Nagpur News : अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात गुरुवारी (ता.१८) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे नऊ जनावरांचा मृत्यू झाला, अनेक घरांवरील शेड उडाले तर अमरावती जिल्ह्यात वीज पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला.
पूर्व विदर्भात सध्या उन्हाळी धानाची कापणी व मळणीचा हंगाम सुरू आहे. काढणी केलेले हे धान उन्हात वाळू घालणे आवश्यक राहते. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी मोकळ्या जागेत धान वाळत टाकले असतानाच भंडारा जिल्ह्यात गुरुवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
त्यामुळे अनेक ठिकाणी वाळत टाकलेले धान भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मोहाडी तालुक्यात गारांचा पाऊस पडला. यात कुशारी येथील ५० पेक्षा अधिक घरांवरील शेड उडाले.
घराच्या बाहेर व आत असलेले असलेल्या धान्याचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वीज, पाऊस यामुळे विजेच्या उपकरणात बिघाड झाला आहे. डोंगरगाव, मोरगाव येथील अंदाजे दहा ते बारा गुरांच्या गोठ्यांवरील टिनशेड उडाले.
वडगाव येथील शेतकरी गणपत सदाशिव रेहपाडे यांच्या शेतात शेळ्या चरत होत्या. दुपारी चार वाजता या शेळ्यांवर वीज पडून चार शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यांची किंमत अंदाज ३५ हजार रुपये आहे. नुकसानीचा अहवाल वडेगाव तलाठ्यांनी तहसीलदार मोहाडी यांच्याकडे पाठविला आहे.
वादळी वारा, पावसाचा अमरावती जिल्ह्याला देखील फटका बसला. पावसामुळे पाच जनावरांचा मृत्यू झाला असून ३९ घरांची अंशतः पडझड झाली आहे. तिवसा तालुक्यात वीज पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. पशुपालकाच्या एका लहान व चार मोठ्या जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.