आदर्शगाव ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येते. सदरील संस्था संबंधित ग्रामसभेने प्रस्तावित करावयाची असते. आदर्शगाव योजनेत सहभागी होण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम गावातील संस्थेस प्रथम प्राधान्य देण्यात यावे. जर गावात अनुभवी व सक्षम संस्था नसेल तर त्याच तालुक्यातील २५ कि.मी.च्या आतील गावातील जवळच्या संस्थेस प्राधान्य देण्यात यावे. शक्यतो संस्था त्याच जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे किंवा संस्थेच्या एकूण पदाधिकाऱ्यांपैकी ३/४ सदस्य (अध्यक्ष व सचिवासह) त्याच जिल्ह्यातील असावेत.
निवड केलेल्या संस्थेची नोंदणी त्याच धर्मादाय आयुक्त यांच्याकडे झालेली असावी. लेखापरीक्षण- संस्थेने तीन वर्षाचे ऑडिट रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. संस्था फॅमिली ट्रस्ट नसावी. लोकसहभाग घेऊन काम करण्याचा अनुभव असावा. संस्था कोणत्याही कार्यक्रमामध्ये काळ्या यादीमध्ये समाविष्ट नसावी. संस्थेकडे अनुभवी व तांत्रिक मनुष्यबळ असावे. संस्थेचे कार्य चांगले असल्यास वित्तीय बाबी किंवा लेखापरीक्षणामधील वर नमूद निकषाच्या अटी शिथिल करण्याचे अधिकार राज्यस्तरीय कार्यकारी समितीस राहतील. एखाद्या संस्थेने निवडलेल्या गावात मंजूर प्रकल्प आराखड्यातील विविध बाबींतर्गत ७५ टक्के कामे पूर्ण केली असल्यास व सदर संस्था कार्यकारी समितीस योग्य वाटल्यास अशी संस्था आदर्शगाव योजनेंतर्गत दुसरे गाव घेण्यास पात्र राहील. याबाबत अट शिथिल करण्याचे अधिकार कार्यकारी समितीस राहतील. संस्था निवड अ) गावाचे क्षेत्र १,५०० हेक्टरपेक्षा कमी असल्यास आणि लोकसंख्या ४००० पेक्षा कमी असल्यास संस्था निवडीचे निकष वर नमूद केलेल्या अटीसह खालीलप्रमाणे राहतील.
संस्थेची वार्षिक वित्तीय उलाढाल तीन लाख रुपयांपेक्षा कमी असू नये. संस्थेस जल व मृदसंधारण कामे तसेच ग्रामविकास क्षेत्रातील २ ते ३ वर्षाचा कामांचा अनुभव असावा (तालुक्यातील संबंधित यंत्रणेचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडावे). संस्थेकडे असलेल्या तांत्रिक मनुष्यबळास जल व मृदसंधारण कामे (कृषि व पाणलोट क्षेत्र विकास कामे), मूलभूत सुविधा - बांधकामविषयक कामे तसेच समूह संघटनविषयक विविध कामे यांचा किमान २ ते ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. या कामामध्ये विविध कामांचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करणे, कामासाठी लाइन आउट देणे, प्रत्यक्षात कामे करणे, कामाची जागा निवडणे, आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व साधने जुळविणे, मापे नोंदविणे, देयके तयार करणे, ग्रामविकासाच्या विविध बाबींवर प्रशिक्षण इ. प्रकारच्या विविध बाबींचा समावेश होतो. निवडलेली संस्था गावातील असेल तर अनुभवाची वित्तीय उलाढालीची अट शिथिल करण्याचे अधिकार कार्यकारी समितीला राहतील. ब) गावाचे क्षेत्र १५०० हेक्टरपेक्षा जास्त असल्यास आणि लोकसंख्या ४००० पेक्षा जास्त असल्यास संस्था निवडीचे निकष वर नमूद केलेल्या अटीसह खालीलप्रमाणे राहतील (शासन शुद्धीपत्रक दि. २४ मार्च, २०१५)
