
Akola News : शहरातील राजराजेश्वर मंदिराच्या भागात मांडेकर परिवाराची चौथी पिढी एकाच घरात आजही वास्तवात आहे. कै. रामभाऊ बळीराम मांडेकर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी रमाबाई वयाच्या ९८ वर्षांतही स्वाभिमानाचे धडे देत पाच मुले आणि पाच सुना यांच्या सहवासात एकत्र कुटुंबात आयुष्याच्या उत्तरार्धात आनंदाने संसार करीत आहेत.
कुटुंबाचा कर्तापुरुष म्हणून ज्येष्ठ मुलगा महादेव याच्या नेतृत्वात तिसऱ्या पिढीतील नऊ मुला-मुलींचे विवाह थाटात झाले. कुटुंबाचा गोतावळाने मोठा आकार घेतला असून, सहा मुली मुंबई, पुणे, कारंजा, चंद्रपूर, हिंगोली, अकोट येथे आनंदाने नांदत आहेत. तीन मुले सुनांसह त्यांच्या नवविचाराने संसार फुलवत आहेत. चौथ्या पिढीत सात नाती आणि सहा नातू अशी पिढी रममय झालेली दिसून येते.
कुटुंबप्रमुख महादेव यांच्या नियंत्रणात कुटुंबाने एकत्रित कार्यपद्धती स्वीकारली असून, पुरुषोत्तम यांना गोपाल सहकार्य करीत जयहिंद चौकातील दुर्गा सौभाग्य भंडार या प्रतिष्ठानचा कार्यभार हाताळतात.
घरातील मुख्य व्यवसायाला घरातील ज्येष्ठ महिला लताबाई, दाबाई यांच्या मार्गदर्शनात, सीमा, शीला, वर्षा अग्रक्रमाने सीझनच्या वेळी व नियमित भरीव सहकार्य करतात.
एकत्र कुटुंब परिवारात जीवनातील मार्गदर्शक दिशा व नैतिक मूल्याची जोपासना होत असून, सुखदु:खाचे आदान-प्रदान होत असताना जीवनकार्याची उत्तम दिशा प्राप्त होते.
यामध्ये सध्याच्या नवपिढीच्या स्वहित, आर्थिक प्राधान्य धोरणामुळे संयुक्त कुटुंबाला तडा जात आहे. याकडे कुटुंबाने दुर्लक्षित धोरण ठेवून, त्यागमय वृत्तीने, वास्तव स्थितीनुसार कार्य करण्याची पद्धत अंगीकारल्याची दिसून येते.
शेती, शिक्षण क्षेत्रात कुटुंबाचे योगदान
परिवारातील गोपाल हे शेती सांभाळत जिल्ह्यातील सेवा सोसायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. परिवारातील सर्वात धाकटे असलेले ज्ञानेश्वर शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. वडिलांचा वसा अंगीकारत त्यागमय वृत्तीने कार्यकरीत अन्याय, चुकीच्या बाबींना थारा न देता प्रामाणिकता, विश्वासार्हता, परोपकार, न्यायवृत्ती या मूल्यांचे अंगीकार करून परिवाराचा डोलारा वैभवी फुलत आहे. परिवारात दरवर्षी २१ मे रोजी वडिलांचा पुण्यतिथी सोहळा संतांच्या छायेत करण्यात येते.
अडीअडचणींवर मात करून मूल्यांची जोपासना
एकत्र परिवारातून जीवनातील अनेक बहुमोल मूल्ये रुजविले जात आहे. त्यातून अनेक कठीण प्रसंगावर मात करता येते. ज्येष्ठांची सेवा सहज होते. सहजानंदासह परमानंद प्राप्त होतो. त्यामध्ये त्यागभावना ही उच्चदर्जाची असते.
परिवारात आर्थिक विषयामुळे भरपूर समस्या, अडचणी उद्भवतात. या वेळी जीवनातील अंतिम सत्य हे कर्मानुसार श्रेष्ठ असल्याने कर्तव्यास प्राधान्य दिल्यास जीवनातील न्यायाचा आनंद उपभोगता येतो, अशी मूल्ये कुटुंबीयांमध्ये रुजविली आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.