
नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यातल शेतकऱ्यांचा विकास (Farmer Development) करायचा असेल तर संत्रा (Orange), सोयाबीन (Soybean) आणि धानावरील प्रक्रिया (Paddy Processing Industry) उद्योग सुरू करावे लागतील. केवळ पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर आरोप करता, तुमच्या मनगटात दम नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधारी आणि विदर्भ मराठवाड्यातील नेत्यांना सुनावले.
ज्या साखर कारखान्यांवरून तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना दोष देता त्या कारखान्यांमुळे आर्थिक सुबत्ता आली हे मान्य करा. तुमच्याकडे चांगली शेती असून, कापसाचे विक्रमी उत्पादन असतानाही तुम्ही सूतगिरण्या उभा करू शकला नाही, अशा शब्दांत पवार यांनी विदर्भातील नेत्यांचे वाभाडे काढले.
विरोधकांच्या २९३ अन्वये आणलेल्या प्रस्तावावर बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात विदर्भ आणि मराठवाड्यातील अनुशेषाला येथील नेतेच जबाबदार असल्याचे सांगत कारभाराचे वाभाडे काढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कधी मिश्किल तर कधी टोकदार भाषेत त्यांनी सुनावत विदर्भ- मराठवाड्याच्या विकासासाठी एकत्र काम करू असेही सांगितले.
भाषणाच्या प्रारंभी त्यांनी ५२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या हे आर्थिक बेशिस्तीचे लक्षण असल्याचे सांगितले. आर्थिक तरतूद न पाहता मुख्यमंत्री, त्यांचे मंत्री काहीही घोषणा करतात. मग आता तुम्ही कुणाच्या ‘बा’चे ऐकत नाही म्हणता तर आता त्यांच्या घोषणांची पूर्तता करून दाखवा असे आव्हानही त्यांनी केले.
पवार म्हणाले, ‘तुम्ही आमचे सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसांपासून प्रयत्न केले. पण तुम्ही काहीच बोलत नव्हता. आता सरकार आल्यावर हळू हळू एकएक सांगत गेला. मी याला फोन केला, त्याला फोन केला. मग तुम्ही बदला घेतला असे सांगितले. तुमच्या प्रतिमेला हे शोभणारे नाही.
प्रक्रिया उद्योग असावेत.
सोयाबीन, धान, संत्रा ही विदर्भ आणि मराठवाड्यातील महत्त्वाची पिके आहेत. यावर प्रक्रिया उद्योग असले पाहिजेत. साखर कारखान्यांबाबत सत्ताधारी पक्ष वेगवेगळी वक्तव्ये करत असतो. पण कारखान्यांमुळे सुबत्ता आली हे खरे आहे. उद्या वेळ आली तर विदर्भातील कारखाने १३, १४ कोटीला कुणीही घेणार नाहीत. कारखाना चालवायला हिंमत लागते . कारखाना चालवणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही.
तुम्ही आत्मचिंतन का करत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात दूध उत्पादन का वाढले नाही. इथल्या म्हशी, गायी दूध देत नाही नाहीत का0. रेशीम उद्योग, शेळीपालन प्रकल्प कुणी अडवले. कापूस जास्त पिकतो मग सूतगिरणी का नाही. तुम्ही इच्छाशक्तीच दाखवत नाही. उगाचच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर आरोप का0 तुमच्या मनगटातील ताकद दाखवा.जिल्हा बॅंका कुणी बंद पाडल्या0 याचाही विचार व्हायला हवा. बँका ताकदीने चालवतात त्यांचा गट तट बघू नका. चुकीच्या पद्धतीने चावणाऱ्यांना समज द्या, पण पक्षीय अभिनिवेश ठेवू नका.’
संत्री प्रकल्प का सुरू नाही0
संत्र्यावर प्रक्रिया करणारा मोर्शीचा प्रकल्प ३० वर्षांपूर्वी सुरू करण्याची पायाभरणी मी केली. पण अजूनही संत्र्यावर प्रकिया करणारे युनिट सुरू झालेले नाही. तुम्हाला सोयीचे असले की लगेच भागभांडवल देता. शंभूराज देसाई, अभिमन्यू पवार यांना लगेच भागभांडवल दिले. बाकीच्या भागाचा विकास व्हायला नको का0 राज्यात साडेबाराशे मेट्रिक टन गाळपाचा कारखाना चालूच शकत नाही. अन्य कारखान्यांनाही मदत करा. गट तट बघू नका, असेही पवार म्हणाले
शेतकऱ्यांना पाणी हवे पण बेशिस्त नको
पुरवणी मागण्यांत उर्जा खात्यासाठी मोठी तरतूद केली. मात्र, ७५ हजार कोटींची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे. पण आर्थिक शिस्तही लागली पाहिजे. सवलतीच्या सवयी लागल्या तर पुढील काळात राज्याचा खेळखंडोबा होईल. लोकप्रिय घोषणा सोप्या वाटतात पण महाराष्ट्राचे कल्याण होईल का0 याचा विचार करावा लागेल, असेही पवार म्हणाले.
