किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी पंजाबराव पांडुरंग अवचार यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन, हरभरा बीजोत्पादन घेतले जाते. याचबरोबरीने कृषी यांत्रिकीकरण, सार्वजनिक- खासगी भागीदारीतून प्रकल्प आणि जलयुक्त शिवार असे उपक्रम राबविले जातात.
वाशीम जिल्हा हा शेतीतील नवनवीन प्रयोग, बीजोत्पादनात अग्रेसर समजला जातो. या जिल्ह्यात मागील काही वर्षात शेतकरी कंपन्यांनी बीजोत्पादनाच्या क्षेत्रात चांगले काम केले आहे. अशा कंपन्यांपैकी एक आहे, किनखेडा येथील संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी. या कंपनीने ३५० सभासदांसह सुमारे ५०० हून अधिक शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या पुढाकाराने राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते. किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी पंजाबराव पांडुरंग अवचार यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून शेती विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि वाशीम कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली १२ फेब्रुवारी, २०१६ मध्ये १८ गावातील शेतकऱ्यांनी एकत्र घेऊन संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. यासाठी सुरुवातीला दहा लाख रुपयांचे भागभांडवल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभे केले. गावामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सोयाबीन बीजोत्पादन, सार्वजनिक- खासगी भागीदारीतून प्रकल्प अंमलबजावणी आणि जलयुक्त शिवार यासारखे अभियान राबवून शेतकऱ्यांना विकासाची दिशा दिली. याचबरोबरीने किनखेडा गावामध्ये ७० एकरावर तुती लागवड करून रेशीम शेतीला सुरवात केली आहे.
सोयाबीन शेतीमध्ये यांत्रिकीकरण अमरावती विभागात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. सोयाबीन पिकाच्या वाढत्या क्षेत्रामुळे शेती कामात मजुरांची समस्या सर्वत्र भेडसावत आहे. कंपनीने ही समस्या लक्षात घेऊन सर्वप्रथम सोयाबीन पिकात यांत्रिकरण करण्याचे ठरविले. सोयाबीन पीक आणि यांत्रिकरणाची माहिती घेण्यासाठी आत्माच्या माध्यमातून सदस्यांचा अभ्यास दौरा आयोजित केला. यातून शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली. आता कंपनीच्या माध्यमातून रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन लागवड तसेच हार्वेस्टरने काढणी केली जाते.
खरीप, रब्बीत बीजोत्पादन कार्यक्रम
कंपनीचे विविध उपक्रम
कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत शेतकरी कंपनी सातत्याने विविध उपक्रम राबविते. यात हमीभावाने खरेदी, गट शेती उपक्रम राबविला जाते. शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत निविष्ठांचे वितरण व इतर उपक्रम हाती घेतले जातात. गट शेती उपक्रमाअंतर्गत कंपनीने ॲग्री मॉलचे बांधकाम चालू केले आहे. या मॉलच्या माध्यमातून शेतमाल आणि बचत गटांची प्रक्रिया उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. कंपनीला ‘आयफा महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ॲवॉर्ड-२०१८‘ चा उत्कृष्ट कंपनी आणि कार्यकारी अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
शेतकरी कंपनीला शासनाचे पाठबळ
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ केंद्र व राज्य कृषी विभागाने केलेल्या सहकार्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीचे स्वप्न साकार झाले. शेतकरी हितासाठी नवनवीन उपक्रम सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कंपनी काम करत आहे. — पंजाबराव अवचार, अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी, किनखेडा दर्जेदार बियाणे पुरवठा कंपनी कृषी विभागाच्या सहकार्याने विविध योजना राबवून शेतकऱ्यांना मदत करीत आहे. केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उपअभियान योजनेअंतर्गत बियाणे प्रक्रिया व साठवणूक केंद्रासाठी ६० लाख रुपयांचे पाठबळ मिळाले. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. — रविंद्र बोडखे (व्यवस्थापक), ९७६७२००४२७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.