
पुणे : पाणी व्यवस्थापनाशी (Water Management) संबंधित तंत्रज्ञान, विकास, नियोजन यासाठी कार्यरत इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे (Indian Water Works Association) (आयवा) तीनदिवसीय ५५ वे अखिल भारतीय वार्षिक अधिवेशन २० ते २२ जानेवारी रोजी होत आहे.
‘शाश्वत पाणीपुरवठा (Water Supply) व सार्वजनिक आरोग्य-सर्वांसाठीची उपलबद्धता’ या संकल्पनेवर देशभरातील तज्ज्ञ या अधिवेशनात विचार मंथन करतील, अशी माहिती अधिवेशनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष, ‘आयवा’चे उपाध्यक्ष व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी संयोजन समिती उपाध्यक्ष, ‘आयवा’चे राष्ट्रीय सरसचिव डॉ. डी. बी. पानसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, अनंत नामपूरकर आदी उपस्थित होते.
सुभाष भुजबळ म्हणाले, ‘‘हडपसर येथील मेस्से ग्लोबल (लक्ष्मी लॉन्स) पुणे येथे २० जानेवारीला राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.
विविध सत्रांत तज्ज्ञ विचार मांडतील. त्यासोबतच पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. लखनऊ येथील अभियंता अनिल कुमार गुप्ता यांना ‘जलनिर्मलता’, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील डॉ. पराग सादगीर यांना ‘जलसेवा’ पुरस्कार, तर लखनऊ येथील पल्लवी राय यांना युवा महिला अभियंता म्हणून ‘ब्रिज नंदन शर्मा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासह इतर पुरस्कारांचे वितरण या अधिवेशनात होणार आहे.
डॉ. डी. बी. पानसे म्हणाले, की संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी संचालक डॉ. राजेंद्र शेंडे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे ‘वातावरणातील बदलांचे पाण्यावर होणारे परिणाम’ यावर व्याख्यान होईल.
तरुणांना उद्योगासाठी चालना देणाऱ्या उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन केले असून, त्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, पुणे पालिकेच्या सहआयुक्त पूनम मेहता, शास्त्रज्ञ डॉ. पवन लाभशेटवार, युनिसेफ इंडियाचे युसूफ कबीर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते, मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, एम. मॅथियालगन आदी मार्गदर्शन करणार आहेत.
‘युनिसेफ’ आणि स्थानिक संस्थांच्या सहकार्याने हे सत्र होत आहे. या परिषदेत ‘हर घर जल : आव्हाने व उपाय’, ग्रामीण व शहरी भागासाठी चोवीस तास पाणीपुरवठा, शहरी व ग्रामीण भागातील सांडपाणी नियोजन, मानवी विष्ठेचे नियोजन आणि व्यवस्थापन, ‘जलशुद्धीकरण व मैलापाणी शुद्धीकरण, ‘यंत्रणांचे संचलन व देखभाल, जलस्रोतांचे व्यवस्थापन आदी विषयांवर विचारमंथन होईल.
यासह ‘जलजीवन अभियान व अमृत’ ही विशेष सत्रे व युरोप, जपान आणि ब्रिटन येथील तज्ज्ञांचे ‘संशोधन व विकास तंत्रज्ञानाचे आदानप्रदान’ यावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, तरुणाईसाठी पाणी क्षेत्राशी निगडित पोस्टर स्पर्धा, तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचे शोधनिबंध सादरीकरण करण्यात येणार आहे.
१४२ स्टॉल्सचे प्रदर्शन
अत्याधुनिक यंत्रे, उपकरणे व तांत्रिक माहिती असलेल्या १४२ स्टॉल्सचे प्रदर्शन असणार आहे. भारतासह परदेशातून ११०० पेक्षा अधिक अभियंता प्रतिनिधी, तर १५० हून अधिक युवकांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. प्रशासनातील विविध अधिकारी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ व्यक्ती या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, डॉ. डी. बी. पानसे यांनी नमूद केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.