कृषिमंत्री भुसे चिंतन शिबिरात; शेतकरी मात्र वाऱ्यावर

खा. संजय राऊत यांचा कृषिमंत्री दादा भुसेंवर निशाणा.
Dada Bhuse
Dada BhuseAgrowon

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे. भुसे यांनी ऐनवेळी पलटी मारून एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गुरूवारी (ता. २३) रात्री गुवाहाटी गाठली. या पार्श्वभुमीवर राज्यातील पीकपाणी आणि पेरण्यांचा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. खरीप हंगामात कृषिमंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. मात्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे सध्या आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहेत, असे ट्विट शिवसेना राऊत यांनी केले आहे.

राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मात्र अजूनही पावसाने राज्यात हजेरी लावलेली नाही. या परिस्थितीकडे लक्ष वेधत राऊत यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये राऊत म्हणाले, "सध्या राज्यात पाऊस कमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहेत." या ट्विटमध्ये राऊत यांनी खरीप पेरण्याकडे लक्ष देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यामुळे शेतीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. जून महिना संपत आला असला तरी राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही भागात मात्र पेरण्याची लगबग सुरू झालेली आहे. पाऊस-पाणी कसे राहील, दुबार पेण्यांची वेळ येईल का हे प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत.

तसेच खरीप हंगामासाठी पंतप्रधान पिकविमा योजनेचा प्रश्नही अजून पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. राज्यात पिकविम्यासाठी बीड मॉडेल लागू करण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आलेली असली तरी विमा कंपन्यांचा पर्यायी योजनेला फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे हा बार फुसका ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर शिवेसेनेचे चार मंत्री त्यांच्या सोबत असल्याची बातमी मंगळवारी (ता. २१) आली होती. त्यात फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कृषिमंत्री दादा भुसे यांचेही नाव आले होते. ॲग्रोवनने थेट भुसे यांना दूरध्वनी करून विचारणा केली असता त्यांनी त्याचा इन्कार केला होता.

"आपण नॉट रिचेबल असल्याची बातमी खोटी आहे. आपण शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असून दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहोत. वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे," असे भुसे म्हणाले होते. दादा भुसे वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीला उपस्थितही होते. तसेच दुसऱ्या दिवशी झालेल्या मंत्रमंडळ बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती. परंतु गुरूवारी (ता. २३) रात्री अचानक दादा भुसे गुवाहाटीत दाखल झाल्याची बातमी आणि चित्रफीत प्रकाशित झाली.

ॲग्रोवनने दादा भुसे यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन बंद आहे. त्यामुळे आता दादा भुसेही नॉट रिचेबल झाले आहेत, असे म्हणावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com