकिडे 

  • ही कीड एक मिमी. आकाराची असून पिल्लांचा रंग पिवळसर असतो. मादी कोवळ्या पानांच्या शिरांमध्ये अंडी घालते. पिल्ले व पूर्ण अवस्थेतील फुलकिडे पानाची साल खरवडून रस शोषतात. 
  • पानांच्या कडा तसेच शेंडे करपतात. पाने वेडीवाकडी होतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानगळ होते, शेंडेच शिल्लक राहतात. कोवळ्या फळांची साल खरवडल्यामुळे फळांची साल काळपट तांबूस किंवा विटकरी रंगाची होते. 
  • मिजमाशी  

  • प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर, मोहोरावर तसेच लहान फळांवर आढळतो. मादी सालीच्या आत अंडी घालते. अळ्या बाहेर पडल्यानंतर पेशींवर उपजीविका करतात. परिणामी त्या ठिकाणी बारीक, फुगीर गाठ तयार होते. 
  • पूर्ण वाढलेली अळी गाठीला छिद्र पाडून जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. शेंडे जळतात. त्यामुळे मोहोर देखील गळतो किंवा वाळतो. मोहोराची दांडी वेडीवाकडी होते. प्रादुर्भाव लहान फळांवर झाल्यावर वाटाण्याच्या आकाराच्या फळांची गळ होते. 
  • एकात्मिक उपाययोजना

  • खतांचा संतुलित वापर करावा.
  • नत्र खताच्या मात्रा जास्त झाल्यास झाडास वारंवार पालवी येऊन फांद्या जास्त येतात. असे वातावरण किडींच्या वाढीस पोषक असते. 
  • बागेतील परिस्थितीचा विचार करून पीक संरक्षण करणे गरजेचे आहे. 
  •  सध्याच्या परिस्थितीत एकात्मिक आंबा मोहोर तंत्रज्ञान सांघिकपणे वापरण्याचा प्रयत्न करावा.  
  • कीटकनाशकांच्या वेळापत्रकानुसार फवारण्या कराव्यात. त्यामुळे तुडतुड्यामध्ये कीटकनाशकाप्रति  प्रतिकार करण्याची क्षमता  वाढणार नाही. 
  • फवारणी झाडावर सर्व ठिकाणी पोचेल अशा पध्दतीने करावी. त्यासाठी बांबूच्या काठीचा उपयोग करावा. पिचकारी पद्धतीने फवारा देऊ नये. त्यामुळे कीटकनाशकाचे द्रावण झाडाला चिकटून राहात नाही. फवारणी वेळच्या वेळी व शिफारसीत मात्रेत करावी. 
  • मृत फांद्या विरळणीनंतर कीटकनाशकाची पहिली फवारणी डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) ९ मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मोहोर येण्यापूर्वी करावी. ही फवारणी हापूस तसेच रायवळ जातीच्या सर्व झाडांवर तसेच खोडांवर करावी. ज्यामुळे खोडांवर सुप्तावस्थेत असलेल्या तुडतुडयांचे नियंत्रण होईल. 
  • अलीकडील काळामध्ये सतत बदलत्या वातावरणामुळे बागांमध्ये अवेळी पालवी येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण व पाऊस येण्याची शक्‍यता असते. ही बाब लक्षात घेऊन पहिल्या फवारणीमध्ये कार्बेन्डाझीम अधिक  मॅंकोझेब १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी वरील सुचविलेल्या कीटकनाशकात मिसळून फवारल्यास करपा रोगाचे नियंत्रण करता येईल. 
  • कीटकनाशकाची दुसरी फवारणी बोंगे फुटण्याच्या अवस्थेत करावी. बोंगे पोखरणारी अळी, मिजमाशी आदि किडींची आर्थिक नुकसान पातळी लक्षात घ्यावी. नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के) ८ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • तिसरी फवारणी इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ३ मिलि प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात दुसऱ्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी मोहोर पोखरणारी अळी, तुडतुडे, मिजमाशी व फुलकिडीच्या नियंत्रणासाठी करावी. 
  • चौथी फवारणी थायामेथोक्‍झाम (२५ टक्के डब्लूडीजी) २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी आंबा कलमांवर फुलकिडीचा प्रादुर्भाव असल्यासच करावी. त्यासोबत भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्‍झाकोनेझॉल (५ टक्के) ५ मिलि अथवा पाण्यात मिसळणारे गंधक (८० टक्के) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात यापैकी बुरशीनाशकाचा वापर करावा. 
  • पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के) ८ मिलि प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात करावी.
  • मोहोराच्या अवस्थेत ढगाळ वातावरण असल्यास अथवा पाऊस पडल्यास मोहोरावर तसेच छोटया फळांवर करपा रोग येण्याची शक्‍यता आहे. नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम (१२ टक्के) अधिक मॅंकोझेब (६३ टक्के) संयुक्त बुरशीनाशक १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.   
  • सहावी फवारणी गरज असल्यास १५ दिवसांच्या अंतराने करावी. यात पाचव्या फवारणीतील कीटकनाशकांव्यतिरिक्त कीटकनाशके वापरावीत. 
  • फुलकिडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १५ मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
  • फळांवरील फुलकिडींसाठी स्पिनोसॅड (४५ टक्के प्रवाही) २.५मिलि किंवा थायामेथॉक्‍झाम (२५ टक्के) २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. (या कीटकनाशकांना लेबल क्‍लेम्स नाहीत). 
  • ज्या ठिकाणी मिजमाशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर आहे अशा ठिकाणच्या झाडाखालची जमीन शक्‍य असल्यास नांगरावी किंवा उखळणी करावी. झाडाखाली काळे प्लॅस्टिक टाकावे त्यामुळे मिजमाशीच्या अळया कोषावस्थेत जाण्यास अडथळा येऊन प्रसार कमी होऊन उपद्रव कमी होईल.  
  • - डॉ. बी.डी.शिंदे, ८००७८२३०६० - डॉ. ए.एल.नरंगलकर, ९४०५३६०५१९  (कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,जि.रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com