सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘मार्केट’

marketing of organic vegetables
marketing of organic vegetables

झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय शेतमाल उत्पादक गटाने ग्राहकांना वर्षभर विविध भाजीपाला उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लागवड पद्धतीचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. सेंद्रिय प्रमाणित केलेल्या मालाची आठवडी बाजार व मॉल या स्वरूपात दोन तालुक्यांत विक्री व्यवस्था उभारून शेतकऱ्यांच्या हाती अधिकाधिक नफा मिळावा असे प्रयत्न केले आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील झुलपेवाडी (ता. आजरा) हे आजऱ्यापासून सुमारे २४ किलोमीटरवर असलेले केवळ पंधराशे लोकसंख्येचे गाव आहे. चिकोत्रा हे प्रसिद्ध धरण याच गावात आहे. जिल्ह्यातील अन्य गावांप्रमाणे हे गावही ऊस क्षेत्राखाली आहे. परंतू येथील शेतकरी अल्पभूधारक असल्याने ऊस शेती फारशी परवडत नाही. हे चित्र बदलून टाकण्याचा प्रयत्न या परिसरातील काही शेतकऱ्यांनी एकत्रितपणे केला. त्यातही सेंद्रिय शेती करण्याला प्राधान्य देण्यात आले. त्यातूनच चिकोत्रा सेंद्रिय शेतमाल उत्पादक गटाची स्थापना चार वर्षांपूर्वी झाली. आज गटात सुमारे ३३ शेतकरी कार्यरत आहेत.

अशी केली पूर्वतयारी  कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत गटाची नोंदणी झाल्यानंतर ‘चिकोत्रा’ गटाने शेती पद्धतीत बदल करून घेण्यास सुरुवात केली. जमिनींची तपासणी झाली. ‘आत्मा’तर्फे गांडूळ कल्चर उपलब्ध करून दिले. सुरवातीच्या काळात भात, वरणा आदी पिके घेतली. ‘रेसिड्यू फ्री’ अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांचे नियोजन सुरू केले. यासाठी सातत्याने चर्चासत्रे घेण्यात आली. सेंद्रिय शेतीला आवश्‍यक त्या निविष्ठा तयार करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येऊ लागले. सेंद्रिय शेतीतील पीजीएस हे समूह प्रमाणपत्र घेण्यात आले. ग्राहकांची वर्षभर विविध भाजीपाल्यांची गरज लक्षात घेण्यात आली. त्यादृष्टीने सुरुवातीला २० शेतकरी व त्यांच्याकडील एकूण २० एकरांवर फळभाज्या, पालेभाज्या आदींचे नियोजन झाले. आजरा या आपल्या तालुक्यासह शेजारील चंदगड व गडहिंग्लज येथील शेतकऱ्यांचीही मदत घेण्यात आली.

विक्री व्यवस्था   सर्वात महत्त्वाची गोष्ट होती विक्रीची. झुलपेवाडी गावाला आजरा व गडहिंग्लज या बाजारपेठा जवळ आहेत. येथील नगर परिषदांशी संपर्क साधून त्यांना सेंद्रिय मालाचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यातून बाजारपेठांतील मोक्‍याच्या जागा विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. गटाच्या सदस्यांनी सुरुवातीला विक्रीच्या ठिकाणी वाहन व आपला फलक लावून विक्री सुरू केली. हळूहळू ग्राहकांकडून या मालाला मागणी येऊ लागली. त्यामध्ये वैद्यकीय व्यावसायिक, वकील आदींसह प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता.   ग्राहकांचे नेटवर्क  आपला माल पिकविण्याबरोबर तो स्वतःच विकायचा ही वेळ व श्रम यांच्या अनुषंगाने थोडी अडचणीची बाब होती. त्यामुळे चिकोत्रा गटाने विक्रीची जबाबदारी गडहिंग्लज येथील अभिनव ग्रामीण विकास संस्थेकडे दिली. संस्थेकडे कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळही होते. शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन ग्राहकांच्या मागणीनुसार तो वेळेवर पोच करण्यास सुरुवात झाली. विक्रीस सकाळी लवकर नेलेला भाजीपाला आज दुपारी अकरा वाजेपर्यंत संपून जातो, अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून सुमारे ८० ग्राहकांचे नेटवर्क उभारण्यात आले. मंडळाची गाडी बाजारपेठेत गेल्यास ग्राहकांची झुंबड उडते. आजऱ्यानंतर गडहिंग्लज बाजारपेठेतही ग्राहकांकडून मागणी होऊ लागली. कृषी विभाग- आत्माचे तालुका अधिकारी अनिल यमगेकर यांनीही त्यासाठी प्रयत्न केले. गडहिंग्लज येथे आता मॉलच्या आधारे विक्री सुरू केली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर गावालाही या उपक्रमात सामील करून घेण्यात येत आहे. गावात सुमारे २५ टक्के क्षेत्रावर सेंद्रिय शेती रुजते आहे. 

नफ्याचे सत्तर-तीसचे गुणोत्तर  विविध पालेभाज्यांसह टोमॅटो, कारली, दोडका, वांगी आदींची विविधता ठेवली आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा सुमारे शंभर किलो भाजीपाला या बाजारपेठांमध्ये आठवड्याला येतो. येत्या काळात त्यात वाढ अपेक्षित आहे. फळभाज्यांचा दर किलोला ६० ते ८० रुपये प्रति किलोच्या आसपास असतो. पालेभाज्याची प्रति पेंडी १० रुपये दराने विकण्यात येते. मिळणाऱ्या उत्पन्नातील ७० टक्के वाटा शेतकऱ्यांना दिला जातो. तर तीस टक्के वाटा विक्रीची जबाबदारी असलेल्या संस्थेकडे जातो.   

महापुरात नुकसान, पण जिद्द कायम ग्राहकांना व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून पुढील दिवशीच्या भाजीपाल्यांची माहिती व दर सांगितले जातात. त्यानुसार मागणी नोंदवून डिलिव्हरीचे आगामी नियोजन केले जाते. मागील वर्षी जुलै-ऑगस्टच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा भयंकर सामना करावा लागला. त्यात चिकोत्रा गटातील शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले. गटाचे अध्यक्ष उद्धवराव माने यांनाही चार लाख रुपयांचा फटका बसला. मात्र खचून न जाता मोठ्या हिमतीने त्यातून शेतकरी पुन्हा सावरत आहेत. आता शेतकऱ्यांचे संकलन, क्षेत्र वाढवणे या बाबी जोमाने केल्या जातील, असे माने यांनी सांगितले. गटात रणधीर माने, धोंडीराम माने, संदीप ठाणेकर, अभिजित माने, पांडुरंग माने, बाजीराव देसाई, विजय मगदूम आदी सहकाऱ्यांचा समावेश आहे. 

- उद्धवराव माने, ७७०९९२३६०८,

(अध्यक्ष, चिकोत्रा सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com