अमरावती : सुधारित पैसेवारीमुळे दुष्काळ (Wet Drought) जाहीर होण्याचा मार्ग सुकर होऊ लागला आहे. आता सर्वांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याची या खरीप हंगामातील (Kharip Season)सुधारित पैसेवारी ४७ पैसे इतकी जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील १९५९ गावांमध्ये खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन, मूग व उडदासह आंतरपिकांची पेरणी होती. पेरणीनंतर पडलेला पावसाचा खंड व त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची मोठी हानी झाली. यापूर्वी प्रशासनाने याच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५३ पैसे काढली होती. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता नसल्याचे आडाखे बांधल्या जात होते. नुकतीच सुधारित पैसेवारी जाहीर झाल्याने जिल्हा दुष्काळाच्या छायेत आल्याचे दिसून येऊ लागले आहे.
चौदा तालुक्यांतील १९५९ पैकी १५४४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे, तर ४१५ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आली आहे. यामध्ये भातकुली तालुक्यातील १३७, चांदूररेल्वेतील १, दर्यापूर तालुक्यातील १५० व अंजनगावसुर्जी तालुक्यातील १२७ गावांचा समावेश आहे. मोर्शी तालुक्याची पैसेवारी सर्वांत कमी ४१ पैसे इतकी आहे. भातकुली, दर्यापूर व अंजनगावसुर्जी तालुक्यांची पैसेवारी प्रत्येकी ५३ पैसे इतकी असल्याने ते सध्यातरी दुष्काळाच्या छायेतून बाहेर आहेत.
नजर अंदाज व सुधारित पैसेवारीनंतर आता पीक कापणी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनाची सरासरी काय येईल, यावर दुष्काळाची तीव्रता स्पष्ट होणार आहे. ती मार्च-एप्रिलदरम्यान जाहीर होणार आहे.
तालुकानिहाय पैसेवारी
अमरावती ४६, भातकुली ५३, तिवसा ४७, चांदूररेल्वे ४७, धामणगावरेल्वे ४६, नांदगाव खंडेश्वर ४७, मोर्शी ४१, वरुड ४३, अचलपूर ४८, चांदूरबाजार ४६, दर्यापूर ५३, अंजनगावसुर्जी ५३, धारणी ४७ व चिखलदरा ४७.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.