मालेगाव, जि. नाशिक : रोहित्र बंद पडल्याने शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसान (Farmer Loss) भरपाईपोटी (Compensation) ‘महावितरण’ने (Mahavitaran) संबंधित शेतकऱ्याला प्रतिदिन १ हजार २०० रुपये प्रमाणे ६ लाख ८६ हजार ४०० रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश नाशिक जिल्हा ग्राहक न्याय आयोगाने दिला आहे.
तसेच जोपर्यंत भरपाई अदा होत नाही, तोपर्यंत नऊ टक्के व्याजासह रक्कमदेखील द्यावी, असेही सांगितले आहे. ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सचिन शिंपी यांनी हा आदेश दिला.
प्रा. कौतिक पवार यांची खायदे (ता. मालेगाव) शिवारात शेती आहे. यात दोन वीजपंप आहेत. जून २०१७ मध्ये वीजपंपांना पुरवठा करणारी डीपी नादुरुस्त झाली. पवार यांच्या शेतीसाठीच वीजपुरवठा बंद झाला. त्यांनी कक्ष वायरमन, अभियंता उपविभाग, तसेच महावितरणच्या विभाग व सर्कल कार्यालयात तोंडी, लेखी, दूरध्वनीवर तक्रारी केल्या.
नियमानुसार, ४८ तासांत डीपी दुरुस्त न झाल्यास प्रतिदिन १ हजार २०० रुपयांची मागणी केली. या काळात त्यांना सरासरी अवास्तव बिले देत बिल भरण्याचा आग्रही झाला. यानंतर पवार यांनी जिल्हा ग्राहक पंचायतीकडे दाद मागितली. जिल्हा ग्राहक न्याय आयोगात त्यांच्यातर्फे ॲड. कल्याणी कदम यांनी युक्तिवाद केला.
विलास देवळे यांनी पवार यांना मार्गदर्शन केले. आयोगाने पवार व त्यांच्या वकिलांचे म्हणणे मान्य करत सुमारे पाऊण सात लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. हा निकाल ग्राहक हिताचा असून ‘महावितरण’ने यातून बोध घ्यावा, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.