सोलापूर ः जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान (Crop Damage) झालेल्या उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना मदत (Compensation) मिळाली. पण बार्शीसह करमाळा, सांगोला या अन्य तालुक्यांना मदत मिळाली नव्हती. पण आता नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत उर्वरित तालुक्यांनाही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याला ११० कोटी ५६ लाख रुपये मिळणार आहेत.
राज्य सरकारने या आधीच अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये देण्यात येणार आहे.
गतवर्षी या कालावधीत अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि करमाळा या चार तालुक्यांना बसला. पण मदत केवळ उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनाच मिळाली. तीही दोन टप्प्यांत.
आता अलीकडेच गेल्या आठवड्यात उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील २६ हजार शेतकऱ्यांसाठी ३४ कोटी ४८ लाख रुपयांची घोषणा झाली. पण बार्शीसह करमाळा व अन्य तालुक्यांना मदत मिळाली नव्हती.
पण आता बार्शी, करमाळा या तालुक्यांसह उर्वरित सर्व नुकसानग्रस्त सुमारे ६५ हजार १६६ शेतकऱ्यांना मदतीसाठी ११० कोटी ५६ लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आठ दिवसांत मिळणार पैसे
राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाची घोषणा केली आहे. आता येत्या दोन-तीन दिवसांत हे पैसे जिल्हा प्रशासनाकडे येतील आणि त्यानंतर पुढील आठ दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. त्यानंतर मदत देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे बंधन प्रशासनाला घालण्यात आले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.