
वाशीम ः ‘‘शेतकऱ्यांच्या उत्पन्न (Farmer Income) वाढीसाठी शेतीला पर्यटनाची जोड देणे आवश्यक आहे. कृषी पर्यटनाच्या (Agritourism) माध्यमातून शहरी भागातील माणूस शेताकडे आला, तर तो ग्रामीण संस्कृतीशी (Rural Culture) जोडला जाईल.
शेतात उत्पादित मालाची (Agriculture Produce) कृषी पर्यटनाच्या माध्यमातून विक्री होण्यास मदत होणार असून, अनेकांच्या हाताला रोजगार (Employment) उपलब्ध होणार असल्याने रोजगार निर्मितीला (Employment Generation) चालना मिळण्यास मदत होईल,’’ असे प्रतिपादन कृषी पर्यटन प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन पुरस्कार प्राप्त शेतकरी पांडुरंग तावरे (Pandurang Taware) (पुणे) यांनी केले.
वाशीम जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आत्मा प्रकल्प संचालक आणि गीताई ह्यूमनकाइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त वतीने कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. तावरे बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे एमटीडीसीचे पर्यटन अधिकारी सुनील येताळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व अविनाश जोगदंड यांची उपस्थिती होती.
श्री. तावरे म्हणाले, ‘‘बालपण शेतात गेले. पर्यटन व्यवस्थापन व मार्केटिंग कसे करावे हे शिकलो. तांत्रिकदृष्ट्या पर्यटनाचे ज्ञान व दुसरीकडे हाडाचा शेतकरी अशी सांगड कृषी पर्यटन विकासासाठी घातली. शेतकऱ्यांनी जे पिकते ते विकायला शिकले पाहिजे.
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी हा उत्पादित माल कृषी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना चांगल्या किमतीत जागेवरच विकू शकतो.
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सोयाबीन विकून नाही, तर सोयाबीन दाखवून पैसे कमवायचे आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना साधे सात्त्विक भोजन उपलब्ध करून द्यायचे आहे.
कृषी संस्कृतीचा अभिमान प्रत्येक शेतकऱ्याला असला पाहिजे,’’ असेही ते म्हणाले. ‘‘कृषी पर्यटनासाठी शेतात येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध प्रकारची पिके शेतात असली पाहिजे. कृषी पर्यटन क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे काम करून पुढे यायचे असेल तर त्यांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठाला भेट द्यावी.
विद्यापीठांनी केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग बघावे. तशाच प्रकारचे प्रयोग आपल्या शेतात करण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून उत्पादित मालाचे विक्री केंद्र सुरू करावे.
एका पर्यटकाच्या माध्यमातून दहा लोकांना रोजगार मिळण्यास मदत होते. शेतामध्ये नवनवीन प्रयोग करावे. कृषी पर्यटनामुळे घरातील सर्वांना रोजगार उपलब्ध होण्यासोबतच गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना मानसन्मान मिळणार आहे,’’ असेही ते म्हणाले.
श्री. येताळकर म्हणाले, ‘‘कृषी पर्यटनाचा उद्देश हा शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा आहे.
’’ श्री. तोटावर म्हणाले, ‘‘कमी शेती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना कृषी पर्यटन विकसित करण्याला चांगली संधी आहे. कृषी विभागाच्या मदतीने कृषी पर्यटनाला चालना देण्यात येईल.’’ श्री. जोगदंड यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक अविनाश जोगदंड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत अविनाश मारशेटवार यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.