मुख्यमंत्री तुमचे मग विकास का नाही
गेल्या ६० वर्षांत २० वीस वर्षे विदर्भ आणि मराठवाड्यातील मुख्यमंत्री आहेत. तरीही जाणीवपूर्वक पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर आरोप केला जातो. आम्हाला बदनाम करायचे असा प्रकार सुरू आहे, असा आरोप पवार यांनी केला. मी जलसंपदा मंत्री असताना वाशिमला अधिकचे पाणी देण्याचे काम केले होते. त्यात दुजाभाव केला नाही. हे प्रकल्प गतीने होण्यासाठी प्रयत्न केला. तरीही आमच्यामागे चौकशा लावल्या. लोकशाहीत अशा गोष्टी घडतात. पण कुठलाही गुन्हा नसताना आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले.
शेतकरी नाऊमेद आहे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते पीक विम्यासाठी सांगत होते. पण आता काही रुपयांचा विमा मिळत आहे, त्यामुळे शेतकरी नाऊमेद झाला आहे, असा आरोप पवार यांनी केला. ते म्हणाले, पीक विमा काढल्यानंतर आपल्याला चांगली रक्कम नुकसानीपोटी मिळावी अशी अपेक्षा असते. तसेच झालेले नाही.सध्या शेतकऱ्यांत फार अवस्था वाईट आहे. नाऊमेद झाले आहेत. पीक विम्याकडे लक्ष द्यावे लागेल.’
वेगळा विदर्भ ही देवेंद्र फडणवीसांची कल्पना
साडेचार वर्षे मुख्यमंत्री रहायचे आणि नंतर वेगळा विदर्भ करायचा प्लॅन देवेंद्र फडणवीस यांचा होता, असा आरोप पवार यांनी केला. राज्यातील भाजपचा ताकदवान नेता देवेंद्र आहे. शिवाय ज्यांना संधी दिली आहे तेही विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत.आता तेच सांगत आहेत की आम्ही विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केला असे सांगतात.’
सगळं तुम्हाला विचारूनच कसे
कुठलेही काम नेले तर सहकारमंत्री अतुल सावे आणि भापचे अन्य मंत्री देवेंद्रजींना विचारून सांगतो असे सांगतात. शिंदे गटाचा सवता सुभा असल्याने ते असले काही सांगत नाहीत. पण आपल्या राज्यात ही पद्धत नाही. सार्वजनिक हिताचे काम असेल तर अशी कामे करण्यासाठी सतत आडमुठेपणाची भूमिका बरोबर नाही, अशा शब्दांत पवार यांनी फटकारले.
बावणकुळे, मनात आणले तर कार्यक्रम करेन
बारामती मतदारसंघ भाजपने टार्गेट केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, ‘भाजपचे सरकार आल्यानंतर आपले एक नेते माझ्या बारामतीत आले. आमचे घड्याळ बंद करतो असे म्हणाले. मला एखाद्याने चॅलेंज दिले तर मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करेन. तो बाबा खूपच सुसाट आहे, मनात आणले तर लवकरच कार्यक्रम करेन, मी कुणाच्या ‘बा’ चे ऐकत नाही.
भाषणातील अन्य मुद्दे
रिफायनरीचा उद्योग विदर्भात आणला पाहिजे.
चुकीच्या धोरणामुळे संत्रा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.
सोयापेंड आयात करू नये.
धानापासून इथेनॉल प्लँट सुरु करावा.
तांदळावर प्रकिया करणारे उद्योग सुरू करावेत.
गावागावात पेस्ट कंट्रोल ऑपरेटर तयार ठेवण्याची योजना आखावी
शेतकरी सन्मान योजना सुरू करावी.
शेतकऱ्यांना सीबील मधून वगळा.
डीएपीचा तुटवडा कमी करा.
कर्ज काढले तरी त्यातून ॲसेट निर्माण व्हायला हवे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.