
Khandesh Sugarcane Crushing जळगाव ः खानदेशात १७ लाख टन ऊसगाळप (Sugar Season) झाले आहे. गाळपात समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील खासगी कारखान्याने आघाडी घेतली आहे. या कारखान्याने आठ लाख टन ऊसगाळप (Sugarcane Crushing) केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तीन मोठे कारखाने व एक खांडसरी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात चार कारखाने सुरू आहेत. नंदुरबारात आयान कारखान्यापाठोपाठ पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील तापी सहकारी कारखान्याने गाळप केले आहे.
या कारखान्याचे गाळप सुमारे दीड लाख टनावर आहे. जळगाव जिल्ह्यात चहार्डी (ता.चोपडा) येथील कारखान्याने सर्वाधिक सुमारे तीन लाख टन ऊसगाळप पूर्ण केले आहे.
या पाठोपाठ घोडसगाव (ता.मुक्ताईनगर) येथील कारखान्याने ऊसगाळप पूर्ण केले आहे. या कारखान्याने सुमारे पावणेतीन लाख टन ऊसगाळप केले आहे. भोरस (ता. चाळीसगाव) येथील कारखान्याने सुमारे दीड लाख टन ऊसगाळप केले आहे. जळगाव जिल्ह्यात तीन साखर कारखाने सुरू आहेत.
सुमारे ७० टक्के ऊसतोडणी खानदेशात पूर्ण झाली आहे. ऊसगाळपासाठी अनुकूल स्थिती राहिल्याने गाळपास वेग आला. तोडणी यंदा काहीशी उशिरा सुरू झाली होती. परंतु गाळपास वेग आला. काही कारखान्यांनी गाळपक्षमता वाढविली आहे. यामुळे गाळप वेगात झाले तसेच तोडणीदेखील गतीने झाली.
यंदा मार्च अखेरपर्यंत खानदेशातील १०० टक्के उसाची तोडणी पूर्ण होईल, असे संकेत आहेत. कारण फारसा ऊस क्षेत्रात उभा नाही. काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ८० टक्के ऊसतोडणी पूर्ण झाली आहे.
धुळ्यात एकही कारखाना सुरू नाही. परंतु नंदुरबार व जळगावमधील कारखान्यांनी धुळ्यात ऊसतोडणी केली आहे. शिरपुरात शहादा व चोपडा येथील कारखान्यांनी ऊसतोडणी केली. साक्री भागातून नाशिकमधील कारखान्यांनी ऊसतोडणी केली आहे.
नगर व कन्नड (औरंगाबाद) भागातील कारखान्यांनीदेखील फारशी ऊसतोडणी यंदा खानदेशात केलेली नाही. कारण खानदेशात सहा कारखाने यंदा गाळप करीत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील काही कारखान्यांकडे मध्य प्रदेशातून ऊस येत आहे, अशी माहिती मिळाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.