हळदीची भरणी महत्त्वाची

सध्याच्या काळात पावसाने उघडीप दिल्यावर हळद पिकाची भरणी करावी. शिफारशीत मात्रेमध्ये खते द्यावीत. तण नियंत्रण करावे. माती लावताना संपूर्ण कंद झाकावा.भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात, त्यांची चांगली वाढ होते.
Turmeric cultivation
Turmeric cultivation

सध्याच्या काळात पावसाने उघडीप दिल्यावर हळद पिकाची भरणी करावी. शिफारशीत मात्रेमध्ये खते द्यावीत. तण नियंत्रण करावे. माती लावताना संपूर्ण कंद झाकावा.भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात, त्यांची चांगली वाढ होते.  

सध्या हळद लागवड होऊन दोन ते  अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पिकाची शाकीय वाढ होण्याचा (४६ ते १५० दिवस) हा कालावधी असतो.  या वेळी वातावरणात २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असते. या अवस्थेमध्ये फुटवे येतात. हळदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्चित होत असते. पावसाळी हंगामात खोड तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. पावसाने उघडीप दिलेल्या काळात भरणी करावी. खते द्यावीत. तण नियंत्रण करावे.    भरणी करणे 

  • लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करणे आवश्यक असते. या कालावधीमध्ये हळदीस फुटवे व हळकुंड फुटण्यास सुरुवात होते. 
  • दोन्ही गड्डयामधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्डयांना लावावी. 
  • माती लावताना संपूर्ण कंद झाकावा. भरणी केल्यानंतर जर पाऊस नसेल तर पिकास हलकेसे पाणी द्यावे. जेणेकरून भर लावलेली माती निघून पावसाने वाहून जाणार नाही. 
  • भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात, त्यांची चांगली वाढ होते.
  • भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के वाढ होते. 
  • भरणी न केल्यामुळे सूर्यप्रकाशात हळकुंड आल्यास ते हिरवे पडते आणि वाढ खुंटते. 
  • गादी वाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साहाय्याने किंवा दोन गादीवाफ्यामधील  माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. यामुळे मजुरांच्या खर्चात बचत होण्यास मदत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करताना ड्रिपर मातीखाली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 
  •    भरणीचे फायदे 

  • पावसामुळे उघडे पडलेले हळदीचे गड्डे संपूर्णपणे झाकले जातात. गड्डे झाकल्यामुळे कंदमाशी सारख्या किडींना गड्यावर अंडी घालता येत नाहीत. त्यामुळे या किडीची पुढील पिढी नष्ट होण्यास मदत होते. कंदकूज रोगाला देखील आळा बसतो. 
  • उघड्या गड्याच्या बाजूने नव्याने येणारी हळकुंडे संपूर्ण झाकली जातात. त्यांची चांगली वाढ होते. 
  • उथळ झालेल्या सऱ्या भरणी केल्यामुळे खोल होण्यास मदत होते. परिणामी पिकास दिलेले पाणी व्यवस्थित व समप्रमाणात मिळते. पाण्याचा अपव्यय होत नाही. 
  • भरणी करताना शिफारस केलेली खत मात्रा दिल्यामुळे संपूर्ण खते मातीखाली झाकली जातात. परिणामी खतांचा ऱ्हास, अपव्यय होत नाही. दिलेले खत मुळाजवळ पडल्यामुळे चांगला फायदा होतो. खतांची कार्यक्षमता वाढते. 
  • मातीखाली झाकलेल्या हळदीच्या जेठा गड्याची वाढ चांगली होते, शिवाय हळकुंडांची संख्या वाढण्यास मदत होते. परिणामी उत्पादनात वाढ होते. 
  • भरणी केल्यामुळे हळदीची लांब मुळे तुटली जातात. कार्यक्षम तंतुमय मुळे जास्त प्रमाणात तयार होऊन आवश्यक अन्नघटक शोषणाची क्रिया चांगली होऊन उत्पादन वाढीस मदत होते. 
  • भरणी केल्यामुळे लहान-मोठ्या तणांचे नियंत्रण होते. निंदणीच्या खर्चात बचत होते. 
  • माती पोकळ झाल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडांचे चांगले पोषण होते, चांगली पोसतात. 
  • खत व्यवस्थापन

  • हळद पिकासाठी  हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाशची शिफारस आहे.  संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्यावेळी द्यावयाचे असते. नत्र मात्र २ हप्त्यात विभागून द्यावे.
  • पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावयाचा असते. तर नत्राचा दुसरा हप्ता भरणीच्यावेळी (लागवडीपासून २.५ ते ३.० महिन्यांनी (१०० ते १०५ दिवसांनी) द्यावा. यावेळी हेक्टरी २१५ किलो युरिया तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे १२.५० किलो फेरस सल्फेट (हिराकस) आणि १० किलो झिंक सल्फेट आणि हेक्टरी २.० टन निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर करावा. भरणी करताना खते दिल्यामुळे  योग्यरीत्या मातीत मिसळली जातात.
  • पाणी व्यवस्थापन  

  • पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी जर साठून राहिले तर मुळांना हवा (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा येतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल होतात. अशावेळी साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा करावा. 
  • ऑगस्ट, सप्टेंबर हा पावसाचा हमखास कालावधी असल्याने वाकोऱ्याची शेवटची सरी कुदळीच्या साहाय्याने फोडून पाणी बाहेर काढावे.
  • पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी देण्याचे नियोजन करावे. 
  • रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये.  सततचा ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते. या पद्धतीने पाणी दिल्याने १० ते १५ टक्के उत्पादन जास्त मिळते.
  • मातीचे प्रमाण, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी यांचे संतुलन राखावे. जमिनीत केवळ मातीचे कण राहिले तर जमीन कोरडी होईल. त्यामुळे मुळांच्या वाढीला वाव मिळत नाही. जमिनीत पाणी जर जास्त झाले तर जरुरीपेक्षा जास्त ओलेपणा (चिखल) होईल. परिणामी कंद कुजण्याचे प्रमाण वाढेल. 
  • ज्या जमिनीत मातीचे प्रमाण ४५ टक्के, सेंद्रिय पदार्थ ४५ टक्के , हवा आणि पाणी प्रत्येकी २५ टक्के असते अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होते.
  • तण नियंत्रण 

  • हळद पिकामध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. शेणखतातून तणांचे बी शेतात येते. या तणांचे वेळेवर नियंत्रण होणे गरजेचे आहे. 
  • तणांचा प्रादुर्भाव दिसून आला तर लागवडीपासून ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने तणांच्या तीव्रतेनुसार मजुरांच्या साहाय्याने तणांचे नियंत्रण करावे. 
  • हळद उगवणीनंतर कोणतेही तणनाशक फवारू नये. जर तणनाशकाची फवारणी केली तर हळद पिकाच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो. उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता असते.
  •  - डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४  (हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज,जि. सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com