
Gondia News पारा वाढता असतानाच अवकाळी पाऊसही (Unseasonal Rain) बरसत आहे. परिणामी यंदा पाणीटंचाईची (Water Shortage) तीव्रता कमी राहील, असे जाणकार सांगतात. मात्र मे व जून महिन्यांत जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता पाहता प्रशासनाकडून खबरदारी म्हणून टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे हमखास पावसाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. मात्र यंदा वातावरणातील बदलाचा या जिल्ह्यांनाही फटका बसला आहे.
मॉन्सूनकाळात या भागात पावसात मोठा खंड राहतो, तर अवकाळी पाऊस मात्र कधीही बरसत पिकांचे नुकसान करीत असल्याची स्थिती आहे. आताही उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
परिणामी, यंदा पाणीटंचाईची तीव्रता तुलनेत कमी राहील, अशी शक्यता आहे. परंतु खबरदारीच्या उपायांतर्गत मे व जून महिन्यांतील उन्हाची अधिकता लक्षात घेता ७८ गावांसाठी पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याकरिता ८ कोटी रुपयांचा संभावीत खर्च होणार आहे.
त्यामध्ये विहिरींचे खोलीकरण, खासगी विहिरींचे अधिग्रहण, टॅंकरने पाणीपुरवठा, पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती व विंधन विहिरी तयार करणे या कामांचा समावेश आहे. ७८ गावांमध्ये तब्बल १३० विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्तावीत असून, ३०० उपाययोजना राबविल्या आहेत.
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने तिसऱ्या टप्प्यात उपाय योजना करण्यावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले.
विशेष म्हणजे जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पातील साठ्याची स्थिती चांगली आहे. भूजल पातळीदेखील ०.५ मीटरने वाढली आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी राहील, असे सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.