
Agriculture Pump Electricity सासवड, जि. पुणे : कृषिपंपांच्या (Agriculture Pump) थकबाकीच्या कारणामुळे वसुलीसाठी थेट रोहित्रांचाच वीज पुरवठा खंडित (Power Supply) करण्याचे सत्र गेल्या चार दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीने सुरू केले आहे.
यामुळे ऊस तोडणीचा (Sugarcane Harvesting) हंगाम वेग घेत असताना आणि रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची गरज असताना महावितरणच्या (Mahavitaran) या कारवाईमुळे शेतकरी संतापले आहे.
तरी महावितरण विभागाने थकबाकी वसुलीकरिता सरसकट बंद केलेले रोहित्र तत्काळ सुरू करावेत. अन्यथा सोमवारी (ता. १३) विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी निवेदनाद्वारे विद्युत वितरण कंपनीला दिला आहे.
सासवड येथील महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांच्याकडे या बाबतचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, महिलाध्यक्षा सुनीता कोलते, युवक प्रदेशचे महासचिव गणेश जगताप, सोमेश्वर कारखान्याचे संचालक तुषार माहूरकर, विकास इंदलकर, पिनू काकडे, संतोष सोनवणे यांसह शेतकरी उपस्थित होते.
रोहित्राचा वीज पुरवठा बंद असल्याने अनेक गावातील वीज गायब आहेत. गावच्या पाणी पुरवठा योजना, शेतीच्या योजनांना एकाच रोहित्रावरून वीज पुरवठा होतो. सध्या खंडित वीज पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट, अतिवृष्टी आणि आता खंडित वीज पुरवठ्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आहे.
सध्या पुरंदर उपसाच्या पाण्यामुळे शेततळी, पाझर तलाव, ओढे यात काही प्रमाणात पाणी आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठा यामुळे पाणी असूनही पिकांना देता येत नाही. त्यामुळे उभी पिके जळू लागली असून आता रोहित्रावरीलच वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांवर महावितरणने योग्य कारवाई करावी. मात्र त्यामुळे इतर शेतकऱ्यांना वेठिस धरू नये.
शेतकरी गेली २ वर्षांपासून अतिवृष्टी, पडलेल्या बाजारभाव, फळांवरील विविध रोग यामुळे मेटाकुटीला आला आहे. पुरंदर उपसा योजनेच्या लाभक्षेत्रात फळबागा, ऊस आणि इतर पिकांचे क्षेत्र वाढले आहे.
सध्या खरिपाची कांदा, गहू, हरभरा तसेच भाजीपाला, जनावरांचा चारा पिके, ऊस आदी पिके शेतात उभी आहेत. विद्युत वितरण कंपनीने सध्या रोहित्रावरील वीज पुरवठा खंडित केल्याचे सत्र सुरू केले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून हातातोंडाशी आलेला घास विद्युत वितरण कंपनीच्या अरेरावावीच्या धोरणामुळे हिरावून घेतला जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.