संस्थेची वार्षिक वित्तीय उलाढाल १०लाखापेक्षा कमी असू नये. जल व मृदसंधारण तसेच ग्रामविकास क्षेत्रातील ८ ते १० वर्षांचा कामाचा अनुभव असावा. (तालुक्यातील संबंधित यंत्रणेचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडावे) निवडलेली संस्था गावातील असेल तर अनुभवाची वित्तीय उलाढालीची अट शिथिल करण्याचे अधिकार कार्यकारी समितीला असतात. संस्थेने अर्ज करण्याची पद्धत आदर्शगाव योजनेत प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण म्हणून काम करण्यासाठी निकषात बसत असल्यास इच्छुक स्वयंसेवी संस्थेने विहित केलेल्या नमुन्यात आपला अर्ज मा. कार्याध्यक्ष, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प कार्यकारी समिती, पुणे या नावाने ग्रामपंचायतीस ग्रामसभेत मान्यतेसाठी सादर करावा. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारणीचा ठराव. संस्थेने कोणतेही काम नियमबाह्य केल्यास नियमानुसार होणाऱ्या कार्यवाहीस तयार असल्याचे प्रमाणपत्र. संस्था गावात गाभा व बिगर गाभा कामांसाह समूह संगठन, रोजगार व स्वयंरोजगार क्षमता वृद्धी तसेच विविध प्रगतीच्या क्षेत्रात (आरोग्य, शिक्षण इ.) समन्वयाचे काम परिपूर्ण रीतीने करण्यास तयार असल्याचे प्रमाणपत्र. संस्थेची घटना व कार्यकारीणी. मागील तीन वर्षाचे वार्षिक अहवाल. संस्थेने या आधी राबविलेले उपक्रम (यादी, वृत्तपत्रांची कात्रणे, फोटो). उपलब्ध तांत्रिक मनुष्यबळाची (योग्यता, अनुभव व क्षमता) माहिती. विविध प्रकारच्या कामांच्या अनुभवाचे प्रमाणपत्र. ग्रामसभेचा ठराव. संस्थेने लोकसहभागातून केलेल्या कामाची वृतपत्र कात्रणे, छायाचित्रे. संस्थेमार्फत स्वयंपूर्ण व स्वावलंबी करण्यात आलेल्या गावाची यशोगाथा संस्थेने गावास सादर केलेल्या अर्जाची छाननी व मंजुरी
इच्छुक स्वयंसेवी संस्थेने परिपूर्ण कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव ग्रामसभेस सादर करावा. संस्थेच्या प्राप्त प्रस्तावानुसार ग्रामसभेने अटी व शर्तीसंदर्भात संस्थेच्या कामांची, कार्यपद्धतीची आणि संस्थेच्या चिकाटीची (प्रयत्नात सातत्य ठेवत असल्याची) खात्री करावी. योजनेच्या निकषामध्ये संस्था पात्र ठरते किंवा कसे याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल अभिप्राय मांडून संबंधित स्वयंसेवी संस्थेस मान्यता द्यावी. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर आणि गावाच्या आदर्शगाव निवडीच्या अर्जासोबत प्रकल्प अभिकरण सदर संपूर्ण प्रस्ताव जिल्हा स्तरीय समितीकडे मंजुरीस्तव पाठवतील. यांनतर जिल्हास्तरीय समितीने सदरचा प्रस्ताव त्यांच्या शिफारशीसह कार्याध्यक्ष, राज्यस्तरीय आदर्शगाव संकल्प व प्रकल्प कार्यकारी समिती, पुणे यांना सादर करावा. राज्यस्तरीय कार्यकारी समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल. - ०२०-२५५३७८६६ (कृषी उपसंचालक (आदर्शगाव), कृषी भवन, शिवाजीनगर, पुणे)