दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस पिकांमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. केळी पिकाचे योग्य व्यवस्थापन करत दर्जेदार उत्पादनात येथील शेतकऱ्यांनी सातत्य राखले आहे. शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसायदेखील चांगल्याप्रकारे विकसित झाला.
दापोरी (ता. एरंडोल, जि. जळगाव) गिरणा नदीकाठी वसलेले गाव. शिवारात हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आहे. ठिबक सिंचनामुळे गाव शिवार हिरवेगार झाले आहे. गावाचे शिवार सुमारे २०० हेक्टर असून, लोकसंख्या १५०० आहे. केळी हे गावाचे प्रमुख पीक. तसेच कापूस, मका, गहू, कांदा, बाजरी या पिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे.
केळी पिकाने दिली ओळख गिरणा नदीवर काही वर्षांपूर्वी बांधलेल्या कांताई बंधाऱ्याच्या पाण्याचा चांगला लाभ गावाला होत आहे. ठिबक व्यवस्थेमुळे बहुतांश जमिनी ओलिताखाली आल्या आहेत. त्यामुळे केळी, मका, कांदा, बाजरी या सारख्या पिकांची लागवड वाढली.
मका, बाजरी, कापूस लागवडीवर भर
दूध व्यवसायाची जोड गावातील काही शेतकरी दूध व्यवसायाकडे वळले असल्यामुळे सहकारी दूध सोसायटीची सुरुवात झाली आहे. सोसायटीमध्ये बऱ्यापैकी संकलन होत. तर काही शेतकरी जळगाव शहरासह लगतच्या गावांमध्ये दुधाची घरोघरी जाऊन विक्री करतात. वर्षभर जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी संकरित गवत, मका, बाजरी लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे. गावातील प्रयोगशील शेतकरी पुंडलीक पाटील यांनी दुधाळ गाई, म्हशींचे उत्तम व्यवस्थापन केले आहे. सध्या त्यांच्याकडे २० गायी व ४० म्हशी आहेत. दररोजचे २५० लिटर दूध संकलन होते. जळगाव शहरात पद्मालय ब्रॅण्डने दुधाची विक्री होते. या शिवाय दही, श्रीखंड, तूप यांचीही निर्मिती आणि विक्री ते करतात. योगेश पाटील, विनोद पाटील, मगन पाटील, गोरख पाटील यांनी शेतीला दूध व्यवसायाची चांगली जोड दिली आहे.
गावात आहे डिजिटल शाळा गावात प्राथमिक शाळा चौथीपर्यंत असून, त्यामध्ये ६७ विद्यार्थी आहेत. शाळेचा परिसर वृक्ष लागवड आणि स्वच्छतेमुळे सुंदर दिसतो. येत्या काळात शाळेत सेमी इंग्रजी पद्धत राबविण्याचा शिक्षकांचा मानस आहे. मुख्याध्यापक गोविंदा वंजारी, किशोर पाटील, ललित पाटील हे शाळेत कार्यरत असून, शाळा डिजिटल करण्याचे कामही झाले आहे. पुढे १०० टक्के अभ्यासक्रम संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी संगणक प्रयोगशाळा विकसित केली जाणार आहे.
अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांना काही अडचणींचादेखील सामना करावा लागतो. गिरणा नदीवर पूल नसल्याने रवंजा-म्हसावद-शिरसोली असा ४० किलोमीटरचा फेरा पार करून जळगाव शहरात जावे लागते. विद्यार्थ्यांना शहरात जाण्यासाठी गावात एसटी बस नसल्याने प्रवासासंबंधी अडचणी येतात. शिवार हिरवेगार ठेवण्यासाठी पाणी व्यवस्थित पिकांना देण्याची गरज असते. परंतु, कमी दाबाने वीजपुरवठा अनेकदा होत असतो. तसेच जादा रोहित्रांची मागणीदेखील गावकऱ्यांनी केली आहे. परंतु, एकजुटीतून अडचणींवर मात करण्यासाठी गावकरी प्रयत्नशील आहेत.
- पवन पाटील, ९४२१५२२८८१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.