लागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फुटावर तर भारी जमिनीसाठी ३ फुटावर सलग सऱ्या पाडाव्यात. दोन सरीत उसाची लागण करून एक सरी रिकामी सोडावी.
ऊस लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ८ पर्यंत असावा. सेंद्रिय कर्बाचे किमान प्रमाण ०.५ टक्के पेक्षा अधिक असावे. उसाची कार्यक्षममुळे १.५ फूट खोलीपर्यंत असल्याने खोल नांगरट करावी. भारी जमिनीतील १.५-२ फूट खोलीवरील जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी दर ३ वर्षातून एकदा १ ते १.५ मीटर अंतरावर उताराच्या दिशेने मोल नांगराने (सब सॉइलरचा) नांगरट करावी. मुख्य चरापर्यंत नांगराची तासे काढावीत.
शेणखत उपलब्ध होत नसल्यास हिरवळीचे खत, गांडूळ खत, प्रेसमड कंपोष्ट खत, पोल्ट्रीखत, लेंडीखत, पेंडी खताचा वापर करावा. लागवडी अगोदर हेक्टरी ७.५ ते १० टन पाचट जमिनीत कुट्टी करुन गाडावे. शेणखत देणे शक्य नसल्यास लागवड करण्यापूर्वी ३ महिने अगोदर ताग किंवा धैंचा ही हिरवळीच्या खतांची पिके घ्यावीत. ५५ ते ६० दिवसांनी ताग, धैंचा जमिनीत गाडावा. साधारणपणे हेक्टरी २० ते २५ टन बायोमास गाडल्यानंतर त्यापासून ८५ ते ९० किलो नत्राची मात्रा मिळू शकते. तागाचे पीक घेतल्यास तणांचा नैसर्गिक नियंत्रण होते. हिरवळीचे खत नसल्यास शेवटच्या पाळीअगोदर चांगले पूर्ण कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत किंवा हेक्टरी सहा टन प्रेसमड कंपोस्ट जमिनीत मिसळून द्यावे. माती तपासणी करून अन्नद्रव्य व्यवस्थापनाची दिशा ठरवावी. सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये (१० : १ प्रमाणात) ५ ते ६ दिवस मुरवून सरीतून द्यावे. हुमणी नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी हेक्टरी २ टन निंबोळी पेंडीचा चुरा जमिनीत मिसळावा. को.८६०३२ (निरा), को.एम.०२६५ (फुले २६५) आणि व्हिएसआय ८००५ या सुधारीत जातींची लागवड करावी. बेणे मळ्यातील ९ ते ११ महिने वयाचे अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध, रोग आणि कीड मुक्त बेणे वापरावे. बेणे लांब कांड्याचे व फुगीर डोळ्याचे, रसरशीत असावे. दर तीन वर्षांनी बेणे बदलावे. रोप लागवडीसाठी ट्रे मध्ये समप्रमाणात कोकोपीट आणि गांडूळखत वापरण्याची शिफारस आहे. काणी रोग तसेच कांडीवरील खवले कीड व पिठ्या ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि डायमिथोएट ३०० मिलि प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे.( ॲग्रेस्को शिफारस आहे) या प्रक्रियेनंतर अॅसिटोबॅक्टर १० किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जिवाणू खताच्या प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद खतांची बचत होते, उत्पादनात वाढ होते. लागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी. रिजरच्या साहाय्याने भारी जमिनीत १५० सें.मी. (५ फूट) व मध्यम भारी जमिनीत १२० ते १३५ सें.मी. (४ ते ४.५ फूट)अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीची लांबी उतारानुसार २० ते ४० मीटर ठेवावी. एक डोळा पद्धतीने डोळा वरच्या बाजूस ठेवून १ फूट अंतरावर व दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपऱ्यांमधील अंतर अर्धा फूट ठेवून लागवड करावी. जोडओळ पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फुटावर तर भारी जमिनीसाठी ३ फुटावर सलग सऱ्या पाडाव्यात. दोन सरीत उसाची लागवड करून एक सरी रिकामी सोडावी. पट्टा पद्धतीचा आंतरपिके घेण्यासाठी व ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी उपयोग होतो. राज्यात उसाचे उचांकी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ४.५ ते ५ फूट अंतरावर लागवड केलेली आहे. - डॉ.भरत रासकर , ८७८८१०१३६७ (ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता.फलटण, जि. सातारा)