Chhatrapati Sambhaji Nagar : मराठवाड्यातील ऊस उत्पादकांची देयके येत्या पंधरा दिवसांत न मिळाल्यास सहकार मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी पाटील यांनी दिला आहे.
यासंदर्भात संघटनेच्या निवेदनानुसार, मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांनी चार महिन्यांपूर्वी विविध साखर कारखान्यांना उत्पादित केलेला ऊस घातला. परंतु संबंधित कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप मोबदला दिला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाच्या बोजा वाढत चालला आहे. शिवाय खरीप हंगामही उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने शेतकरी तणावात आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील तात्यासाहेब हरिभाऊ पोळ या शेतकऱ्याने आपला ऊस नगर जिल्ह्यातील वाळकी येथील पियुष शुगर लि. साखर कारखान्यात घातला होता.
त्या शेतकऱ्याने कारखान्यांच्या चेअरमन व संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी मागणी करून सुद्धा उसाची देयक न मिळाल्यामुळे व्हिडिओ लाइव्ह करून विष प्राशन केले. हीच परिस्थिती सर्व शेतकऱ्यांची असून त्यांना सुद्धा या मार्गाने जाण्याची वेळ येऊ नये म्हणून कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम चुकती करणे आवश्यक आहे.
येत्या २५ मे पूर्वी मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम जमा करण्यात यावी, अन्यथा सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने जयाजीराव सूर्यवंशी पाटील यांनी दिला आहे.
पियुष कारखान्याच्या कार्यकारी संचालकासह चेअरमन यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या उसाचे चुकारे न देणाऱ्या ११ कारखान्यांची नावे देऊन न्याय देण्याची मागणी जयाजीराव सूर्यवंशी पाटील यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.