
नगर : नवरात्रात (Navratri) उपवासासाठी भगर खाण्यात आल्याने शेवगाव,(Shavegaon) पाथर्डी (Pathardi) तालुक्यांत विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २७) घडला. करंजी (ता. पाथर्डी) परिसरातील २२ जणांना भगरीच्या भाकरी खाल्ल्याने त्रास झाला. तर कांबी (ता. शेवगाव) येथील एका कुटुंबातील लोकांनाही भगर खाल्ल्याने त्रास झाला.
त्यामुळे नगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. सध्या नवरात्र सुरू आहे. या काळात अनेक नागरिक उपवास करतात. उपवासाला बहुतांश ठिकाणी भगरीचा वापर केला जातो. पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरातील करंजी, खंडोबाची वाडी, तसेच मराठवाडी येथील अनेक भाविकांनी सोमवारी (ता. २६) रात्री उपवासानिमित्त भगरीच्या भाकरी खाल्ल्या.
त्यानंतर दोन तासांनी संबंधितांना उलटी, चक्कर, मळमळ व श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रात्री दहा वाजता खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. अशोक चव्हाण, प्रकाश राठोड, लीलाबाई चव्हाण, गीताबाई चव्हाण, रामदास चव्हाण, अनिता राठोड, सुशीला चव्हाण, रमेश चव्हाण यांना तिसगाव येथील, तर मच्छिंद्र दानवे, आदेश दानवे, भाऊसाहेब दानवे यांना करंजी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
विषबाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा
कांबी (ता. शेवगाव) येथील नरके कुटुंबातील शांताबाई धोंडिराम नरके (वय ६०), भाऊसाहेब भीमराव नरके (वय ३८), राजेंद्र शंकर नरके (वय ४५), मनीषा राजेंद्र नरके (वय ३५), अश्विनी शिवाजी नरके (वय ३०) यांना भगर खाल्ल्यानंतर चक्कर येणे, मळमळ होणे, उलट्या, असा त्रास होऊ लागला.
दोन दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्याच्या शेजारील शिरूर कासार (जि. बीड) तालुक्यातही अनेकांना भगर खाल्ल्याने त्रास झाला. या प्रकरणी तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाथर्डीचे माजी सभापती अॅड. मिर्झा मण्यार यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.