
बाळासाहेब पाटील ः अॅग्रोवन वृत्तसेवा
Onion Market Update मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Farmer) प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान (Onion Subsidy) देण्याची घोषणा सोमवारी (ता. १३) विधानसभेत केली.
कांद्याच्या घसरलेल्या (Onion Rate) दराबाबत उपाययोजनांसाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल दोन दिवसांपूर्वी पणन विभागाला सादर केला.
या अहवालात २०० किंवा ३०० रुपये सानुग्रह अनुदानाची शिफारस केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी ३०० रुपये अनुदानाची घोषणा केली.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी ही अनुदानाची रक्कम खूपच कमी आहे. सरकारने किमान ५०० रुपये अनुदान देण्याची मागणी केली. मात्र सरकारने ती फेटाळून लावली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला.
कामकाजाला सुरू होताच मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात कांद्याबाबत निवेदन केले. ते म्हणाले, ‘‘खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे.
देशातील इतर राज्यांतील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे.
कांदा नाशीवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. सध्या कांद्याचे दर पडले आहेत. यासंदर्भात शासनाने एक समिती नेमली होती. समितीने २०० आणि ३०० रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती.
या शिफारशीनुसार आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये अनुदान देणार आहोत. २०१६-१७ मध्ये १००, तर १०१७-१८ मध्ये २०० रुपये, पण आता ३०० रुपये अनुदान देणार आहोत. सध्या कांद्याला साडेदहा रुपये दर मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर आक्षेप घेत छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढविला. मुख्यमंत्री मागे किती मदत केली याचा संदर्भ देऊन आता दिलेल्या अनुदानाशी त्याचा संदर्भ जोडत आहेत.
मुळात खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे १०० आणि २०० रुपये अनुदान आताच्या खर्चाशी तुलना करता केलेली मदत ही नगण्य आहे. कांद्यासाठी प्रतिक्विंटल १२०० रुपये खर्च येतो.
शेतकऱ्यांच्या हातात पाचशे ते सातशे रुपये येतात. करोडो रुपये खर्च करणाऱ्या सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे. सरकार आमची मागणी पूर्ण करत नाही.
आमच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. भुजबळ यांच्या आक्रमक पवित्र्याने विरोधी आमदारांनीही वाढीव अनुदानाची मागणी करत घोषणाबाजी केली. गोंधळातच विरोधकांनी सभात्याग केला.
‘कृषिमंत्री संवेदनाहीन’
राज्यात पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यावर सरकार काहीच बोलत नाही. संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
तरी कृषिमंत्री हे रोजचेच आहे, असे सांगत आहेत. कृषिमंत्री संवेदनाहीन आहेत, अशी टीका भुजबळ यांनी केली.
सभागृहाबाहेरही कृषिमंत्री सत्तार यांच्या विधानाचे पडसाद उमटले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या कृषिमंत्र्यांचा धिक्कार असो... ‘धिक्कार असो, धिक्कार असो कृषिमंत्र्यांचा धिक्कार असो...
या कृषिमंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशा घोषणा दिल्या. ‘निवडणुकीचा गाजर हलवा, महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा, खोके सरकार हाय हाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
गुजरातमध्ये ‘नाफेड’ची खरेदी सुरू
गुजरातमधील कांद्याचे दर पडल्याने केंद्र सरकारने गुजरातमध्ये तीन शहरांमध्ये कांदा खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. ९ मार्चपासून भावनगर, गोंडल आणि पोरबंदर येथे खरीप कांदा खरेदी सुरू केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.