नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागातील बोराळे (ता. नांदगाव) येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती (Agriculture) आहे. गावाचे पूर्ण क्षेत्र एक हजार हेक्टर आहे. यापैकी ५०० हेक्टर क्षेत्र हे गिरणा नदी (Girna River) पलीकडे आहे; मात्र पूरस्थिती असल्यास नदी ओलांडता येत नाही. सध्या पावसाने उघडीप दिल्याने नदीचे पाणी काहीसे ओसरले आहे.
त्यामुळे नदीपलिकडे असलेल्या शेतात वेचून ठेवलेला ४ क्विंटल कापूस शेतकरी राजेंद्र चंदिले हे पात्रातून घरी आणत होते; मात्र नदीपात्रातून येत असताना बैलगाडी उलटली. ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर बैलगाडीतील शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यात यश आले. अचानक नदीपात्रात बैलगाडी उलटली.
त्यात असलेला कापूस डोळ्यांसमोर वाहून गेला. बैलांना फाशी लागली होती. गावातील काही तरुणांना हे समजतास त्यांनी नदीकडे धाव घेतली. संदीप सोळुंके, किशोर सौंदाणे, पांडुरंग सौंदाणे, पंकज देवरे, शैलेंद्र सोळुंके यांनी गाडीत बसलेले कोमल सोळुंके, आशा सोळुंके आणि सुरेखा चंदिले यांना वाचवले.
मुलगा गौरव याला पोहता येत असल्याने त्याने बैलांचे प्राण वाचवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. उलटलेली गाडीदेखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती; मात्र शोध घेतल्यानंतर ती सापडली.. आतापर्यंत अनेकदा बैलगाडीचा अपघात झाला आहे. त्यात शेतकऱ्यांसह बैलांचाही मृत्यू झाला. १९७२ ते २०२२ पर्यंत आठ शेतकरी नदीत वाहून गेले तर पाच ते सहा शेतकऱ्यांना गावातील तरुणांनी वाचवले.
शेतकऱ्यांची वणवण आणि नुकसान थांबणार कधी? चालू वर्षी १६ जुलै २०२२ पासून गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे; तो अद्याप सुरू आहे. १०००० ते १५००० क्युसेक पाणी रोज गिरणा नदीपात्रात वाहत आहे. हे पाणी इतके जास्त आहे की.
शेतकऱ्यांना शेतातील आपल्या गुरांना चारापाणी करण्यासाठी २५ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. पण त्या रस्त्याची दुरवस्था आहे. कुठलाही माल वाहतूकदार शेतकऱ्यांचा माल घेण्यासाठी शेतापर्यंत येत नाही. वाहतूक करणे शक्य नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा माल शेतात सडून पडत आहे.
सर्व बाजूने कोंडी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सरपंच राजेंद्र पवार, आमदार सुहास कांदे यांनी मागील पंधरवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर या गोष्टीचा विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. लवकरात लवकर गिरणा नदीपात्रावर पूल व्हावा. शेतकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या अडचणी प्राधान्याने दूर कराव्यात.- राजेंद्र सुपडू चंदिले, अपघातग्रस्त शेतकरी.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.