शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत ग्राम विकास

जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना धान्य वितरण, त्यासोबतच महिला स्वयंसहाय्यता समूहांमध्ये उद्यमशीलतेचे बीज रोवण्यात विठोली (ता.दिग्रस, जि. यवतमाळ) येथील अनिकेत बहूद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेने गेल्या वीस वर्षांपासून भर दिला आहे.
watershed development work
watershed development work

जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना धान्य वितरण, त्यासोबतच महिला स्वयंसहाय्यता समूहांमध्ये उद्यमशीलतेचे बीज रोवण्यात विठोली (ता.दिग्रस, जि. यवतमाळ) येथील अनिकेत बहूद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेने गेल्या वीस वर्षांपासून भर दिला आहे.  याचबरोबरीने रेशीम उद्योग, पशूपालनालादेखील संस्थेने चालना दिली आहे. विठोली (ता.दिग्रस, जि.यवतमाळ) येथे अनिकेत बहूद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेची २००० साली स्थापना झाली. सध्या संस्थेचे अध्यक्ष रवींद्र राऊत असून त्यांच्यासह सात संचालकांची कार्यकारिणी आहे. सध्या संस्थेच्या उपक्रमात ८५ स्वयंसेवक आणि २२ कार्यकर्ते कार्यरत आहेत. सुरवातीला संस्थेच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उपक्रमांना सुरवात झाली. गावपाड्यांवर भटक्या जमातीमधील मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले. मुला,मुलींची शैक्षणिक क्षमता आणि वयोमानानुसार त्यांना जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. विठोली गावातून या मोहिमेची सुरवात करण्यात आली. त्यानंतर लगतच्या आठ गावांमध्ये या उपक्रमांचा विस्तार झाला. या शाळाबाह्य मुलांपैकी काही जणांनी पुढे उच्चशिक्षण पूर्ण केले. काही विद्यार्थी आता शासनसेवेत कार्यरत आहेत.  पाच तालुक्यात  महिला समूहांची उभारणी  संस्थेने  २००२ साली महिलांच्या संघटनावर भर दिला. या उपक्रमांतर्गत शाळाबाह्य मुले असलेल्या सात गावांमध्ये महिला संघटन तयार करण्यात आले. शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक वातावरण घरीच मिळावे याकरिता महिलांचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. महिला संघटनांच्या माध्यमातून पुढे महिला स्वयंसहाय्यता समूह उभारण्यात आले. अशाप्रकारे महिलांचे आरोग्य आणि आर्थिकस्तर वाढविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. सध्या दिग्रस, पुसद, आर्णी, महागाव, दारव्हा या पाच तालुक्यात महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात संस्था कार्यरत आहे. या अंतर्गत पाच तालुक्यात १,७८० महिला समूहांची बांधणी केली आहे. या समूहांना बँकांकडून कर्ज मिळावे याकरिता प्रयत्न करण्यात आले. यातून अनेक समूहांनी उद्योगही उभारले. पहिल्या टप्यात संबंधित व्यवसायाचे कौशल्य गटाकडे नव्हते. त्यामुळे  महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्था पुढे आली. महिला समूहातील सदस्यांना शिवण केंद्र, साडीवर नक्षीकाम, झुणका भाकर केंद्र, चहा व अल्पोपहार केंद्र, दुग्ध व्यवसाय, दूध प्रक्रिया उद्योग, पशुखाद्य विक्री, कुक्कुटपालन, शेळीपालन, झेरॉक्स, ब्युटी पार्लर, वनउपज गोळा करणे आणि विक्रीसाठी मदत करण्यात आली. यातून रोजगार निर्मिती झाली.  २०१४-१५ मध्ये ग्रामसंघ, तालुकासंघ उभारण्यात आले. त्यावेळी संस्थेने स्वयंपूर्ण झालेल्या स्वयंसहाय्यता समूहांना मार्गदर्शन थांबविले. त्यानंतर ग्रामसंघाच्या नियंत्रणात या महिला गटांची वाटचाल सुरु आहे.

जमीन आरोग्यविषयक जागृती पीक उत्पादकता वाढीसाठी अनियंत्रित पद्धतीने रासायनिक खतांचा वापर वाढला. परंतु यावेळी जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. हे लक्षात घेऊन संस्थेने २०११ पासून माती आणि पाणी या विषयाशी संबंधित जागृतीवर भर देण्यास सुरवात केली. जमिनीची सुपीकता आणि पाण्याच्या योग्य वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. २०१२ मध्ये सायफन पद्धतीने पाणी वापराचा उपक्रम विठोली गावात राबविण्यात आला. या दरम्यान शासनाने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेची सुरवात केली. जमिनीचा पोत या माध्यमातून राखता येईल, हे लक्षात आल्यानंतर याविषयी संस्थेने जागृती केली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला.  महागाव, दिग्रस, दारव्हा या तीन तालुक्यात शेतकऱ्यांकडून तलावातील गाळासाठीची मागणी वाढली. त्यानुसार १,४३० शेतकऱ्यांच्या शेतात गाळ पसरविण्यात आला. शेतात मिसळलेला  गाळ पावसाच्या पाण्याने वाहून जाऊ नये यासाठी  शिवाराला बांधबंदिस्ती करण्यात आली.  यासाठी दिलासा आणि विकासगंगा या संस्थांनी आर्थिक सहकार्य केले. १,१०० शेतकऱ्यांनी शेताची बांधबंदिस्ती केली. संस्थेतर्फे पीक उत्पादन वाढीसाठी हंगामानुसार प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. संस्थेचे विविध उपक्रम  धान्य कीट वाटप  संस्थेकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना धान्य किटचा पुरवठा होतो. त्याकरिता दिलासा, नाम संस्थेचे सहकार्य मिळते. पाच जणांच्या  एका कुटुंबाला दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य आणि साहित्य या किटमध्ये असते. आत्तापर्यंत ६४ कुटूंबियांपर्यंत  ही मदत पोचविली असून या उपक्रमात सातत्य आहे. स्थलांतरितांना सायकल वितरण  संस्थेने पाच दानदात्यांकडून सायकली घेतल्या. लॉकडाऊनकाळात पायी निघालेल्या आणि सोबत अधिक साहित्य असलेल्या अत्यंत गरजूंना सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यासोबतच या स्थलांतरितांना जेवण, धान्य कीट आणि पायांना लावण्याकरीता औषधांचा पुरवठा देखील संस्थेकडून करण्यात आला.  ब्लँकेट वाटप  फुटपाथ तसेच उघड्यावर झोपणाऱ्या व्यक्तींना हिवाळ्यात पांघरुणाअभावी त्रास सहन करावा लागतो. अशा गरजूंना दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून २०० ते २५० ब्लँकेटचे वाटप होते. २०१२ पासून या उपक्रमात संस्थेने सातत्य राखले आहे. संस्था पदाधिकारी आपल्या वाहनात चप्पल ठेवतात. उन्हाळ्यात विना चप्पल फिरणारा कोणी दिसल्यास त्याला चप्पल दिली जाते.  रेशीम शेतीला चालना   संस्थेने पाच वर्षांपूर्वी रेशीम उद्योगाला चालना दिली आहे. यासाठी उपक्रमशील शेतकऱ्यांची निवड करून त्यांना रेशीम शेतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच तुती लागवडीबाबत मार्गदर्शन, बाल कीटकांचा पुरवठादेखील करण्यात आला. सध्या ९९५ शेतकरी रेशीम उद्योगात कार्यरत आहेत.

- रवींद्र राऊत,  ८८५७०९११११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com