
Kolhapur News : कोल्हापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी कोल्हापूर प्राधिकरणातील ४२ पैकी ७ गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे संपादन (Acquisition of agricultural lands) करण्यात येणार आहे. या सात गावांतील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील (Rural Area) भूसंपादनाप्रमाणे चार पट मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तरी त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग व भूसंपादन विभाग यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार वाढीव मोबदला मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांनी प्राधिकरणातील शिये, भुये, निगवे धुमाला, भुईवाडी, टोप, नगाव व जटाळवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना वाढीव मोबदला मिळण्याबाबतच्या निवेदनावर चर्चा केली. या वेळी आमदार पी. एन. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, भूसंपादन अधिकारी शक्ती कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की प्रशासनाने कोल्हापूर प्राधिकरणातील सात गावांमधील ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी राष्ट्रीय महामार्गात जाणार आहेत, त्यांना इतर ग्रामीण भागात ज्याप्रमाणे मोबदला मिळतो त्याप्रमाणे मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करावा व तो शासनाला सादर करावा.
भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळण्यापासून प्राधिकरणातील या सात गावांमधील एकही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. या गावांमधील भूसंपादनाच्या वाढीव मोबदला मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर गेल्यानंतर तो मोबदला मिळण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी या वेळी शेतकऱ्यांना सांगितले.
शेतकऱ्यांच्या या निवेदनानुसार इतर ग्रामीण भागांप्रमाणे भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर करण्याबाबतची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.