पंढरपूर, जि. सोलापूर ः खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याच्या (Sitaram Sugar) उभारणीसाठी कारखान्याचे मुख्य प्रवर्तक कल्याणराव काळे यांनी शेअर्सपोटी जमा केलेले सुमारे पाच हजार ठेवीदारांचे १७ कोटी व त्यावरील व्याज असे एकूण जवळपास ४१ कोटी रुपये येत्या ५ जानेवारीपर्यंत परत द्यावेत, असा आदेश ‘सेबी’ने (SEBI) दिला आहे, अशी माहिती तक्रारदार राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष अॅड. दीपक पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
पवार म्हणाले, ‘‘मागील काही वर्षांपासून सीताराम महाराज साखर कारखान्याकडे शेअर्स म्हणून भरलेले पैसे परत मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कारखान्याचे तत्कालीन मुख्य प्रवर्तक कल्याणराव काळे व त्यांच्या संचालकांकडेही वारंवार मागणी केली. परंतु अद्याप पैसे परत मिळाले नाहीत.
म्हणून सेबीकडे लेखी तक्रार केली होती. त्यावर सेबीने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत, येत्या पाच जानेवारीपर्यंत वार्षिक १५ टक्के व्याज दराने पैसे परत देण्याचे आदेश कारखान्याचे तत्कालीन अध्यक्षासह संचालकांना दिले आहेत.’’
‘...अन्यथा संचालकांच्या संपत्तीवर टाच’
‘‘संचालक मंडळाने व्याजासह पैसे परत द्यावेत, अन्यथा कारखान्याच्या तत्कालीन व सध्याच्या संचालकांच्या संपत्तीवर टाच आणली जाईल, असे सेबीच्या आदेशात म्हटले आहे,’’ असेही असेही पवार म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.