खरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन शीतलता निर्माण होते. सौंदर्यप्रसाधने आणि औषधनिर्मितीसाठी फळाच्या गराचा उपयोग करतात. फळात आरोग्यदायी घटक आणि जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात आहेत.
खरबूज हे रसदार, चवदार फळ आहे. याला वेगळ्या प्रकारचा सुगंधही असतो. खरबुजामध्ये ७० ते ८० टक्के भाग गर असतो. त्याच्या बियाही फार उपयोगी असतात. बियांमधून निघणारे तेल गोड व आहारामध्ये उपयुक्त असून पोषक व सारक असते. खरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन शीतलता निर्माण होते. खाण्याच्या बरोबरीने सौंदर्यप्रसाधने आणि औषधनिर्मितीसाठी फळाच्या गराचा उपयोग केला जातो. खरबुजामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. या फळात आरोग्यदायी घटक आणि जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात आहेत. फळाची गुणवत्ता ही त्यातील विद्राव्य घन पदार्थांचे (विशेषतः : साखर) प्रमाण यावर अवलंबून असते. पूर्ण पक्व खरबूज फळांत जास्तीत जास्त १५ टक्के विद्राव्य घनपदार्थ असतात. अर्धवट पक्व फळांमध्ये ८ ते १२ टक्के इतके विद्राव्य घन पदार्थ असतात.
जॅम बनविण्यासाठी पूर्ण पक्व झालेल्या फळांचा १ किलो गर, साखर ७५० ग्रॅम, सायट्रिक अॅसिड ९ ग्रॅम लागते. सुरुवातीला पक्व फळे पाण्याने स्वच्छ धुवून चाकूने कापून बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव करावा. त्यामध्ये साखर व सायट्रिक अॅसिड मिसळून मंद अग्नीवर गरम करावे. त्यातील प्रवाही पाण्याचा अंश संपला (या वेळी मिश्रणाचा टिएसएस ६८. ५ टक्के असतो) की जॅम तयार झाला असे ओळखावे. जॅम थोडा थंड झाल्यावर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरण्यांमध्ये भरावा. बरणीवर थोडे मेण (पॅराफिन वॅक्स) ओतावे. अशा रितीने उत्तम प्रतीचा टिकाऊ जॅम तयार होतो. बरण्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. त्यामुळे जॅम चांगला रहातो. रस तयार करण्यासाठी पूर्णपणे पक्व झालेली निरोगी फळे निवडून, स्वच्छ वाहत्या पाण्याने धूवून घ्यावीत. तुकडे करून त्यापासून गर काढावा. गरातील बिया बाजूला काढाव्यात. गर मिक्सर किंवा स्क्रू टाईप ज्युस एक्स्ट्रॅक्टर यंत्रामधून काढून एकजीव करून घ्यावा. एकजीव झालेला गर मलमलच्या कापडात बांधून हाताने दाबून किंवा हायड्रॅालिक बास्केट प्रेस या यंत्राचा वापर करून रस काढून घ्यावा. जास्त काळ साठवून ठेवायचा झाल्यास तो पाश्चराईझ करुन, त्यामध्ये १०० पीपीएम सोडिअम बेंझोएट या परिरक्षकाचा वापर करावा. बाटल्या हवाबंद करुन पाश्चराईझ कराव्यात थंड झाल्यावर, लेबल लावून, थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. रसापासून उत्तम प्रकारचे सरबत तयार करता येते. यासाठी वरील प्रमाणे काढलेला खरबुजाचा रस (१५ टक्के), आल्याचा रस (१ टक्के), साखर (१० टक्के) आणि उरलेले पाणी असे घटक वापरले जातात. हे मिश्रण चांगले ढवळून, मलमलच्या कापडातून गाळून घेऊन, थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा. जास्त काळ साठवून ठेवायचे झाल्यास तो पाश्चराईझ करुन, त्यामध्ये १०० पीपीएम सोडिअम बेंझोएट या परिरक्षकाचा वापर करावा. बाटल्या हवाबंद आणि पाश्चराईझ करून थंड झाल्यावर कोरड्या जागी ठेवाव्यात. वाळलेल्या बिया स्क्रबर किंवा हाताने चोळाव्यात. त्यांची टरफले वेगळी करावीत. कढईत तेल टाकून त्या बिया परतून घ्याव्यात. बिया परतून झाल्यानंतर टिश्यू पेपरवर टाकाव्यात आणि मग चवीसाठी मीठ किंवा चाट मसाला त्यावर शिंपडून हवाबंद डब्यात ठेवाव्यात. - शैलेंद्र कटके,९९७०९९६२८२
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)